अटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल- एक हळूवार प्रेमकहाणी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
चाळीसच्या दशकामध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या बहुतांश लोकांचे खासगी आयुष्यातील संबंध हे पारंपरिक किंवा रुढींप्रमाणे चालत आलेले असे नव्हते.
गांधीजी खुलेआम ब्रह्मचर्याबाबत त्यांचे प्रयोग करत होते. विधुर असतानाही जवाहरलाल नेहरू यांचे अॅडविना माउंटबॅटन आणि पद्मजा नायडू यांच्याशी संबंध होते, असंही म्हटलं जातं.
समाजवादी नेते राम मनोहर लोहिया अॅलानिया रमा मित्रा यांच्याबरोबर राहत होते. पण त्यांनी कधीही त्यांच्याबरोबर विवाह केला नाही.
या यादीत आणखी एका नावाचा समावेश आहे...अटल बिहारी वाजपेयी. त्यांच्या जीवनामध्ये राजकुमारी कौल यांच्यासाठी एक विशेष स्थान होतं.
ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेज (आता महाराणी लक्ष्मीबाई कॉलेज) मध्ये शिक्षणादरम्यान वाजपेयी यांची ओळख राजकुमारी हक्सर यांच्याबरोबर झाली आणि ते त्यांच्याकडे आकर्षित होत गेले.
"त्या काळात या दोघांचीही व्यक्तिमत्त्वं प्रभावी ठरणारी होती. राजकुमारी अत्यंत सुंदर होत्या, विशेषतः त्यांचे डोळे. त्याकाळी महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींची संख्या फार कमी होती. वाजपेयी त्यांच्याकडे आकर्षित झाले, राजकुमारीलाही ते आवडू लागले होते," असं नुकत्याच प्रकाशित झालेल्या वाजपेयींच्या चरित्राच्या लेखिका आणि प्रसिद्ध पत्रकार सागरिका घोष यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, JUGGERNAUT
"आधी त्यांची मैत्री राजकुमारीचे भाऊ चांद हक्सर यांच्याशी झाली. पण लग्नाचा विषय निघाला तेव्हा राजकुमारीच्या कुटुंबीयांनी शिंदेंच्या छावणीत राहणाऱ्या आणि रोज आरएसएसच्या शाखेत जाणाऱ्या वाजपेयी यांना त्यांच्या मुलीसाठी योग्य समजलं नाही. राजकुमारी हक्सर यांचा विवाह दिल्लीच्या रामजस कॉलेजमधील प्राध्यापक ब्रज नारायण कौल यांच्याशी करण्यात आला."
राजकुमारी कौल यांनी स्वीकारले वाजपेयींबरोबरचे संबंध
"तरुण अटल यांनी राजकुमारीसाठी लायब्ररीच्या एका पुस्तकात प्रेमपत्र ठेवलं होतं. पण त्यांना त्याचं उत्तर मिळालं नाही. खरं तर राजकुमारी यांनी त्याचं उत्तर दिलं होतं, पण ते वाजपेयींपर्यंत पोहोचू शकलं नाही," असं अटल बिहारी वाजपेयींचं आणखी एक चरित्र लिहिणारे किंगशुक नाग यांनी त्यांच्या 'अटल बिहारी वाजपेयी द मॅन फॉर ऑल सीझन्स' मध्ये म्हटलं आहे.

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
वाजपेयी खासदार म्हणून दिल्लीत आले तेव्हा त्यांच्या राजकुमारीशी भेटी गाठी पुन्हा सुरू झाल्या.
भारतीय परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ अधिकारी आणि सध्याच्या मोदी मंत्रिमंडळाचे सदस्य हरदीप पुरी यांची अटल बिहारी वाजपेयींशी पहिली भेट प्राध्यापक ब्रज नारायण कौल यांच्या घरीच झाली होती. ते त्यांचे गुरू होते.
80 च्या दशकात एका मुलाखतीत राजकुमारी कौल यांनी वाजपेयींसोबत त्याचे दृढ संबंध असून, फार कमी लोक ते समजू शकतील, असं मान्य केलं होतं.
"वाजपेयी आणि मला माझ्या पतीला कधीही या नात्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं नाही. माझे पती आणि माझं वाजपेयींबरोबरचं नातं पक्कं होतं," असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं.
"त्यांचे संबंध प्लेटोनिक (निष्काम) होते की नाही हे मला माहिती नाही आणि त्यानं काही फरकही पडत नाही," असं वाजपेयींचे सर्वात जवळचे मित्र अप्पा घटाटे यांनी सागरिका घोष यांना सांगितलं होतं.
संपूर्ण जगाला हे संबंध रुढी परंपरांच्या विरोधी आणि विचित्र वाट होते. पण ग्वाल्हेरमध्ये वर्गमित्र म्हणून सुरू झालेल्या मैत्रीचं हे दृढ रुप होतं.
पतीसह वाजपेयींच्या घरी राहू लागल्या राजकुमारी कौल
नंतर वाजपेयी यांनी दिल्लीत मोठं सरकारी घर भेटलं त्यावेळी राजकुमारी कौल त्यांचे पती ब्रज नारायण कौल आणि त्यांच्या मुली वाजपेयी यांच्या घरी राहायला गेले. त्यांच्या घरी सर्वांसाठी वेगळ्या खोल्या होत्या.

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
"वाजपेयींचे निकटवर्तीय राहिलेले बलबीर पुंज यांनी सांगितलं होतं की, ते पहिल्यांदा वाजपेयींच्या घरी गेले तेव्हा त्याठिकाणी कौल दाम्पत्याला पाहून त्यांना काहीसं विचित्र वाटलं होतं. पण त्यांच्यासाठी ही सामान्य बाब असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत विचार करणं सोडलं," असं सागरिका घोष यांनी म्हटलं.
"वाजपेयींचे जवळचे मित्र अप्पा घटाटे वाजपेयींना त्यांच्याकडे जेवणासाठी आमंत्रित करायचे तेव्हा वाजपेयी, राजकुमारी कौल आणि ब्रज नारायण कौल तिघंही जायचे. बलबीर पुंज सांगतात की, वाजपेयी प्राध्यापक म्हणून बीएन कौल यांचा खूप आदर करत होते. ब्रज नारायण कौल यांनी राजकुमारी आणि वाजपेयी यांची मैत्री स्वीकारली होतीच, शिवाय वाजपेयीदेखील त्यांना खूप आवडू लागले होते. अटल जेवले की नाही? त्याचं भाषण कसं झालं? भाषणात उत्साह होता की नाही? अशी विचारणा ते करायचे."
मिसेस कौल यांच्या शिफारसीनं करण थापर यांना मिळाला होता इंटरव्ह्यू
प्रसिद्ध पत्रकार करण थापर यांना एका मुलाखतीसाठी वाजपेयींशी संपर्क करायचा होता, पण त्यांचं बोलणंच होत नव्हतं.
"मी कंटाळून वाजपेयींच्या रायसिना रोडवरील घरी फोन केला. फार प्रयत्नांनंतर मिसेस कौल यांनी फोन घेतला. मी त्यांना माझी अडचण सांगितली. त्यावर त्यांनी म्हटलं की, मला त्यांच्याशी बोलू द्या. इंटरव्ह्यू व्हायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी वाजपेयी इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार झाले. त्यांचे पहिले शब्द होते, तुम्ही तर हाय कमांडशी बोलला, आता मी तुम्हाला नकार कसा देऊ शकतो," असं करण थापर यांनी त्यांचं आत्मचरित्र 'डेव्हिल्स अॅडव्होकेट' मध्ये लिहिलं आहे.
'अविवाहित आहे, ब्रह्मचारी नाही'
एक गोष्ट प्रचंड प्रसिद्ध झालेली आहे. ती म्हणजे साठच्या दशकात मिसेस कौल यांना पतीला घटस्फोट देऊन वाजपेयी यांच्याशी विवाह करायचा होता. पण वाजपेयींनी तसं केल्यास त्यांच्या राजकीय जीवनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल, असं मत त्यांचा पक्ष आणि आरएसएसचं होतं.

फोटो स्रोत, HARPERCOLLINS
वाजपेयींनी आयुष्यभर विवाह केला नाही, पण मिसेस कौल त्यांच्या खासगी जीवनातील एक महत्त्वाचा भाग होत्या.
एका कार्यक्रमात वाजपेयी यांनी, "मी अविवाहित आहे ब्रह्मचारी नाही" असं स्वीकारलंही होतं.
"ही अलिखित प्रेमकहाणी सुमारे 50 वर्ष चालली आणि ती लपवण्यातही आली नाही. पण तिला काही नावही मिळालं नाही. भारताच्या राजकारणात कदाचित प्रथमच पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी अशी व्यक्ती राहिली असेल, ज्या व्यक्तीला प्रोटोकॉलमध्ये स्थान देण्यात आलं नाही, पण त्यांची उपस्थिती सर्वांना मान्य होती," असं वाजपेयींच्या 'हार नहीं मानूंगा' नावाच्या चरित्रात विजय त्रिवेदी यांनी लिहिलं आहे.
आरएसएसनं एका विवाहित महिलेबरोबरचे वाजपेयींचे संबंध कधीही स्वीकारले नाही.
पण त्यांना त्यांच्याविरोधात काही करताही आलं नाही. कारण निवडणुकीच्या राजकारणात ते त्यांचे सर्वात महत्त्वाचे पोस्टर बॉय होते, ज्यांच्यामध्ये गर्दी खेचण्याची क्षमता होती.
वाजपेयी आणि मिसेस कौल यांच्या संबंधांवर गुलजार यांनी लिहिलेलं खामोशी चित्रपटातील गाणं अगदी तंतोतंत जुळतं -
"हमने देखी है उन आंखों की महकती खुशबू
हाथ से छूके इसे रिश्तों का इल्जाम न दो
सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो"
मिसेस कौल यांच्या निधनावर सोनियांनी व्यक्त केला शोक
राजकुमारी कौल यांचं 2014 मध्ये 86 वर्षांच्या असताना निधन झालं, त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात मिसेस कौल या माजी पंतप्रधान वाजपेयींच्या कुटुंबातील सदस्य होत्या, अस म्हटलं होतं.

फोटो स्रोत, HARPER HINDI
इंडियन एक्सप्रेसनं त्या वाजपेयींच्या सर्वात 'अज्ञात अदर हाफ' असल्याचं म्हटलं होतं.
त्यावेळी प्रचार शिगेला पोहोचलेला होता. पण सोनिया गांधींनी गुपचूप वाजपेयींच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता.
त्यांच्या अंत्यसंस्कारात भाजपमधील आघाडीचे नेते लालकृष्ण अडवाणी, अमित शाह, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे तर उपस्थित होतेच, पण आरएसएसनंही त्यांच्या दोन वरिष्ठ प्रतिनिधी सुरेश सोनी आणि राम लाल यांना पाठवलं होतं.
2009 नंतर गंभीर आजारी असलेले अटल बिहारी वाजपेयी राजकुमारी यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकले नव्हते.
"राजकुमारी कौल यांच्या मृत्यूनंतर भारतीय राजकारणातील सर्वात मोठी प्रेमकहाणी कायमची संपुष्टात आली. अनेक दशकं ही प्रेमकहाणी बहरली पण अनेक लोक यापासून अज्ञात राहिले," असं नंतर किंगशुक नाग यांनी लिहिलं होतं.
वाजपेयींच्या सर्व गरजांची काळजी घ्यायच्या मिसेस कौल
वाजपेयी हे राजकुमारी यांना नेहमी मिसेस कौल म्हणायचे. वाजपेयींचं घर त्याच चालवत होत्या. त्याचं खाणं पिणं, औषधं आणि दैनंदिन गरजांची जबाबदारी मिसेस कौल यांचीच होती.

फोटो स्रोत, Google
अटल बिहार वाजपेयींनी एकदा एक आठवण सांगितली होती. ते राजेंद्र प्रसाद रोडवर राहत असताना मिसेस कौल त्यांच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी वाजपेयी कपडे धुण्याचा साबण अंघोळीसाठी वापरत असल्याचं पाहून त्यांना धक्का बसला होता.
सागरिका घोष यांनीही एक किस्सा सांगितला. "बलबीर पुंज यांनी त्यांना सांगितलं होतं की, एकदा ते वाजपेयींच्या घरी गेले तेव्हा मिसेस कौल घरी नव्हत्या. टेबलवर वाजपेयींसाठी जेवण तयार होतं. पोळ्या आणि एक भाजी. ते जेवण पाहून वाजपेयींनी तोंड फिरवलं आणि स्वतः स्वयंपाक घरात जात, शुद्ध देसी तुपात पुऱ्या तळू लागले."

फोटो स्रोत, Getty Images
"मिसेस कौल परत आल्या तेव्हा त्यांना टेबलवर पुऱ्या दिसल्या. त्या नाराज झाल्या आणि वाजपेयींना म्हणाल्या हे काय आहे? तुम्ही तेलाच्या पुऱ्या खात आहात? तुम्ही शुद्ध तुपाच्या पुऱ्या कशा खाऊ शकता? वाजपेयींनी खायला सुरुवातही केली नव्हती, त्यांनी रागातच उत्तर दिलं की, तुम्ही तर मला चांगलं जेवणचं द्यायचं नाही असं, ठरवलं आहे."
वाजपेयींची उमा शर्मा यांच्याशी मैत्री
वाजपेयींना सुंदर महिलांबरोबर राहायला आवडत होतं. त्यांच्या मैत्रिणींमध्ये प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना उमा शर्मा यांचाही समावेश होता.

सागरिका घोष यांनी उमा शर्मा यांना वाजपेयींबरोबरच्या संबंधांबाबत विचारणा केली होती. त्यावर त्यांनी "वाजपेयींना माझं नृत्य आवडत होतं. ते अनेकदा माझ्या शोला यायचे. आम्ही खूप गप्पा मारायचो, एकमेकांची मस्करी करायचो. ते कला प्रेमी होते. आम्ही दोघंही ग्वाल्हेरच्या धौलपूर परिसरातले होतो.
एकदा मी हरिवंशराय बच्चन यांची मधुशाला आणि गोपाल दास नीरज यांच्या कवितेवर नृत्य केलं तर वाजपेयी मला म्हणाले होते की, 'उमाजी आमच्यावरही कृपा करा' त्यानंतर मी त्यांच्या 'मृत्यू से ठन गई' या कवितेवर नृत्य केलं होतं," असं सांगितलं.
"2001 मध्ये उमा शर्मा यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. सोहळ्यानंतर त्या चहा पार्टीनंतर बराचवेळ सोनिया गांधींशी बोलत होत्या. त्यादरम्यान वाजपेयी सतत त्यांच्याकडे पाहत होते. त्या वाजपेयींकडे गेल्या तर त्यांनी, म्हटलं की उमाजी इतरांशी बोलता आणि पद्मभूषण आमच्याकडून घेता," असं सागरिका घोष म्हणाल्या.
खाण्या-पिण्याची आवड
सुरुवातीच्या दिवसांत वाजपेयींना वाइन आणि स्कॉचची आवड होती. त्यांना ग्वाल्हेरचा चिवडा, चांदणी चौकातील जिलेबी आणि लखनऊची चाट आणि ठंडाई आवडायची.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या आवडीच्या पदार्थात रसगुल्ला, चिकन, खीर, खिचडी आणि तळलेले झिंगे आणि मासे यांचा समावेश होता.
ते नेहमी दिल्लीच्या शहाजहान रोडवर युपीएससीच्या कार्यालयाजवळ चाट खायला जात होते.
जॉर्ज फर्नांडिस संरक्षण मंत्री होते तेव्हा ते ख्रिसमसला बेंगलोरला (आजचं बेंगळुरू) मधील 'कोशीज' बेकरीमधून खास वाजपेयींसाठी केक मागवत होते. कॅनॉट प्लेसच्या इंडियन कॉफी हाऊसमध्ये वाजपेयी नेहमी दोसा खाल्ल्यानंतर कोल्ड कॉफी पित असल्याचं पाहायला मिळायचं.
त्यांना चायनीज पदार्थ एवढे आवडायचे की, 1979 मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून चीनला जाण्यापूर्वी त्यांनी अनेक दिवसांपर्यंत चॉप स्टीकनं खाण्याचा सराव केला होता.
"प्रकाश जावडेकरांनी मला सांगितलं होतं की, वाजपेयींना थंड कोकाकोला फार आवडायचा. एकदा जावडेकरांनी वाजपेयींना विचारलं होतं की, एवढं थंड प्यायल्यानं तुमचा घसा बसत नाही का? त्यावर वाजपेयींनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देत, उलट माझा घसा मोकळा होतो असं उत्तर दिलं होतं."
विजय त्रिवेदी यांनी लिहिलेल्या चरित्रात याचा उल्लेख आहे.
2000 मध्ये वाजपेयी इटलीली गेले होते, त्यावेळी त्यांचे माध्यम सल्लागार एच के दुआ यांनी त्यांना तिथं जेवण कसं मिळतंय असं विचारलं होतं. त्यावर त्यांनी, 'वांगी फार खावी लागत आहेत', असं म्हटलं होतं.
पंतप्रधान कार्यालयात सचिव असलेले एन के सिंह यांनी त्यांच्या 'पोर्टरेट ऑफ पॉवर हाफ अ सेंचुरी ऑफ बीइंग अॅट रिंगसाइड' या आत्मचरित्रात एक किस्सा सांगितला आहे.
"एकदा वाजपेयींच्या निवासस्थानी रात्रीच्या जेवणापर्यंत बैठक लांबली होती. त्यावेळी त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, मला तर पथ्य असलेलं खावं लागत आहे, पण या लोकांचं काय होईल">बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.