महाशिवरात्रीला महाकुंभातील शेवटचं शाही स्नान

कुंभमेळा

फोटो स्रोत, Getty Images

26 फेब्रुवारीला (बुधवारी) महाशिवरात्री असून महाकुंभाचे शेवटचे शाही स्नान याच दिवशी होणार आहे.

या शाही स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. शेवटचे शाही स्नान असल्याने या दिवशी प्रयागराजमध्ये भाविकांची आलोट गर्दी होणार आहे.

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला 13 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. हा कुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. महाकुंभाचे शेवटचे शाही स्नानदेखील याच दिवशी होणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत तब्बल 58 कोटी लोकांनी संगमात स्नान केलं आहे. यावर्षीचा महाकुंभमेळ्याचा योग 144 वर्षानंतर असून याला विशेष धार्मिक महत्व प्राप्त झालंय.

महाकुंभासाठी तयार करण्यात आलेल्या सरकारच्या संकेतस्थळानुसार या महाकुंभात एकूण सहा शाही स्नान आहेत. या शाही स्नानांचा दिनविशेष आणि महत्त्व जाणून घेऊया.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पौष पौर्णिमा – 13 जानेवारी

हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला पौष पौर्णिमा येते. ही पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची अंतिम तिथी आहे. या दिवशी पूर्ण चंद्र दिसतो, म्हणूनच ही पौर्णिमेची पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी सूर्य आणि चंद्राची पूजा केली जाते तसेच गंगेत स्नान करणं शुभ मानलं जातं.

धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. पौष पौर्णिमेपासूनच कल्पवासाचा प्रारंभ होतो.

या दिवशी कल्पवासाचा संकल्प केला जातो, जो माघी पौर्णिमेपर्यंत एक महिन्याच्या कठोर आध्यात्मिक तपस्ये आणि श्रद्धेचे प्रतीक असतो. यावर्षी पौष पौर्णिमा 13 जानेवारी रोजी होती.

महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक येतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक येतात.

मौनी अमावस्या – 29 जानेवारी

ही देखील महत्वाच्या तिथींपैकी एक आहे. सर्व अमृत स्नानांमध्ये मौनी अमावस्येची तिथी सर्वात शुभ मानली जाते.

या दिवशी पवित्र नद्या 'अमृत' बनतात, अशी समजूत आहे. यावर्षी 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर अमृत स्नानासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती.

वसंत पंचमी - 5 फेब्रुवारी

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी म्हटलं जातं. हा सण साजरा करण्यासाठी कल्पवासी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात. या दिवशी नदीत स्नान, दानपुण्य आणि पूजनाला विशेष महत्त्व असतं.

26 फेब्रुवारीला महाशिवरात्री असून महाकुंभचे शेवटचे पवित्र स्नान होणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री असून महाकुंभचे शेवटचे पवित्र स्नान होणार आहे.

माघी पौर्णिमा - 12 फेब्रुवारी

माघ पौर्णिमेला पवित्र पाण्यात आंघोळ करून वस्त्रदान आणि गोदान केल्याने दैहिक आणि दैविक सर्व प्रकारच्या कष्टांचं निवारण होतं, असं मानतात.

यंदा 12 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा असून या दिवशी देखील शाही स्नान होणार आहे. माघ पौर्णिमा हा कल्पवास पूर्ण होण्याचा पर्व मानला जातो. एका महिन्याच्या तपस्या आणि साधनेची पूर्णता या तिथीला होते.

मौनी अमावस्येचे स्नान विशेष का असते?

कुंभमेळ्यात मौनी अमावस्येला होणाऱ्या अमृत स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या अमृत स्नानासाठी लाखो लोक जमले होते. यावेळी अमृतस्नानासाठी त्रिवेणी योग तयार होत असल्याने गर्दी अधिक होती. हिंदू प्रथांनुसार 144 वर्षांनंतर त्रिवेणी योग आला आहे.

सर्व अमृत स्नानांमध्ये मौनी अमावस्येची तिथी सर्वात शुभ मानली जाते. या दिवशी पवित्र नद्या 'अमृत' बनतात, अशी समजूत आहे.

त्यानुसार, अमृत स्नान (ज्याला शाही स्नान म्हणतात) हा कुंभमेळ्यातील सर्वात भव्य आणि पवित्र विधी मानला जातो. हे स्नान काही विशिष्ट तिथीला असल्याने देशभरातून आणि जगभरातून लाखो लोक कुंभमेळ्यात पोहोचतात.

महाशिवरात्री – 26 फेब्रुवारी

फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. कारण पुराणांनुसार याच दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता.

हा कुंभ मेळ्याच्या अंतिम स्नानाचा दिवस मानला जातो. या दिवशी नदीतील पवित्र पाण्यात आंघोळ केल्यानंतर आणि गंगाजलाने शिवलिंगाचे पूजन व अभिषेक केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असं मानतात.

अमृत ​​स्नान (ज्याला शाही स्नान म्हणतात) हा कुंभमेळ्यातील सर्वात भव्य आणि पवित्र विधी मानला जातो.

फोटो स्रोत, UP Government

फोटो कॅप्शन, अमृत ​​स्नान (ज्याला शाही स्नान म्हणतात) हा कुंभमेळ्यातील सर्वात भव्य आणि पवित्र विधी मानला जातो.

महाशिवरात्रीच्या स्नानानंतर महाकुंभची सांगता होईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.