भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांच्यावर सावरकरांचा प्रभाव होता? काय आहे वस्तुस्थिती?

फोटो स्रोत, savarkarsmaraak.com
- Author, स्नेहा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
संसदेचं उद्घाटन असो वा रस्त्याचं नामकरण, विनायक दामोदर सावरकर यांचं नाव कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतंच.
सावरकरांच्या 140 व्या जयंतीनिमित्त भारतीय संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी देखील अशीच चर्चा सुरू झाली होती.
सावरकरांच्या नावाची चर्चा अगदी तेव्हाही सुरू झाली होती, जेव्हा मानहानीच्या प्रकरणात माफी मागण्याच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले होते, "माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत."

फोटो स्रोत, Getty Images
सत्ताधारी भाजपसाठी सावरकर हे 'वीर', एक आदर्श व्यक्तिमत्त्व, आणि हिंदुत्वाचे सर्वात मोठे सिद्धांतकार आहेत.
'इंडिया' आघाडीत महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठीही सावरकर हे अत्यंत आदरणीय व्यक्ती आहेत.
दुसरीकडे काँग्रेसला सावरकरांचं वावडं आहे. यामागे बरीच मोठी ऐतिहासिक आणि वैचारिक कारणं आहेत. काँग्रेस वारंवार आठवण करून देते की त्यांनी ब्रिटिश सरकारची अनेकदा माफी मागितली होती.
सावरकरांवरील चित्रपट 'स्वातंत्र्य वीर सावरकर'
28 मे रोजी सावरकरांच्या जयंतीनिमित्त 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात रणदीप हुड्डा सावरकरांच्या भूमिकेत असून तो स्वतः या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.
बायोपिकच्या टीझरमध्ये असं म्हटलंय की, "स्वातंत्र्याचा लढा 90 वर्षे चालला पण हा लढा काही मोजक्याच लोकांनी दिला, बाकी तर सत्तेचे भुकेले होते."
गांधी हत्येतील प्रमुख आरोपींमध्ये सावरकरांचा समावेश होता. मात्र, पुरेशा पुराव्याअभावी न्यायाधीशांनी सावरकरांची निर्दोष मुक्तता केली.
वेगवेगळ्या मुद्द्यांवरून गांधींवर टीका होत असते आणि ही काही नवी गोष्ट नाहीये. पण गांधींचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणण्याचा ट्रेंड मात्र नवा आहे. या संदर्भात भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी केलेल्या विधानावर पंतप्रधान म्हणाले होते की, 'मी त्यांना मनापासून माफ करू शकणार नाही.'
त्याच्या पुढच्याच टप्प्यात 'स्वतंत्र वीर सावरकर' चित्रपटाच्या टीझरमध्ये असं म्हटलंय की, "गांधीजी वाईट नव्हते, पण जर ते त्यांच्या अहिंसेच्या विचारांवर ठाम राहिले नसते, तर भारत 35 वर्षांपूर्वीच स्वतंत्र झाला असता."
आणि एवढंच नाही तर 'स्वतंत्र वीर सावरकर'च्या टीझरमध्ये असंही म्हटलंय की, "सावरकर हे असे व्यक्ती होते ज्यांनी भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि खुदीराम बोस यांना प्रेरणा दिली होती."
सावरकर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करताना रणदीप हुड्डा लिहितो, "द मोस्ट वॉन्टेड इंडियन बाय द ब्रिटिश. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि खुदीराम बोस यांसारख्या क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान. वीर सावरकर कोण होते? त्यांची खरी गोष्ट पाहा."
या टीझरमध्ये जे दावे केले आहेत त्यानंतर एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे, खुदीराम बोस, भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांच्यावर सावरकरांचा खरोखरच प्रभाव होता का?
सावरकरांशी संबंधित केल्या जाणाऱ्या या दाव्यांमध्ये तथ्य आहे का? यावर इतिहासकारांचं काय म्हणणं आहे? हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करुया.
भगत सिंह आणि सावरकर यांची कधीच भेट नव्हती झाली
सावरकरांना 1910 मध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी एम टी जॅक्सन यांच्या हत्येसह अनेक प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती. खटल्यानंतर त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं. ज्याला काळया पाण्याची शिक्षा म्हणतात.
भगतसिंग यांच्यावर अनेक पुस्तकं लिहिणारे प्राध्यापक चमनलाल यांनी चित्रपटाच्या टीझरमध्ये केलेला दावा फेटाळून लावला आहे.

फोटो स्रोत, SWATANTRA VEER SAVARKAR
प्राध्यापक चमनलाल म्हणतात, "भगतसिंग सावरकरांना कधीच भेटले नव्हते, ना कधी त्यांनी सावरकरांपासून प्रेरणा घेतली होती. भगतसिंगांनी 1924 च्या त्यांच्या एका लेखात सावरकरांचा उल्लेख जरूर केला होता पण त्याचबरोबर सावरकरांसोबतच देशातील जगातील सर्व देशभक्त आणि क्रांतिकारकांचं नाव आदराने घेतलं होतं. यात लेनिन आणि गॅरिबाल्डी यांच्यासोबत सावरकरांचही नाव आहे."
याउलट, 'वीर सावरकर: द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन'चे लेखक उदय माहूरकर यांनी टीझरमध्ये केलेल्या दाव्याचं समर्थन केलं आहे.
माहूरकर म्हणतात, "भगतसिंगांवर सावरकरांचा प्रभाव होता याचे अनेक पुरावे आहेत. त्यांचं लेखन तर होतंच पण ते तुरुंगात असताना त्यांच्याजवळ सावरकरांचे '1857' हे पुस्तक सोबत होते."

फोटो स्रोत, SWATANTRA VEER SAVARKAR
ते म्हणतात, "भगतसिंग हे सावरकरांचे प्रशंसक होते यात शंका नाही. हे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. भगतसिंगांनी 'मतवाला' मासिकात एक लेख लिहिला होता ज्यामध्ये सावरकरांचा उल्लेख आहे. त्यावेळी सावरकर त्यांच्या रत्नागिरीच्या घरात नजरकैदेत होते."
माहूरकर आणि प्राध्यापक चमन लाल ज्या लेखाबद्दल बोलत आहेत तो लेख भगतसिंग यांनी 1924 साली लिहिला होता.
भगतसिंग यांचा हा लेख बलवंत सिंह (टोपणनाव) या नावाने कलकत्ता येथून प्रकाशित होणाऱ्या 'मतवाला' या साप्ताहिकाच्या दोन अंकांमध्ये 'विश्वप्रेम' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला होता.
या लेखात भगतसिंग यांनी महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक यांच्यासह अनेक लोकांचा उल्लेख केला आहे.
तुरुंगातील डायरी आणि सावरकरांचं पुस्तक
भगतसिंग यांनी तुरुंगातही खूप वाचन केलं होतं. त्यांच्या तुरुंगातील नोट्सवरून याचा अंदाज येतो.
फ्रेडरिक एंगेल्स, बर्टंड रसेल, व्लादिमीर लेनिन, कार्ल मार्क्स, व्हिक्टर ह्यूगो, फ्योदोर दोस्तोएव्स्की यांच्या पुस्तकांबरोबरच सावरकरांच्या 'हिंदू पद-पादशाही' या पुस्तकातील काही ओळीही त्यांच्या नोट्समध्ये समाविष्ट होत्या.
भगतसिंग यांनी या लेखकांच्या पुस्तकातील काही ओळी त्यांच्या डायरीत लिहिल्या होत्या. या ओळींवर त्यांनी काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
1857 च्या स्वातंत्र्यलढ्यासंबंधी सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल असं म्हटलं जातं की, भगतसिंग यांच्या साथीदारांनी हे पुस्तक छापून त्याच्या प्रती वितरित केल्या होत्या.
सावरकरांचे हे पुस्तक आधी मराठीत आलं. या पुस्तकाचं नाव होतं '1857 चे स्वातंत्र्य समर'. हे पुस्तक 1909 मध्ये प्रकाशित झालं होतं. असं मानलं जातं की, 1857 च्या बंडाची तपशीलवार माहिती देणारं ते पहिलं पुस्तक होतं.
चमनलाल सांगतात की, ती प्रत भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांपर्यंतही पोहोचली होती. त्यानंतर त्यांनी हे पुस्तक हिंदीत अनुवादित करून घेतलं. त्यानंतर भूमिगत होऊन त्यांनी ते प्रकाशित आणि वितरीत केलं.
ते सांगतात की, "भगतसिंग 1929-31 दरम्यान तुरुंगात असताना त्यांनी सावरकरांचा एकदाही उल्लेख केलेला नाही. लेनिन आणि इतर कम्युनिस्ट नेत्यांविषयी त्यांनी प्रत्येक गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यानंतर तर त्यांनी स्वतःला कम्युनिस्ट म्हणून समोर आणायला सुरुवात केली होती. त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं कारण त्यात 1857 च्या संघर्षाचं तपशीलवार वर्णन आहे."
पण माहूरकर यांच्या मते, भगतसिंग आणि सावरकरांना वेगवेगळ्या चौकटीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यामागे सर्वात मोठा तर्क दिला जातो तो म्हणजे भगतसिंग फाशीवर गेले आणि सावरकरांनी माफी मागितली. पण दोन्ही क्रांतिकारकांची रणनीती वेगळी होती हेच सत्य आहे.
'सावरकर आणि भगतसिंग, दोन पूर्णपणे भिन्न विचार'
सावरकरांवर सखोल अभ्यास करणारे पत्रकार आणि लेखक निरंजन टकले सांगतात की, "सावरकरांच्या जीवनातील पहिला भाग रोमँटिक रिवोल्यूशनरीचा आहे. यात परदेशी कपड्यांची होळी करणं, 1857 वर पुस्तक लिहिणं, ज्यामध्ये ते एक प्रकारे धर्मनिरपेक्षतेविषयी बोलताना दिसतात. पण त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचे विचार पूर्णपणे वेगळे आहेत."
विनायक दामोदर सावरकर आणि भगतसिंग यांच्या विचारसरणीत काय फरक आहे?
दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक शम्स-उल-इस्लाम म्हणतात, "भगतसिंग आणि सावरकर यांच्या विचारसरणीमध्ये खूप अंतर होतं. या दोघांचा तसा काहीच संबंध नाहीये. भगतसिंग सर्व धर्मांच्या एकतेबद्दल बोलायचे तर सावरकरांच्या संपूर्ण विचारधारेवर हिंदू वर्चस्व होतं."

फोटो स्रोत, SAVARKARSMARAK.COM
सावरकर हे असे व्यक्ती होते ज्यांनी पहिल्यांदा हिंदुत्वाचं वर्णन राजकीय विचारधारा म्हणून केलं.
प्राध्यापक शम्स-उल-इस्लाम सांगतात, "सावरकरांनी ज्या पद्धतीने हिंदुत्वाची व्याख्या केली आहे, त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन हे या देशाचाच भाग नाहीत असं दिसतं. त्यांच्या मते, हिंदुस्थान हा त्यांचाच आहे ज्यांची जन्मभूमी, मातृभूमी आणि पुण्यभूमी हीच आहे."
पुण्यभूमी म्हणजे तीर्थक्षेत्र असा त्यांचा अर्थ आहे. सावरकर असा युक्तिवाद करतात की ज्या लोकांची तीर्थक्षेत्रे भारतात नसून भारताबाहेर आहेत, त्यांची भारतावरील आस्था संशयास्पद आहे. कारण त्यांची तीर्थक्षेत्र ज्या ठिकाणी आहेत त्या भूमीचा ते आदर करतील.
ते म्हणतात, "भगतसिंग कष्टकरी लोकांच्या राज्याबद्दल बोलायचे तर सावरकरांना हिंदूंचं राज्य हवं होतं."
सुभाषचंद्र बोस आणि सावरकरांची भेट
युरोपातील अनेक देशांना भेटी देऊन सुभाषचंद्र बोस 1936 मध्ये भारतात परतले.
ब्रिटीश सरकारने त्यांना व्हिएन्ना मध्ये असतानाच त्यांना इशारा दिला होता की ते भारतात परतले तर त्यांना अटक केली जाऊ शकते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि भारतात पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली.
तुरुंगातून सुटल्यानंतर 1938 मध्ये सुरत, हरिपुरा येथील काँग्रेस अधिवेशनात बोस काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 1939 मध्ये ते पुन्हा अध्यक्ष झाले पण काँग्रेसमधील मतभेद वाढल्याने त्यांनी पक्ष सोडला.
हा तो काळ होता जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं. आणि या परिस्थितीचा फायदा घेऊन स्वातंत्र्य मिळवता येईल असा विश्वास बोस यांना वाटू लागला होता, परंतु काँग्रेसला हे मत मान्य नव्हतं.
सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या 'द इंडिया स्ट्रगल' या पुस्तकात नमूद केलंय की, या काळात महात्मा गांधी आणि त्यांच्यात दीर्घ चर्चा झाली होती.

फोटो स्रोत, SAVARKARSMARAK.COM
ते महात्मा गांधींना हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते की, युरोपातील संकटाच्या वेळी स्वातंत्र्याचा जोरदार लढा देशभरात आणि देशाबाहेरही द्यायला हवा.
यादरम्यान त्यांनी मुस्लिम लीगचे अध्यक्ष जिना आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष सावरकर यांचीही भेट घेतली.
बोस यांच्या पुस्तकातील पान क्रमांक 344 वर असा उल्लेख आहे की, "मिस्टर जिना त्या काळात इंग्रजांच्या मदतीने फक्त पाकिस्तान निर्माण करण्याच्या योजनेचा विचार करत होते. काँग्रेससोबत जाऊन ब्रिटिशांविरुद्ध संयुक्त लढा उभारण्याची त्यांची इच्छा नव्हती."
बोस यांनी या बैठकीत त्यांना सल्ला देताना म्हटलं की, ही लढाई जिंकली तर ते भारताचे पहिले पंतप्रधान देखील होऊ शकतात.
त्याच पुस्तकात ते सावरकरांबद्दल लिहितात, "मिस्टर सावरकर आंतरराष्ट्रीय परिस्थितीबद्दल गाफील असल्याचं दिसतं. ते केवळ एकाच गोष्टीचा विचार करत होते ते म्हणजे हिंदू जर ब्रिटिश सैन्यात भरती झाले तर त्यांना लष्करी प्रशिक्षण मिळू शकते."
या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, या बैठकीनंतर बोस यांना मुस्लिम लीग किंवा हिंदू महासभेकडून काहीच अपेक्षा उरल्या नव्हत्या.
या बैठकांनंतर सुभाषचंद्र बोस यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पण जानेवारी 1941 मध्ये एका रात्री ते पठाणाच्या वेशात तिथून बाहेर पडले आणि अनेक देशांच्या सीमा ओलांडून जपानला पोहोचले.
बोस यांच्यावर सावरकरांचा प्रभाव होता का?
'सावरकर: कालापानी और उसके बाद' या पुस्तकाचे लेखक अशोक कुमार पांडे म्हणतात, "सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये असताना त्यांच्या एका भाषणात सावरकर आणि जिना या दोघांवरही टीका केली होती. भारतात झालेल्या भेटीनंतर या दोघांनीही सांप्रदायिकतेचा मार्ग सोडावा असं बोस यांनी सांगितलं होतं. त्यामुळे बोस यांच्यावर सावरकरांचा प्रभाव होता असं म्हणणं चुकीचं आहे."
पब्लिकेशन डिव्हिजनने सुभाषचंद्र बोस यांच्या भाषणांचं संकलन असलेलं 'सेलेक्टेड स्पीचेस ऑफ सुभाष चंद्र बोस' असं एक पुस्तक छापलं आहे.
31 ऑगस्ट 1942 रोजी आझाद हिंद रेडिओने सुभाषचंद्र बोस यांचे एक भाषण प्रसारित केले होते. हे भाषण 'भारत छोडो' आंदोलनाबाबत आहे.
त्यात ते म्हणाले होते, "एकीकडे ही चळवळ भारतात वेगाने पसरत आहे आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या बाजूने सहानुभूती तयार होत आहे."
त्यात त्यांनी जीना आणि सावरकरांना विनंती करताना म्हटलंय की, "जे अजूनही ब्रिटिशांशी तडजोड करण्याचा विचार करतात त्या सर्व नेत्यांसह मी मिस्टर जिना आणि सावरकरांना विनंती करू इच्छितो की उद्या ब्रिटिश साम्राज्य अस्तित्वात नसेल."
ते म्हणाले, "स्वातंत्र्य संग्रामात सामील झालेल्या सर्व लोक, गट आणि पक्षांना उद्याच्या भारतात सन्मानाचे स्थान असेल."
लेखक उदय माहूरकर सांगतात की, जेव्हा सुभाषचंद्र बोस बाहेर गेले आणि त्यांनी सशस्त्र मोहीम पुढे नेण्यास सुरुवात केली तेव्हा रास बिहारी बोस हे जपान हिंदू महासभेचे प्रमुख होते आणि त्यांनी त्यांना खूप मदत केली.
माहूरकर दावा करतात की, "सुभाषचंद्र बोस यांना बाहेर जाण्याचा सल्ला देणाऱ्यांमध्ये सावरकर देखील होते. सावरकरांनी 1952 मध्ये 'अभिनव भारत'च्या एका कार्यक्रमात मंचावर याचा उल्लेख केला होता."
यावर सुभाषचंद्र बोस यांचे नातेवाईक काय म्हणतात?
या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सुभाष चंद्र बोस यांचे नातू आणि सामाजिक-राजकीय भाष्यकार चंद्रकुमार बोस म्हणाले की, चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांसोबत छेडछाड केली आहे.
ते म्हणतात की, सुभाषचंद्र बोस यांच्यावर सावरकरांचा कधीही प्रभाव नव्हता.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेल्या किंवा सामील होऊ इच्छिणाऱ्यांशी बोस बोलायचे. पण हिंदू महासभा आणि बोस यांच्या विचारधारा पूर्णपणे विरुद्ध आहेत."
चंद्रकुमार बोस स्पष्ट करतात की, "सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय विचार धर्मनिरपेक्ष होते. ते काली मातेचे भक्त होते. ते स्वामी विवेकानंदांचेही शिष्य होते पण त्यांनी धर्म आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवल्या होत्या. हिंदू महासभेचा हिंदुत्वाच्या विचारसरणीवर विश्वास होता. सावरकरांची विचारधारा आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांची विचारधारा वेगळी आहे. पण त्याचा सुभाषचंद्र बोस यांच्याशी काही संबंध नाहीये."

फोटो स्रोत, Getty Images
चंद्र कुमार बोस म्हणतात की, सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांची काम करण्याची स्वतःची पद्धत होती. त्यात त्यांनी आपापल्या परीने योगदान दिलं. तुरुंगात त्यांनी जो छळ सहन केला त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं जातं.
चंद्रकुमार बोस म्हणतात की, पण सावरकरांच जीवन चरित्र दाखवण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंध जोडणं हे काही योग्य नाहीये. असं करून सावरकरांचाच अपमान केला जातोय.
ते म्हणतात, "योग्य इतिहास दाखवा, चुकीचा इतिहास दाखवलात तर भारताची 140 कोटी जनता तुमच्या विरोधात जाईल."
खुदीराम बोस यांच्यावरही सावरकरांचा प्रभाव होता असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे.
खुदीराम बोस हे स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करणाऱ्या सर्वात तरुण स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. त्यांनी मुझफ्फरपूरमधील एका ब्रिटिश न्यायाधीशाच्या हत्येचा कट रचला होता. पण या हल्ल्यात इतर लोकांचा मृत्यू झाला. 11 ऑगस्ट 1908 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी ते अवघ्या 18 वर्षांचे होते.
निरंजन टकले म्हणतात, "या चित्रपटात असा दावा करण्यात आलाय की, खुदीराम बोस हे सावरकरांपासून प्रेरित होते. पण खुदीराम बोस यांचा मृत्यू तर 1908 मध्येच झाला होता. आणि लोक सावरकरांना त्यांच्या '1857' या पहिल्या पुस्तकानंतर ओळखू लागले होते. हे पुस्तक 1910 मध्ये प्रकाशित झालं होतं. त्यामुळे खुदीराम बोस सावरकरांपासून प्रेरित झालेत असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये."
टकले विचारतात, "बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या एका ब्रिगेडचं नाव गांधी ठेवलं तर एका ब्रिगेडचं नाव नेहरू ठेवलं होतं. इथे सावरकरांचं नाव कुठे आहे");