महाराष्ट्रात पुढील 5 दिवस कुठं किती पाऊस पडणार? हवामान खात्याकडून अंदाज जाहीर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Twitter,
मान्सून यंदा महाराष्ट्रात वेळेआधी आला. यानंतर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. आता पावसाने काहीशी उसंत घेतली होती. मात्र, नुकताच हवामान खात्यानं पुढील पाच दिवसांचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार राज्यात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे.
आज (2 मे) कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, 30 मे नंतर मान्सूननं थोडी विश्रांती घेतली, तरी जून महिन्यात राज्यात बहुतांश ठिकाणी एकूण पाऊस हा सरासरीएवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त राहील, असं हवामान विभागाचा सुधारीत दीर्घकालीन अंदाज सांगतो.
पुढील पाच दिवसांसाठी काय वर्तवलाय अंदाज?
आयएमडीनं 2 जूनपासून पुढील 5 दिवसांसाठी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तर, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, IMD
मॉन्सूनची 8 दिवस आधीच हजेरी
नैऋत्य मोसमी वारे आणखी पुढे सरकले असून आता मराठवाड्यात आणि विदर्भाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.
भारतीय हवामान विभागानं 28 मे रोजी जाहीर केलेल्या नकाशानुसार, मान्सूनची उत्तरेकडची सीमा आता मुंबई, अहिल्यानगर, बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यांमधून जाते आहे.
28 मेपासून पुढे 2 दिवसांत मान्सून छत्तीसगड, ओडिशासोबतच ईशान्य भारताचा उर्वरीत भाग, सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये आगेकूच करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

फोटो स्रोत, IMD
दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढली असून पुढच्या 24 तासांत त्याचं डिप्रेशनमध्ये रुपांतर होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
त्याच्या प्रभावाखाली बंगाल आणि ओडिशाच्या भागात जोरदार पावसाचं भाकित हवामान विभागानं केलं आहे.
तसंच या प्रदेशात समुद्र खवळलेला असल्यानं 30 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात किनारी भागातही मासेमारीसाठी जाऊ नये अशी सूचनाही केली आहे.
28 मे रोजी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे, तसंच कोल्हापूर आणि साताऱ्यातला घाट प्रदेश, विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि वाशिममध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये पावसासाठी यलो अलर्ट आहे. राज्यात इतर बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वाऱ्याची शक्यता पाहता यलो अलर्ट आहे.
29 मे साठी विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांत तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. त्याशिवाय गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, जालना, संभाजीनगर आणि जळगाव या जिल्यांत तसंच पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट प्रदेशात आणि रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट आहे.
मान्सूनचं वेळेआधी आगमन का झालं?
यंदा मान्सून 26 मे रोजी म्हणजे नेहमीपेक्षा तब्बल 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झाला होता. 75 वर्षांत पहिल्यांदाच मान्सून एवढ्या लवकर मुंबईत दाखल झाला.