जेनाभाई ठक्करांच्या मुलाचं नाव 'मोहम्मद अली जिना' कसं झालं?

मोहम्मद अली जिना

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, रजनीश कुमार
  • Role, बीबीसी प्रतिनिधी

जसे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत, अगदी तसंच पाकिस्तानचे 'कायदे-ए-आझम' मोहम्मद अली जिना आहेत.

विशेष म्हणजे महात्मा गांधी गुजराती आणि तिकडे मोहम्मद अली जिना यांचे आई-वडीलही गुजरातीच.

महात्मा गांधींचं जन्मस्थान गुजरातच्या काठियावाड जिल्ह्यातील पोरबंदर, तर इकडे जिनांच्या आई-वडिलांचं गाव काठियावाडमधील राजकोट जिल्ह्यातील पानेली मोटी.

या दोन्ही गावांमध्ये फक्त 95 किलोमीटर इतकं अंतर आहे. मोहनदास करमचंद गांधी हे परदेशात जाण्यपूर्वी त्यांचा विवाह वयाच्या 13 व्या वर्षी लावून देण्यात आला होता. तर जिना यांचाही विवाह इंग्लंडला जाण्याआधी वयाच्या 16 व्या वर्षी पानेली मोटी गावातील 11 वर्षांच्या मुलीसोबत लावून देण्यात आला होता.

असं म्हटलं जातं की, गांधी आणि जिना यांच्या आई-वडिलांना भीती होती की, आपली मुलं परदेशात जाऊन लग्न करतील, त्यामुळे लग्न करूनच त्यांना परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

आज महात्मा गांधींच्या पोरबंदरमधील घराचं संग्रहालयात रूपांतर झालंय. तेच जिना यांच्या वडिलोपार्जित घराचं काय झालं? आणि असंही म्हणतात की, जिनांच्या वडिलांच्या कुटुंबाने हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारला होता. यात तथ्य आहे का?

जीनांच्या घरात आता प्रवीणभाई राहातात

जिना यांचं वडिलोपार्जित घर

तर वरच्या फोटोत तुम्हाला जे दुमजली घर दिसतंय ते जिना यांचं वडिलोपार्जित घर असल्याचं म्हटलं जातं.

भारताचे माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह त्यांच्या 'जिना: इंडिया, पार्टीशन, इंडिपेंडन्स' या पुस्तकात लिहितात की, "जिनांचे आजोबा पुंजाभाई ठक्कर यांना वालजीभाई, नथुभाई, जेनाभाई अशी तीन मुलं  आणि  मानबाई अशी एक मुलगी होती. हे कुटुंब पानेली गावात राहायचं."

जसवंत सिंह यांनी पुढे लिहिलंय, "हे कुटुंब खोजा मुस्लिम होतं. खोजा मुस्लिम हे बोहरा मुस्लिमांप्रमाणेच शांतताप्रिय व्यापारी असतात. ते दुसऱ्या संस्कृतीमध्ये लगेच मिसळून जातात. पुंजाभाई हातमागावर काम करून आपल्या कुटुंबाचं पोट भरायचे. पण त्यांचा सर्वात धाकटा मुलगा जेनाभाई याने पानेली गाव सोडलं आणि जवळच असणाऱ्या गोंदल गावात राहायला गेले. पानेली गाव सोडण्याचा हा पहिलाच टप्पा होता."

जीनांच्या घरात आता प्रवीणभाई राहातात

आता पानेली गावाविषयी थोडी माहिती करून घेऊ.

तर हे गाव राजकोट जिल्ह्याच्या उपलेटा तालुक्यात येतं. हे गाव उत्तरप्रदेश किंवा बिहारमध्ये जशी गावं आहेत तशा पद्धतीचं अजिबात नाहीये. शहरात ज्याप्रमाणे दुकानं, बँका असतात तसं सगळं आहे. सोबतच इथल्या रस्त्यांवर मोठी वर्दळ असते.

पानेली मोटी गावचे उपसरपंच जतीनभाई सांगतात त्याप्रमाणे, गावची लोकसंख्या 13 हजार असून आजही इथं पाच ते सहा खोजा मुस्लिम कुटुंब राहतात.

या गावाची ओळख जिनांचं गाव अशीच आहे. मोहम्मद अली जिना यांचं घर कुठं? म्हटल्यावर या गावातील कोणतंही लहान मूल तुम्हाला त्यांच्या घरापर्यंत सोडून येईल.

जीनांच्या घरात आता प्रवीणभाई राहातात

हे घर जवळपास 110 वर्ष जुनं आहे. दुमजली असलेल्या या घरात वरच्या मजल्यावर एक स्वयंपाकघर आणि दोन खोल्या आहेत. आणि अगदी त्याचपद्धतीने खालच्या मजल्यावर एक स्वयंपाकघर आणि दोन खोल्या आहेत.

अशा पद्धतीची घरं गुजरातमध्ये बऱ्याच ठिकाणी आढळून येतील. मी त्या दारावर टकटक केली, तेव्हा दरवाजा न उघडताच पलीकडून आवाज आला, कोण आहे?

मी माझी ओळख सांगताच, समोरून एका व्यक्तीने अनिच्छेने दरवाजा उघडला. मी आत गेलो तेव्हा त्यांनी मला धड बस असं म्हणून पण सांगितलं नाही.

मी त्यांना त्यांचं नाव विचारलं, तेव्हा त्यांनी काहीशा त्रासानेच आपलं प्रवीण हे नाव सांगितलं.

थोडा वेळ आम्ही बोललो आणि नंतर मग त्यांनी त्यांचं पूर्ण नाव  प्रवीणभाई पोपटभाई पोकिया असल्याचं सांगितलं. प्रवीण भाई पटेल समाजाचे आहेत.

मी त्यांच्याशी बोलत असताना त्यांची 70 वर्षांची आई नंदू बेनही सोबत होत्या.

प्रवीणभाई यांच्या घरी सतत कोण ना कोण येत राहतात, चौकशी करत राहतात. त्यांना सतत घडणाऱ्या या गोष्टींचा त्रास होत असतो.

केव्हाही कोणीही घरी येऊन चौकशी करू लागल्याने प्रवीणभाईंना खूप राग येतो.

जीनांच्या घरात आता प्रवीणभाई राहातात
फोटो कॅप्शन, जीनांच्या घरात आता प्रवीणभाई राहातात 
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रवीण भाई सांगतात, "तुम्ही दरवाजा वाजवला तेव्हा मी झोपलो होतो. आता मला शेतावर जायचं आहे. माझी झोपमोड झालीच पण आता शेतावर जायलाही उशीर होणार. आणि हे फक्त आजचं नाहीये, तर नेहमीच असं घडत असतं. कधी पत्रकार तर कधी जिल्हाधिकारी तर कधी एखादा नेता तर कधी कोण. खरं सांगायचं तर मी या घराला आता वैतागलोय. 2005 मध्ये परदेशी मीडिया सुद्धा इथं आला होता."

आडवाणींच्या पाकिस्तान दौऱ्यात पानेली मोटी गाव प्रसिद्धीच्या झोतात आलं

2005 मध्ये भाजपचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात आडवणींनी काराचीस्थित जिना यांच्या समाधीवर जाऊन आदरांजली वाहिली होती.

आणि सोबतच जिना सेक्युलर आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे राजदूत असल्याचं आडवणींनी म्हटलं होतं.

आडवाणी यांनी त्या समाधी स्थळावर जे रजिस्टर ठेवलं होतं त्यात लिहिलंय की, "अशी बरेच लोक आहेत ज्यांनी इतिहासावर आपली छाप सोडलीय. मात्र असे बरेच कमी लोक आहेत ज्यांनी इतिहास रचलाय. कायद-ए-आझम मोहम्मद अली जिना हे त्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत."

आडवाणींच्या या विधानावरून भाजपमध्ये खूप वाद झाले. आडवणींच्या वक्तव्याशी आमचा काहीच संबंध नसल्याचं भाजपने म्हटलं होतं.

असं म्हटलं जातं की, आडवणींच्या या विधानानंतर भाजपमध्ये त्यांचं मूल्य कमी झालं होतं. आडवाणी यांच्या विधानानंतर हा वाद पानेली मोटी गावापर्यंत पोहोचला होता.

प्रवीण भाई पोकियांचे भाऊ चमन पोकिया
फोटो कॅप्शन, प्रवीण भाई पोकियांचे भाऊ चमन पोकिया

प्रवीणभाई पोकिया यांचे मोठे बंधू चमन भाई पोकिया सांगतात, "आडवणींच्या पाकिस्तान दौऱ्याचा सर्वात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर तो आम्हाला झाला होता. प्रत्येकजण येऊन घरात शिरायचा आणि जिनांचा शोध घ्यायचा. आणि खरं सांगायचं तर आता आम्हाला हे घर विकायचं आहे. आम्ही कोणतंही नवं घर खरेदी करू. तुमच्या ओळखीत जर कोणी घर घेणार असेल तर सांगा आम्ही ते त्याला देऊन टाकू. ज्याला वाटत असेल त्याने या घराला जिना संग्रहालय बनवावं."

प्रवीण भाई पोकियांची आई नंदूबेन पोकिया
फोटो कॅप्शन, प्रवीण भाई पोकियांची आई नंदूबेन पोकिया

प्रवीणची आई नंदू बेन सांगतात त्याप्रमाणे या घरात काहीही बदल झालेला नाही.

त्या सांगतात, "माझं संपूर्ण आयुष्य याच घरात गेलं. आता माझा शेवट जवळ आलाय. माझ्या मुलांना जिनांच्या घरामुळे त्रास होतोय, पण मला माझ्या हयातीत या घराचा त्रास नाही झाला. मी जेव्हा लग्न करून या घरात आले तेव्हाही हे घर असंच होतं. फक्त वीज जोडणी सोडली आणि काही ठिकाणचं प्लास्टर सोडलं तर सगळं जसंच्या तसं आहे."

50 वर्षीय प्रवीण भाई पोकिया सांगतात, "जेव्हा मी शाळेत जायचो अगदी तेव्हापासून लोक म्हणतात की, मी जे राहतो ते घर जिनांच घर आहे. माझ्या आजोबांनी पण सांगितलं होतं की, हे मोहम्मद अली जिना यांच्या वडिलांचं घर आहे. आता तर गावात सुद्धा आमची ओळख या घरावरूनच आहे. सुरुवातीला ऐकून भारी वाटायचं, पण आता त्रास होतो. लोक कधीपण घरी येतात. मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, मला हे घर विकायचं आहे."

गावातले लोक काय म्हणतात?

पानेली मोटी गावातच राहणारे 70 वर्षीय किरण भीमज्यानी जिनांच्या ओळखीशी संबंधित माहिती देताना सांगतात की, "ते लोहाना ठक्कर जातीचे होते. या लोकांनी नंतरच्या काळात इस्लामचा स्वीकार केला. माझे आजोबा सांगायचे की,  पुंजभाईने माशांचा व्यापार सुरू केला होता. त्यामुळे लोहाना ठक्कर जातीतील लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. या बहिष्कारानंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. हे कुटुंब खोजा मुस्लिम बनल्याचं म्हटलं जायचं. माझं घर बाजूलाच आहे. माझं गाव तर खूपच फेमस आहे. हर्षद मेहताचं गाव सुद्धा हेच आहे."

पानेली उपसरपंच जतीनभाई सांगतात, "जिनांमुळे आमच्या गावाचं नाव तर आहेच पण भारताच्या फाळणीमुळे आमचं गाव बदनाम पण झालंय. जिना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सामील होते, याचा आम्हाला अभिमान आहे. पण त्यांनी भारताची फाळणी करून पाकिस्तान वेगळा केला यासाठी थोडं वाईटही वाटतं."

आधुनिक भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाचे तज्ञ अशी ओळख असलेले आणि चिमणभाई पटेल संस्थेचे संचालक डॉ. हरी देसाई सांगतात की, "पुंजाभाई ठक्कर यांच्या मुलाचं नाव जेनाभाई ठक्कर असं होतं. जेनाभाई यांच्या मुलाचं नाव मैमद म्हणजेच मोहम्मद अली जिना असं ठेवण्यात आलं. पुंजभाई माशांचा व्यापार करायचे. लोहाना समाज खूप रुढीवादी होता. त्यामुळे त्यांच्या माशांचा व्यापाराला खूप विरोध झाला. आणि त्यामुळे पुंजाभाई यांनी इस्लाम स्वीकारला."

चिमणभाई पटेल इंस्टिट्यूटचे संचालक डॉ. हरी देसाई
फोटो कॅप्शन, चिमणभाई पटेल इंस्टिट्यूटचे संचालक डॉ. हरी देसाई

डॉ हरी देसाई पुढं सांगतात की, "थोडे दिवस लोटल्यानंतर पुंजाभाईना हिंदू धर्मात परत यावं असं वाटलं होतं पण लोकांनी त्यांचा स्वीकार केला नाही. जेनाभाई यांनी व्यापारासाठी म्हणून कराची गाठलं. नंतर मोहम्मद अली जेनाभाई यांनी आपलं नाव जिना असं करवलं. जिना शिक्षणासाठी नाही तर व्यवसायासाठी लंडनला गेले होते. पण तिकडे जाऊन त्यांनी बॅरिस्टरीचं शिक्षण सुरू केलं. जिना यांनी ज्या मुलीशी लग्न केलं होतं तिचं नाव एमिबाई असं होतं. लंडनमध्ये जाऊन मोहम्मद जिना एखाद्या इंग्रज बाईशी लग्न करतील म्हणून त्यांच्या आईने त्यांचं इथंच लग्न लावून दिलं. पण नंतर जिनांनी एका पारशी मुलीशी लग्न केलं."

जिना यांचे आजोबा हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात आले होते का? असा प्रश्न पाकिस्तानचे प्रसिद्ध इतिहासकार मुबारक अली यांच्याशी बोलताना विचारला होता.

त्यावर ते म्हटले की, "त्या दरम्यान खूप मोठ्या संख्येने हिंदू खोजा मुस्लिम बनले होते. ज्या पद्धतीने जिनांच्या आजोबांची वडिलांची नावं होती, ते बघता हे कुटुंब हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात गेल्याचं दिसतं."

चिमनभाई पटेल इंस्टिट्यूट के निदेशक डॉ हरि देसाई

जेनाभाई ते जीना बनण्यापर्यंतचा प्रवास

जसवंत सिंह त्यांच्या पुस्तकात लिहितात की, जिनांचे वडील जेनाभाई ठक्कर 1875 मध्ये व्यवसायानिमित्त कराचीला गेले होते. त्यावेळी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुंबईप्रमाणेच कराचीतही ट्रेडिंग पोस्ट बनवल्या होत्या.

जसवंत सिंह पुढं लिहितात, "कराची मध्ये जेनाभाईंची भेट सर फ्रेडरिक ली क्रॉफ्ट यंच्यासोबत झाली. ते कराचीतल्या डग्लस ग्रॅहम अँड कंपनीत महाव्यवस्थापक या पदावर होते. फ्रेडरिक यांना भेटून जेनाभाईंच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. जेनाभाईंच्या व्यापारात बरकत आली त्यांना मोठा आर्थिक फायदा झाला. कराचीतचं जेनाभाईंच्या पत्नीने मीठीबाईंने 25 ऑक्टोबर 1876 रोजी एका मुलाला जन्म दिला. (जन्मतारीख अद्याप अनिर्णित आहे). पुंजाभाईंच्या घरातल्या सर्वांची नावं हिंदूंप्रमाणे होती. पण कराची खूप वेगळं होतं."

"कराचीत मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर होती. आणि आसपासच्या मुलांचीही नाव मुस्लिम धर्मीयांप्रमाणे होती. जेनाभाईंना वाटलं की, आपण आपल्या मुलाचं नाव उगाच चुकीच्या पद्धतीने ठेवायला नको, ज्याचा त्याला भविष्यात त्रास होईल. शेवटी जेनाभाईंनी त्यांच्या मुलाचं नाव मोहम्मद अली जेनाभाई असं ठेवलं.  काठियावाड भागात नावाच्या शेवटी वडिलांचं नाव जोडण्याची परंपरा आहे, ती मात्र त्यांनी काही सोडली नाही."

ते पुढे लिहितात की, "जेनाभाई आणि मिठीबाई आपल्या मुलाला मोहम्मदला 'अकीका' करण्यासाठी हसन पीरच्या दर्ग्यात घेऊन गेले. हा दर्गा पानेली गावातून थोड्याच अंतरावर वसलेल्या गणोद गावात आहे. इथंच मोहम्मदचं मुंडन करण्यात आलं. मिठीबाईंनी हे आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी करून घेतलं होतं. मिठीबाई आणि जेनाभाई यांनी पानेली मोटीमधून गुजराती शिकवणाऱ्या एका शिक्षकांना बोलावून घेतलं. नवव्या वर्षी त्यांना शाळेत घालण्यात आलं. त्यानंतर सिंध-मदरसा-तुल-इस्लाम या मदरशात पाठवण्यात आलं. इथं लहानगा मोहम्मद साडे तीन वर्ष शिकला. मदरशानंतर मुहम्मद अलीला कराचीतील चर्च मिशन स्कूलमध्ये पाठवण्यात आलं."

आता वडिलांचा व्यवसाय शिकून घ्यावा म्हणून आणि फ्रेडरिकच्या सल्ल्यानुसार मोहम्मद यांनी इंग्लंड गाठलं. आणि इथंच त्यांनी आपल्या नावापुढचं जेनाभाई हटवून जिना हे आडनाव केलं.

पानेली मोटी गाव
फोटो कॅप्शन, पानेली मोटी गावव

जिनांच्या कुटुंबाशी संबंधित इतर तर्क

अमेरिकेचे सुप्रसिद्ध इतिहासकार स्टॅनले वॉलपोर्ट यांनी जिना यांच्यावर एक पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाचं नाव आहे 'जिना ऑफ पाकिस्तान'. यात जिनांचं मूळ इराणमध्ये दाखवण्यात आलंय.

स्टॅनले वॉलपोर्ट आपल्या पुस्तकात लिहितात, "जिना यांचा जन्म शिया मुस्लिम खोजा कुटुंबात झाला. हे लोक इस्माईल आगा खानचे अनुयायी होते. 10 व्या शतकापासून ते 16 व्या शतकापर्यंत हजारो खोजा लोक इराणी अत्याचाराला कंटाळून भारताकडे आले. जिनांचे पूर्वज सुद्धा इरानमधूनच पळून आले होते मात्र त्याची नेमकी तारीख माहीत नाही. आता खोजा मुस्लिम हे मुळातच मुस्लिम समाजात अल्पसंख्याक आहेत. आणि भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास इथं मुस्लिम समाजच अल्पसंख्याक आहे."

स्टॅनले वॉलपोर्ट लिहितात, "खोजा हा व्यापारी वर्ग आहे आणि ते व्यवसायासाठी संपूर्ण जगभर फिरत असतात. हे लोक स्थानिक लोकांमध्ये चटकन मिसळतात, त्यांची भाषा अवगत करून घेतात. हे लोक अतिशय चपळ आणि हुशार असतात. महात्मा गांधी हिंदूंमधीलबनिया जातीचे होते. त्यांचं घर जिनांच्या घरापासून अवघ्या 95 किलोमीटर अंतरावर होतं. भारत आणि पाकिस्तानच्या दोन्हीही राष्ट्रपित्यांची मातृभाषा गुजराती होती."

पानेली मोटी
फोटो कॅप्शन, पानेली मोटी गाव

इस्लामिक स्कॉलर आणि ब्रिटनमधील पाकिस्तानचे उच्चायुक्त अकबर एस अहमद सुद्धा जिना यांच्या पूर्वजांचा संबंध इराणशी जोडतात.

त्यांनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये एक लेख लिहिला होता. त्या लेखात ते म्हणतात, "जिनांच्या आजोबांचं, आई-वडील, भावंडांची नावं सगळी हिंदू धर्माशी साधर्म्य सांगणारी होती. आणि अशा पद्धतीने आपली गैर भारतीय ओळख पुसून टाकण्यासाठी मुस्लिम समाजात अशा गोष्टी घडत असत. आणि विशेष करून अशा समाजात जिथं कुटुंबाच्या नावावरून दर्जा प्राप्त होतो. पण दुसऱ्या एका संदर्भानुसार जिनांचं मूळ इराणी नव्हतं. एका पाकिस्तानी लेखकाच्या मते, जिना यांचे पूर्वज पंजाबमधील साहिवाल राजपूत होते. त्यांनी काठियावाड येथील एका इस्माइली खोजा महिलेशी विवाह केला होता."

मोहम्मद अली जिना

फोटो स्रोत, Getty Images

स्टॅनले वॉलपोर्टने तर असंही लिहिलंय की जिनांना लंडनला पाठवायचं म्हटल्यावर जेनाभाई आणि मिठीबाई घाबरले होते. त्यांनी या भीतीपोटी पानेली मोटी गावातल्या एमिबाईशी मोहम्मदचं लग्न लावून दिलं.

स्टॅनली, जिनांच्या बहिणीचा फातिमाचा संदर्भ देऊन लिहितात की, "लग्नाच्या वेळी जिना अवघ्या 16 वर्षांचे होते. त्यांनी ज्या मुलीशी लग्न केलं ती 11 वर्षांची होती. लग्नाच्यावेळी तिला वरपासून खालीपर्यंत झाकण्यात आलं होतं. नंतर जिना लंडनला गेले आणि परत आले तेव्हा एमिबाईचा मृत्यू झाला होता. त्यांना शेवटपर्यंत त्यांच्या पत्नीला बघता आलं नाही."

jinah

फोटो स्रोत, Getty Images

पानेली मोटी गावात एमिबाई बद्दल कोणालाच काही माहीत नाही. किंवा तिच्या कुटुंबाबद्दलही कोणालाच माहिती नाही.

या वर्षीच्या मार्च महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अहमदाबादमध्ये एक प्रदर्शन आयोजित केलं होतं. या प्रदर्शनात 200 अशा लोकांचे फोटो लावण्यात आले होते, ज्याचं मूळ गुजरातमध्ये आहे.

यात मोहम्मद अली जिना यांच्या फोटोचाही समावेश करण्यात आला होता. जिना यांच्याव्यतिरिक्त भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई, अझीम प्रेमजी, क्रिकेटर विनू मांकड, सुप्रसिद्ध अभिनेते हरिभाई जरीवाला म्हणजेच संजीव कुमार आणि डिंपल कपाडिया यांचेही फोटो लावण्यात आले होते.

jinnah

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर जेव्हा मोहम्मद अली जिना यांच्या फोटोवरून प्रश्न उपस्थित व्हायला लागल्यावर आरएसएसने त्यांचे फोटो काढून टाकले.

भलेही आरएसएसने जिनांचे फोटो काढून टाकले असतील पण प्रवीण भाई पोकिया यांच्या घराला जिनांच्या नावाची मिळालेली ओळख पुसता येणं अशक्य झालंय. 

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)