पोलीस भरती पेपरफुटीः मुख्याध्यापकांच्या खोलीत लपून कसे फोडले पेपर? राजस्थानच्या पेपरफुटीचं बिंग 2.5 वर्षांनी बाहेर

परीक्षा

फोटो स्रोत, SOG

  • Author, मोहर सिंह मीणा
  • Role, जयपूरहून बीबीसी हिंदीसाठी

राजस्थान लोकसेवा आयोगाच्या (आरपीएससी) पेपर फुटी प्रकरणानंतर अटक करण्यात आलेल्या 14 प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांना 6 मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपींना सहा दिवसांची रिमांड मिळाली आहे.

नोकरीवर रुजू झालेल्या पोलिसांना अटक करण्याची राजस्थानमधील ही पहिलीच घटना आहे.

ही परीक्षा सप्टेंबर 2021 मध्ये झाली होती.

तपासयंत्रणा एसओजीने 3 मार्च 2024 रोजी 40 आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवली होती. त्यानंतर 5 मार्च रोजी 14 प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांसह 16 आरोपींना अटक करण्यात आली.

एसओजीचे अतिरिक्त महासंचालक विजय कुमार सिंग यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "या प्रकरणात आणखी अटक होणार आहेत. मात्र पडताळणी करून झाल्यावरच अटक केली जाईल.

अडीच वर्षांनंतर पेपरफुटीचं बिंग उघडकीस आलं

आरपीएससीने फेब्रुवारी 2021 मध्ये उपनिरीक्षक आणि प्लाटून कमांडरच्या 859 पदांसाठी जाहिरात काढली होती.

13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत राज्यभरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. दोन तारखांना झालेल्या या भरती परीक्षेत लाखो तरुणांनी सहभाग घेतला होता.

परीक्षेत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी देण्यात आली आणि पोलीस अकादमीमध्ये त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं.

राजस्थान लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, कनिष्ठ अभियंता पेपरफुटी प्रकरणात दोषी आढळलेल्या 'मास्टरमाइंड' जगदीश विश्नोईने चौकशीदरम्यान उपनिरीक्षक पदाच्या पेपरफुटीबद्दल माहिती दिली.

राजस्थान पोलीस अकादमी

चौकशीच्या आधारे एसओजी टीमने 40 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केली.

एसओजीने 14 प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांना ताब्यात घेतलं आहे.

स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे एडीजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरच्या हसनपूर येथील एका खासगी शाळेतील परीक्षा केंद्राचे अधीक्षक, राजेश खंडेलवाल यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

एसओजीने चौकशीनंतर 5 मार्चला सर्वांना अटक केली. त्यांना 6 मार्च रोजी न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एडीजींच्या म्हणण्यानुसार, काही लोकांचा पेपरफुटीत सहभाग होता, तर काहींनी आपल्या जागी डमी उमेदवार पाठवून पेपर सोडवले. या सर्व प्रकरणात परीक्षेत टॉपर असलेल्या नरेश विश्नोईचाही समावेश आहे.

या घटनेनंतर पुन्हा एकदा नोकरभरती परीक्षांवर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत.

पेपर कसा फुटला?

स्पेशल ऑपरेशन ग्रुप हे राजस्थान पोलिसांचंच एक युनिट आहे. एसओजीनुसार, हसनपूर येथील रवींद्र बाल भारती वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात ही भरती परीक्षा पार पडली होती.

एसओजीच्या म्हणण्यानुसार, परीक्षा केंद्राचे अधीक्षक राजेश खंडेलवाल यांच्यासह जगदीश विश्नोई, युनिक भांबू, शिवरतन मोट यांनी पेपर फोडण्याचा कट रचला होता.

13 ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत भरती परीक्षा घेण्यात आली होती.

एसओजीच्या म्हणण्यानुसार, परीक्षेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 13 सप्टेंबर 2021 रोजी आरोपींना पेपर मिळवण्यात यश आलं नाही. त्यानंतर 14 आणि 15 सप्टेंबरला पेपर होण्यापूर्वी युनिक भांबू मुख्याध्यापकांच्या खोलीत लपून बसला.

परीक्षा

असा आरोप केला जातोय की, भांबू हा परीक्षेच्या सुमारे दोन तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचला. नंतर त्याला मुख्याध्यापकांच्या खोलीत कोंडून खोली सील करण्यात आली.

आधीच खोलीत लपून बसलेल्या भांबूने पेपरचे फोटो काढून जगदीश विश्नोईला पाठवले आणि पूर्वीप्रमाणेच पाकीटं बंद करून ठेवली.

या बदल्यात जगदीश विश्नोईने युनिक भांबूच्या माध्यमातून परीक्षा केंद्र अधीक्षक राजेश खंडेलवाल यांना दहा लाख रुपये दिले असल्याची माहिती चौकशीत उघड झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

'पेपर सोडवून इतरांना दिला'

एफआयआरनुसार, जगदीश विश्नोईने परीक्षा केंद्रातून मिळालेला पेपर प्रिंट करून लगेचच उत्तरांसहित सोडवून आणला.

14 आणि 15 सप्टेंबरला परीक्षेपूर्वी सोडवलेले पेपर राजस्थानच्या विविध भागात बसलेल्या त्यांच्या हॅन्डलरला व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात आल्याचा आरोप आहे.

उदयपूरमध्ये 15 तारखेला झालेल्या परीक्षेपूर्वी हॉटेलच्या खोलीत पाच उमेदवारांना फोनवरून पेपरची माहिती देण्यात आल्याचं एसओजीच्या तपासात समोर आलं आहे. त्यापैकी अशोकसिंग नाथवत, राजेंद्र यादव आणि प्रेमसुखी यांची उपनिरीक्षकपदी निवड झाली.

राजस्थान पोलीस

मात्र, अशोक सिंह नाथवत आणि राजेंद्र यादव यात सहभागी नव्हते. तर, प्रेमसुखी पोलीस अकादमीतून प्रशिक्षण घेत होती.

हेराफेरी करून बनलेले उपनिरीक्षक

एफआयआरनुसार, सांचोर जिल्ह्यातील टॉपर नरेश विश्नोई, नारंगी कुमारी विश्नोई, राजेश्वरी, गोपी राम जंगू, श्रवण कुमार विश्नोई, मनोहर विश्नोई, सुरेंद्र कुमार विश्नोई, करणपाल गोदरा, विवेक भांबू, एकता कुमारी, रोहितेश कुमार असे डझनभर प्रशिक्षणार्थी होते.

यातील बहुतांश प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक सध्या पोलिस कोठडीत आहेत. मात्र, तपासात आणखी नावं समोर आल्यास अनेकांना अटक होऊ शकते.

लाखो रुपयांमझ्े विकण्यात आला पेपर

एसओजीच्या मते, जगदीश विश्नोई टोळीचा सदस्य अशोक सिंह नाथवतला हा पेपर पाठविण्यात आला होता. पण अशोक नाथवतने हा पेपर हँडलर अनिल कुमार मीणाला पंधरा लाख रुपयांना विकला.

अनिल कुमार मीणाने त्याचे साइट हँडलर कमलेश मीणा, अरुण शर्मा यांच्यामार्फत अनेक उमेदवारांना पेपरची माहिती दिली. सोबतच भूपेंद्र सरनला हा पेपर पन्नास लाख रुपयांना विकण्याचा सौदा करून अनिल मीणाने पंचवीस लाख रुपये घेतले.

एफआयआरनुसार, भूपेंद्र सरनने हे सोडवलेले पेपर सुनील, महेंद्र, सुनील भादू, कमलेश ढाका, सुरेश साहू आणि दिनेश सरन आणि इतरांमार्फत अनेक उमेदवारांना पाठवले.

पेपरफुटी

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA

यापैकी अभय सिंग, मनोहर लाल, मनोहर सिंग, भगवती विश्नोई आणि इतर अनेकांची प्रशिक्षणासाठी निवड झाली. तर अनेकांनी निवड होऊनही जॉईन केलं नाही.

पोलिस अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या इतर अनेक उपनिरीक्षकांवरही संशय व्यक्त केला जातोय.

एसओजीने एफआयआरमधील चाळीस आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 419, 420, 120 बी, राजस्थान सार्वजनिक परीक्षा 1992 च्या कलम 4, 5, 6 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आयटी कायदा 2008 चे कलम 66 ड देखील लागू करण्यात आले आहे.

भरती परीक्षा रद्द करण्याची मागणी

एसओजीने या प्रकरणाचं बिंग फोडल्यापासून हा मुद्दा प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर सातत्याने गाजत आहे. मात्र, दरम्यानच्या काळात ही भरती रद्द करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

या भरतीमध्ये फसवणूक झालेल्यांची संख्या चारशेपर्यंत असल्याचा दावा राज्यातील भाजप सरकारमधील कॅबिनेट मंत्री डॉ. किरोडीलाल मीणा यांनी केला आहे. ही भरती रद्द करण्याची मागणी त्यांनी आपल्याच सरकारकडे केली आहे.

या भरतीमध्ये एका महिलेसाठी डमी उमेदवार म्हणून पुरुषाने परीक्षा दिल्याचा दावा किरोडीलाल यांनी केलाय. फसवणुकीचं यापेक्षा मोठं उदाहरण काय असू शकतं?

राजेश खंडेलवाल
फोटो कॅप्शन, जयपूरच्या शाळेतील त्या परीक्षा केंद्राचे अधीक्षक राजेश खंडेलवाल

एसओजीच्या कारवाई नंतर हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आलं. ही भरती रद्द करण्याची मागणी लोकांकडून केली जातेय. मात्र, अद्याप एसओजीचा तपास सुरू आहे. एडीजी एसओजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.

आणखी मोठ्या प्रमाणात अटक झाल्यास भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

यावर तरुण काय म्हणाले?

जोधपूरच्या शेरगड मध्ये राहणारी 23 वर्षीय सरिता चौधरीनेही ही उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती. दोन वर्षे तयारी करूनही तिची निवड झाली नाही.

पण, ज्यांनी फसवणूक करून त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला त्यांना शिक्षा होत असल्याचा तिला आनंद आहे.

सरिता सांगते, "माझे वडील शेतकरी आहेत, शेतीतून मिळणाऱ्या कमाईवरच कुटुंबाचं पोट भरतं. त्यामुळे आम्ही शहरात जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही, आम्ही गावातूनच मेहनत करतो. पण, पेपर फुटण्याच्या बातमीने आमची स्वप्नंच धुळीला मिळतात."

या कारवाईनंतर पेपरफुटी थांबण्याची काही आशा आहे का, या प्रश्नावर ती सांगते, "पेपरफुटी थांबेल, अशी आम्हाला आशा आहे. पण गैरकृत्यांमध्ये सहभागी असलेले प्रशिक्षणार्थी जेव्हा पकडले जातात तेव्हा आशेचा किरण दिसतो."

राजस्थान

धोलपूर जिल्ह्यातील 23 वर्षीय विष्णू कुमारनेही या परीक्षेसाठी दोन वर्षांपासून तयारी केली होती. परीक्षा देण्यासाठी त्याला धौलपूरपासून चारशे किलोमीटर अंतरावर असलेलं कोटा शहर गाठावं लागलं होतं.

तो सांगतो, "खूप तयारी केली होती, पण पेपर फुटल्याने ग्रामीण भागातील तरुणांच्या आशा भंग पावल्या आहेत."

"ही भरती तीन ते चार वर्षांतून एकदा येते. तीन वेळा प्रयत्न करता करता आपण कधी कमाल वयोमर्यादेपर्यंत पोहोचतो हे देखील कळत नाही. आता मी पुन्हा एसआय परीक्षेची तयारी करतोय. पण, आरपीएससीमध्येच जर हेराफेरी होत असेल तर अपेक्षा कशाची करायची");