'या राम मंदिराच्या पायऱ्याही आम्हाला चढू दिल्या जात नाहीत' - ग्राऊंड रिपोर्ट

रेशम बाई
फोटो कॅप्शन, रेशम बाई
  • Author, सलमान रावी
  • Role, बीबीसी प्रतिनिधी

मध्य प्रदेशमधील सीहोर जिल्ह्यातील खेरी गावात आजही दलितांना मंदिराची पायरी चढू दिली जात नाही. इथल्या राम मंदिरात दलितांना प्रवेश नसल्यानं बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं. या दलितांच्या घरात पूजा करण्यास पुजारीही येत नाही.

खेरी गावात जाऊन बीबीसीचे प्रतिनिधी सलमान रावी यांनी परिस्थिती जाणून घेतली. वाचा सविस्तर ग्राऊंड रिपोर्ट :

हा निव्वळ योगायोगच होता की, आम्ही खेरी गावातून जात होतो. इथे जवळच एका बातमीसंदर्भात आम्ही आलो होतो.

तिथून परतत असताना थोड्याच अंतरावर दोन-तीन गावकऱ्यांनी आमच्या गाडीला हात देत थांबवलं. यातील एका गावकऱ्याचे नाव मदनलाल होतं. ते म्हणाले, "आमचंही म्हणणं ऐका... आमच्या समस्येबद्दलसुद्धा ऐकून घ्या."

ते ऐकून आम्ही गाडीतून उतरलो आणि त्यांच्याशी बोलू लागलो. ते पाहून त्यांच्या वस्तीतील इतरही गावकरी आमच्याजवळ आले. मग आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या वस्तीत गेलो. हे छोटेसं गाव सीहोर जिल्ह्यातील इछावर मध्ये येतं. वस्तीतील लोक पुढं चालू लागले आणि आम्ही त्यांच्या मागोमाग चालत होतो.

त्यावेळेस मदनलाल म्हणाले, "खेरी गावातील ही दलितांची वस्ती आहे."

या वस्तीत साधारण 150 घरं आहेत. मग एका गावकऱ्याने सांगितलं, "आम्हाला मंदिरात प्रवेश देत नाहीत. आमच्या घरी पुजारीदेखील येत नाहीत. देवाचं दर्शन आम्हाला बाहेरूनच घ्यावं लागतं. सुरूवातीपासूनच आमच्याबरोबर भेदभाव होतो आहे. हेच तुम्हाला सांगायचं होतं."

भेदभावामागचं कारण

सीहोरच्या जिल्हा मुख्यालयापासून हे गाव 70 किलोमीटर अंतरावर आहे.

वस्तीच्या आतील भागात गेल्यानंतर आम्हाला महिलांचा एक गट दिसला. त्या भजन गाऊन आराध्य देवाचं नामस्मरण करत होत्या. कच्च्या-पक्क्या स्थितीतील घरांबाहेरील व्हरांड्यात छोट्या छोट्या गटांनी लोक जमा झालेले होते.

गावकरी

त्यामध्येच रेशमबाई बसलेल्या होत्या. इतकी पुरुष मंडळी आपल्या दिशेने येत असलेली पाहून महिलांनी डोक्यावरून पदर घेण्यास सुरूवात केली. साहजिकच आहे, गावात एक परंपरा असते. गावातील लोक जे या महिलांचे नातेवाईक किंवा शेजारी आहेत त्यांच्यासमोर या महिला डोक्यावरून पदर घेतात.

मग एक-एक करत महिलांनी त्यांची घरं दाखवण्यास सुरूवात केली. त्या सांगू लागल्या की भेदभाव असल्यामुळे त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही.

त्या वस्तीतच राहणाऱ्या लीलाबाई म्हणाल्या त्यांच्या घरांची अतिशय दुर्दशा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांसाठी लग्नाची स्थळं येणंदेखील बंद झालं आहे. लीला बाईंचा आरोप होता की त्यांच्या वस्तीतील लोकांना पावलागणिक भेदभावाला तोंड द्यावं लागतं आहे.

दलित वस्तीतील लोक

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याच गावातील रेशम बाई सांगतात, त्यांनी एक व्रत ठेवला होता आणि तो संपल्यावर त्यांना इथे पूजा करायची होती. मात्र मंदिरातील पुजाऱ्याने त्यांच्याकडे पुजेसाठी येण्यास नकार दिला.

रेशम बाई म्हणाल्या, "गावातील एकमेव राम मंदिरात आम्हाला जाऊ दिलं जात नाही. मंदिराच्या पायऱ्यादेखील आम्हाला चढू दिल्या जात नाहीत. मंदिराच्या आतदेखील जाऊ देत नाहीत. आमच्या वस्तीत जेव्हा एखादं लग्नकार्य होतं तेव्हा कुळाचार पूर्ण करण्यासाठी मंदिरात नारळ घेऊन जावं लागतं."

"मंदिरात पूजा होते, तेव्हा आम्ही बाहेरूनच हळद आणि तांदूळ टाकून परत येतो. त्यांच्या जातीतील एखाद्या तरुणाला नारळ द्यावा लागतो. मग तो तरुण मंदिरात जाऊन नारळ देवाला अर्पण करतो आणि आम्ही बाहेरूनच हात जोडून परत येतो."

या दलित वस्तीतील लोकांचा आरोप आहे की, त्यांनी अनेकदा हा मुद्दा इतर समाजातील लोकांसमोरदेखील मांडला आहे. पंचायतमध्ये, सरपंचासमोर मांडला आहे. मात्र आतापर्यत यातून कोणताही मार्ग निघालेला नाही.

या दलितांच्या म्हणण्यानुसार गावातील स्मशान भूमिमध्ये देखील अत्यंसंस्कार करण्यासाठी दलितांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

'आमच्यासाठी कोणतंही मंदिर नाही...'

बलदेव सिंह जांगडा यांचा जन्म याच वस्तीत झाला आणि आता त्यांची मुलंदेखील इथेच मोठी होत आहेत. ते म्हणतात, ''जेव्हापासून मला कळू लागलं तेव्हापासून मी या भेदभावाला तोंड देत आलो आहे आणि तो आजही होतो आहे.''

आपल्या घराच्या व्हरांड्यात बसून बीबीसीशी बोलत असताना ते म्हणाले, "आमचं तर कोणतंही मंदिर नाही. कधीही नव्हतं. फक्त त्यांचच (इतर समाज) मंदिर आहे.

"आवश्यकता असल्यावर आम्ही मंदिरात जातो. मात्र बाहेरूनच दर्शन करून परत येतो. आम्हाला आत जाण्यास मनाई आहे. त्यामुळे आम्ही मंदिराच्या आत जात नाही. हा जातीपातीचा भेदभाव आहे. म्हणून आम्हाला आत जाऊ देत नाहीत."

बलदेव सिंह जांगडा
फोटो कॅप्शन, बलदेव सिंह जांगडा

एका प्रसंगाबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, "मंदिरात सुरू असलेले कथा-प्रवचन ऐकण्यासाठी त्यांच्या वस्तीतील एक माणूस गेला होता. तो प्रसाद घेण्यासाठी पायऱ्या चढून आत गेला होता. त्यावेळेस दुसऱ्या समाजातील एका माणसाने त्याला बाहेर काढलं. त्या माणसाने आत गेलेल्या दलित व्यक्तीला सांगितलं की तुम्ही इथे आत यायचं नाही. बाहेरूनच प्रसाद घेत जा."

या वस्तीच्या बाहेर, अगदी रस्त्याच्या कडेला एक पाण्याचा हॅंड पंप आहे.

तिथूनच वस्तीतील सर्व महिला पाणी भरतात. वस्तीतील लोक सांगतात, पाण्यासाठी तो हॅंड पंप हाच त्यांच्यासाठी एकमेव आधार आहे. कारण गावात नळाद्वारे जो पाणीपुरवठा होतो त्यातून त्या दलित वस्तीतील लोकांना पाणी दिलं जात नाही.

समाजासाठी वेगळं मंदिर बांधलंय

मदनलाल सांगतात, पाण्याचं कनेक्शन देण्यासाठी त्यांच्याकडून देखील पैसे घेण्यात आले आहेत. मात्र गावात जी पाण्याची टाकी आहे त्यातून दलितांच्या वस्तीला पाणीपुरवठा होत नाही. मदनलाल यांचा आरोप आहे की यामागे भेदभाव हेच कारण आहे.

ते पुढे सांगतात, पाणी मिळत नाही, जमिनीचा तुकडा मिळत नाही, मंदिरात जाऊ शकत नाही. पूजा करायची तर पंडित मिळत नाही. आमच्या घरी पंडित येतंच नाही. ते आम्हाला अस्पृश्य मानतात आणि भेदभाव करतात. हा जातीपातीचा भेदभाव आहे. हा चांभार आहे, तो धोबी आहे, हा भंगी आहे अशा प्रकारचा भेदभाव केला जातो.

ही समस्या फक्त खेरी गावाचीच नाही.

मदनलाल
फोटो कॅप्शन, मदनलाल

चांदबढ गावातील लोक सांगतात की सीहोर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दलित कुटुंबांना दैनंदिन कामातदेखील भेदभावाला तोंड द्यावं लागतं.

चांदबढ हा सीहोर जिल्हा मुख्यालयालगत असलेला परिसर आहे. इथे दलितांची लक्षणीय लोकसंख्या आहे.

येथील लोकांचा आरोप आहे की, या भेदभावामुळेच त्यांनी आता त्यांच्या समाजासाठी वेगळं मंदिर बनवलं आहे. आता त्यांना कोणी मंदिरात जाण्यास अडवू शकत नाही.

अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर

वसंत कुमार मालवीय त्यांच्या समाजात खूप सक्रिय आहेत. त्यांनीच दलितांना वेगळं मंदिर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली आहे.

मात्र वेगळं मंदिर बनवण्याची वेळ का आली? हा प्रश्न बीबीसीने विचारल्यावर त्यांचं म्हणणं होतं की, 'दलितांना मंदिरात जाण्यास मज्जाव करण्यात येतो त्यामुळेच ही वेळ आली आहे.'

वसंत कुमार मालवीय
फोटो कॅप्शन, वसंत कुमार मालवीय

ते पुढे सांगतात, 22 जानेवारीलला अयोध्येत श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर सर्व ठिकाणी आणि खास करून मंदिरात भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात आले. त्यांनी आरोप केला की जेव्हा दलित लोक त्या भंडाऱ्यात गेले तेव्हा त्यांना वेगळं बसून जेवण देण्यात आलं. दलितांकडून स्थानिक मंदिरांसाठी वर्गणीदेखील घेतली जात नाही.

बसंत कुमार मालवीय पुढे सांगतात, ''राजकारणी जेव्हा मतं मागायला येतात तेव्हा सांगतात की आपण सर्व बंधू-भगिनी आहोत. निवडणुकांच्या वेळेस आम्हाला सांगतात तुम्ही आमचे भाऊ आहात. त्यावेळेस राजकारणी

अगदी मांडी मारून आमच्या घरात बसतात. मात्र निवडणुका संपल्या की तेच आम्हाला वाईट वागणूक देतात. म्हणतात, तुम्ही दलित आहात, दूर राहा. खाली बसा, आमच्या जवळ का आलात");