समृद्धी महामार्ग बस अपघात : 'आई, बायको, मुलगी गेली, आता एकटाच उरलो'

- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
“माझी आई, पत्नी आणि मुलीचा अपघातात मृत्यू झाला. माझ्यासोबत जे घडलं ते इतर कुणासोबतही घडू नये. दोन वर्षांपूर्वी माझे वडील कोरोनामुळे गेले. आता घरी मी एकटाच उरलो आहे", असं परिणित वनकर सांगतात.
समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे येत असलेल्या एका खासगी प्रवासी बसला शनिवारी (1 जुलै) पहाटे दीडच्या सुमारास बुलडाण्यानजीक अपघात झाला. या अपघातात परिणित यांनी सर्वस्वच गमावलं.
विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला झालेल्या या अपघातात 25 जण जागीच ठार झाले तर 8 जण बचावले आहेत. जीव गमावावा लागलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून प्रत्येकाचंच मन हेलावलं आहे.
मृतांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचं प्रवासाचं कारण आदी गोष्टी आता समोर येत आहे. यामध्ये कुणाला नवी नोकरी लागलेली होती. तर कुणी अॅडमिशनचं काम करून घरी परतत होतं.
या बस अपघाताने मृतांच्या कुटुंबीयांचं होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलेलं आहे. तर, काही कुटुंबांवर झालेला आघात तर कधीच भरून निघण्यासारखा नाही.
पुण्यातील पिंपळे सौदागर परिसरात राहणारे परिणित वनकर यांनाही असाच एक आघात सोसावा लागला. 40 वर्षीय परिणित वनकर यांनी समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातात आपली आई, पत्नी आणि मुलीला यांना गमावलं.
परिणित यांच्या वडिलांचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गामुळे झाला होता. दोन वर्षांच्या कालावधीत आपल्या कुटुंबातील 4 सदस्यांना गमावल्यानंतर परिणित घरी एकटे उरले आहेत.
परिणित वनकर हे पिंपळे सौदागर परिसरातील जरवरी सोसायटीमध्ये 2014 पासून राहत होते. ते एका मोठ्या कंपनीत नोकरी करतात. शनिवारी पहाटे गाडीचा अपघात झाल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास परिणित वनकर यांना अपघाताची वार्ता कळली. ही माहिती मिळताच परिणित आपल्या मेहुण्यासोबत घटनास्थळी रवाना झाले होते.