सैफ अली खानवर हल्ल्याचा नुसता संशय; आकाशची नोकरी गेली अन् लग्नही मोडलं

फोटो स्रोत, ANI/Facebook
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी संशयित आणि तापसासाठी अनेकांना ताब्यात घेतलं होतं. आकाश कनोजिया हा ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक.
आकाशला पोलिसांनी नुसतं संशयित म्हणून ताब्यात घेतलं, पण यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय.
नुसत्या या संशयाच्या फेऱ्यानं आकाशची केवळ नोकरीच गेली नाही, तर त्याचं ठरलेलं लग्नही तुटलं.
आकाशला सैफवरील हल्ल्यातील संशयित ठरवल्यानं किती गोष्टींना तोंड द्यावं लागलं आणि लागतंय, याची सविस्तर आढावा बीबीसी मराठीनं घेतला आहे.
19 जानेवारीला मुंबईतील वांद्र्यातील राहत्या घरी सैफ अली खानवर एका आरोपीने हल्ला केला. या प्रकरणानंतर देशभर खळबळ उडाली. मुंबई पोलिसांची अनेक पथकं आरोपीचा शोध घेत होती.
या शोधादरम्यान मुंबई पोलिसांनी मुंबईतले 300 हून अधिक सीसीटीव्ही आणि 50 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले. तसंच, अनेक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.
या चौकशीदरम्यानच मुंबईत राहणाऱ्या आकाश कनोजिया या तरुणाला संशयित म्हणून रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आणि माहिती प्रसिद्ध केल्यामुळे आकाश कनोजियाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
कोण आहे आकाश कनोजिया ?
आकाश कनोजिया हा 31 वर्षाचा तरुण आहे. आकाश मुंबईतील कुलाबा-कफ परेडमधील झोपडपट्टी परिसरामध्ये तो राहतो.
रेल्वेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या चारचाकी वाहनावर कंत्राटी पद्धतीने आकाश कामाला होता.
आकाशवर मुंबईत आणि इतर काही ठिकाणी चोरीसह इतर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी पोलिसांशी त्याचा संबंध आलेला आहे.


मुंबई पोलिसांनी सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी अनेक संशयित ताब्यात घेतले. त्यावेळेला आकाश कनोजिया याचा देखील पोलीस शोध घेत होते, कारण सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती आकाशसारखी दिसत होती, असा पोलिसांना संशय होता.
आकाश कनोजियाला का आणि कसं पकडलं?
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीसारख्या संशयितांना ताब्यात घेत होते. त्यादरम्यान आकाश कनोजिया याचं वय आणि सीसीटीव्ही दिसणारा चेहरा यामध्ये काहीसं साम्य पोलिसांना आढळलं. त्यामुळे पोलीस आकाश कनोजिया याचा शोध घेत होते.
त्यावेळेला पोलिसांनी आकाशला फोन केला आणि त्याला तपासासाठी बोलावण्यात आलं. मात्र, आकाश चौकशीला न जाता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस पकडून छत्तीसगडच्या दिशेने निघाला. तो त्याच्या होणाऱ्या बायकोला भेटण्यासाठी निघाला होता.
यादरम्यान रेल्वे पोलिसांनी राजनांदगांव स्टेशनवर आकाशला ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांना व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधून दिला.
यानंतर मुंबई पोलिसांची एक टीम त्याला आणायला गेली.
या सर्व घटनाक्रमाच्या दरम्यान आकाश कनोजिया याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा फोटो आणि माहिती माध्यमांपर्यंत पोहोचली आणि ही माहिती प्रसारित करण्यात आली.

फोटो स्रोत, facebook
19 जानेवारी 2025 रोजी सैफ अली खान हल्ल्याप्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजाद याला ठाण्यातून अटक केली. यानंतर अटक केलेल्या आकाशला चौकशीअंती सोडून देण्यात आलं. मात्र, त्याला ताब्यात घेतल्यामुळे आणि त्याची माहिती सर्वत्र पसरल्यामुळे त्याच्या आयुष्यावर मोठा परिणाम झालाय.
आकाश कनोजियाला या प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर त्याची नोकरी गेली आहे. तसंच, जुळत असलेलं लग्नदेखील मोडलं आहे. मुंबईत आणि गावात नातेवाईक, तसंच मित्रांमध्ये त्याची मानहानी झाली.
यासंदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना आकाश कनोजिया म्हणाला की, "या प्रकरणामुळे समाजात माझी आणि कुटुंबीयांची प्रतिमा मलीन झाली. माझं व्यवस्थित सुरू असलेलं जीवन उद्ध्वस्त झालंय. माझ्या रोजगारावर आणि आयुष्यावर याचा परिणाम झालाय. या प्रकरणानंतर माझ्या या सगळ्या परिस्थितीला आता जबाबदार कोण? या संदर्भात मला न्याय हवा. अन्यथा मी पुढे कोर्टात दाद मागणार आहे."
आकाशची माहिती पसरवण्यास जबाबदार कोण?
19 जानेवारीला अभिनेता सैफ अली खान याच्या घरामध्ये चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या मोहम्मद शहजाद याने सैफ अली खान वर वार केले आणि त्याला गंभीर जखमी केले. यानंतर घरातील नर्सच्या जबाबानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला.
तेव्हा संशयिताच्या फोटोसह नावही जाहीर करण्यात आलं. त्यात आकाश कनोजियाचं नाव जाहीर करण्यात आलं. प्रत्यक्षात आकाश या प्रकरणातील आरोपी नव्हता आणि नाही. किंबहुना, त्याचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही.

फोटो स्रोत, X/ANI
यात आकाश कनोजिया याने पोलिसांवर आणि माध्यमांवर देखील सवाल उपस्थित केलाय.
आकाश म्हणतो की, "माझा फोटो आणि माझी माहिती मी संशयित असताना का प्रसारित करण्यात आली? आणि ही माहिती नक्की कोणी प्रसारित केली? याचा देखील तपास व्हायला हवा."
'पोलिसांच्या एका चुकीने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं'
आकाश कनोजिया या प्रकरणासंदर्भात पुढे बोलताना म्हणाला की, "जेव्हा मीडियाने माझी छायाचित्रे दाखवायला सुरुवात केली आणि मी या प्रकरणातील प्रमुख संशयित असल्याचा दावा केला, तेव्हा माझ्या कुटुंबाला धक्का बसला आणि ते वारंवार रडत आहेत."
आकाश पुढे म्हणतो की, "पोलिसांच्या एका चुकीने माझे आयुष्य उद्ध्वस्त झालंय. मला मिशा आहेत आणि सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला मिशा नाहीत, यावरून तरी पोलिसांना लक्षात यायला हवं होतं की, मी तो नाही. मी स्वतः देखील पोलिसांना सांगत होतो मात्र माझ कोणीही ऐकलं नाही."
पोलिसांनी मारहाण केल्याचाही आरोप
आकाश कनोजिया पोलिसांचा फोन आल्यावर पोलिसांना चौकशीसाठी का भेटायला गेला नाही, यासंदर्भात आकाश म्हणाला की, या घटनेनंतर मला पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारले की मी कुठे आहे?
"मी घरी असल्याचे सांगितल्यावर कॉल कट झाला. नंतर मी माझ्या भावी वधूला भेटण्यासाठी जात होतो, तेव्हा मला दुर्गमध्ये ताब्यात घेण्यात आले आणि नंतर रायपूरला नेण्यात आले. तेथे पोहोचलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकानेही मला मारहाण केली," असं आकाश सांगतो.
मात्र, याबाबत पोलिसांनी यावर अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आकाशचं ठरलेलं लग्न मोडलं
आकाशचं लग्न ठरलं होतं. मात्र, तेही या सगळ्या प्रकरणामुळे मोडलं आहे.
आकाश सांगतो, "सुटका झाल्यानंतर आईशी संपर्क केला, त्यानंतर आईने त्याला घरी येण्यास सांगितले. पण आता माझं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही. पूर्णपणे अस्थिर, अशांत झालंय.
"दुसऱ्या दिवशी मी माझ्या बॉसला फोन केला, तेव्हा त्यांनी मला कामावर न येण्यास सांगितले. त्याने माझे ऐकण्यास नकार दिला.
"तसंच, माझ्या आजीने मला सांगितलं की, माझ्या भावी वधूच्या कुटुंबाने मला ताब्यात घेतल्यानंतर लग्नाची चर्चा पुढे नेण्यास नकार दिला आहे."
आकाशला पकडल्यावर पोलिसांनी काय म्हटलं होतं?
मुंबई पोलिसांच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांना जुहू पोलिस ठाण्यातून एक संशयित ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी संशयिताचे छायाचित्र शेअर केले.
त्या संशयिताला दुर्ग आरपीएफ चौकीत आणण्यात आले आणि व्हिडिओ कॉलद्वारे मुंबई पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

फोटो स्रोत, ANI
संशयिताला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक आज रायपूरला पोहोचेल, अशी माहिती मुनावर खुर्शीद, आयजी आरपीएफ एसईसीआर झोन, बिलासपूर यांनी त्यावेळेला दिली होती.
त्यानंतर आकाशला पकडण्यात आलं आणि मुंबईत आणण्यात आलं होतं.
न्यायालयात दाद मागणार - आकाश
आकाश कनोजिया यांनी पोलिसांवर केलेल्या आरोपा संदर्भात आणि त्याच्या झालेल्या बदनामीसंदर्भात मुंबई पोलिसांची बीबीसी मराठी प्रतिनिधींनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क झालेला नाही.
पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया मिळाल्यास या बातमीत अपडेट केली जाईल.
मात्र, आकाशचा आरोप आहे की, पोलिसांच्या या चुकीमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. मला न्याय मिळाला नाही, तर पुढे या संदर्भात न्यायालयात दाद देखील मागणार आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)