राज कपूर@100 : अवघ्या 26 व्या वर्षी जगभर ख्याती पोहोचलेला, चित्रपटसृष्टीवर 'राज' करणारा माणूस

फोटो स्रोत, Puneet
- Author, प्रदीप कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
14 डिसेंबर, 1924... सध्याच्या पाकिस्तानातल्या पेशावरमधील लायलपूर नावाच्या भागात जन्म झालेलं राजरत्न.. अर्थात राज कपूर. भारतीय सिनेमाला जगभरात लोकप्रिय करणाऱ्या मोजक्या चित्रकर्त्यांपैकी एक.
आजच्या इंटरनेटच्या सुपरफास्ट जमान्यात त्या काळाची कल्पना करणंही कठीण. पण अशी कुठलीही आधुनिक साधनं नसताना राज कपूर यांनी 70 वर्षांपूर्वी भारतीय सिनेमाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं.
राज कपूर यांचा 'आवारा' रशियातल्या सर्वांत लोकप्रिय चित्रपटांमध्ये गणला जातो. त्यांच्या सिनेमातून समाजवादाचा प्रभाव दिसत असला तरी या चित्रपटांची जादू इराण, तुर्कस्तान, अमेरिका, चीन आणि पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आजही कायम असल्याचं दिसतं.
राज कपूर यांची चित्रपट क्षेत्रातील कारकीर्द 40 वर्षांची होती. पण पहिल्या तीन वर्षांमध्येच त्यांनी उदंड यश, प्रसिद्धी, लोकप्रियता, संपन्नता आणि महान व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा निर्माण केली होती.
1947 मध्ये केदार शर्मा यांच्या नीलकमल चित्रपटात राज कपूर हिरो म्हणून दिसले. त्यानंतर पुढच्याच वर्षी 1948 मध्ये 'आग' चित्रपटाद्वारे आर. के. फिल्म्सचं बॅनर त्यांनी सुरू केलं. या चित्रपटाचा विषय राज कपूर यांनी त्यांच्या खऱ्या-खुऱ्या आयुष्यातून उचलला होता.
राज यांचे आजोबा आपल्या मुलाने म्हणजे पृथ्वीराज कपूर यांनी त्या काळात समाजात रुबाब आणि प्रतिष्ठा वाढवणाऱ्या वकिली पेशात रमावं अशा विचारांचे होते.
पण पृथ्वीराज कलाप्रेमी. त्यांनी वडिलांविरोधत, घरच्यांविरोधात अक्षरशः बंड करून नाटक आणि चित्रपटांचा रस्ता निवडला होता. राज कपूर यांनी त्यांच्या वडिलांचा हाच अनुभव त्यांच्या पहिल्या चित्रपटाद्वारे पडद्यावर उतरवला.
पृथ्वीराज कपूर यांनी मात्र पेशावरहून त्या काळच्या कलकत्यात आणि नंतर थेट मुंबईत कला क्षेत्रात धडपड सुरू केली. लवकरच त्या काळातील दमदार कलाकार म्हणून ते मुंबईत प्रस्थापित झाले.
राज कपूर हे पृथ्वीराज यांचं सर्वांत मोठं अपत्य. लहानपणापासून चित्रपट व्यवसायाचा प्रभाव त्यांच्यावर होता. वडिलांच्या सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणूनही राज यांनी कामं केली होती. हळूहळू अभ्यासावरून त्यांचं मन उडालं आणि तेही चित्रपट क्षेत्रातच काहीतरी करण्यासाठी आसूसले.
त्या काळच्या मॅट्रिकच्या परीक्षेत चक्क नापास झाले आणि त्यांनी तेव्हाच वडिलांना सांगून टाकलं की, चित्रपट क्षेत्रातच आपल्याला रस आहे. या व्यवसायातले बारकावे शिकून घेण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.
पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या मुलामधले गुण सुरुवातीच्या काळातच हेरले होते. राज कपूर यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमधून वडिलांबद्दल उल्लेख केले आहेत. वडिलांच्या कीर्तीचा आपल्याला सुरुवातीच्या काळात बराच फायदा झाल्याचे राज कपूर यांनी अनेकदा कबूल केलं आहे.


बीबीसीच्या चॅनेल 4 साठी सिमी गरेवाल यांनी लिव्हिंग लीजंड - राज कपूर या नावाने त्यांच्यावर 1986 साली एक डॉक्युमेंट्री केली होती.
या डॉक्युमेंट्रीसाठी बोलताना राज कपूर सांगतात, "पापाजींनी सांगून टाकलं होतं की, फिल्ममेकिंच्या छोट्या छोट्या गोष्टी शिकून घे. चौथ्या- पाचव्या असिस्टंटची कामं त्यासाठी करावी लागली. सेटवर झाडू-पोछा करण्यापासून फर्निचर- सामान इकडे-तिकडे हलवण्यापर्यंत सगळी कामं मी त्या काळात केली.
मी त्या काळातल्या सेलेब्रिटी अॅक्टरचा मुलगा जरूर होतो. पण माझी स्वतःची ओळख शून्य होती. आय वॉज नो बडी. दोन पँट-शर्ट, रेनकोट, छत्री याशिवाय गमबूट मिळाले होते.. बस! वरखर्चाला महिना दहा रुपये दिले जायचे."
ही शिकवण शालेय काळापासूनच होती. राज कपूर यांची मुलगी ऋतू नंदा यांनी 'राज कपूर स्पीक्स' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये त्या लिहितात – "राज कपूर सर्वसाधारण मुलांप्रमाणे त्या वेळी ट्रामने शाळेत जायचे. एक दिवस तुफान पाऊस पडत होता.
त्या वेळी राज यांनी आईला विचारलं आज शाळेत कार घेऊन जाऊ का? त्यावर आई म्हणाली – वडिलांना विचारून सांगते. वडिलांना – पृथ्वीराज कपूर यांना कळलं तेव्हा ते म्हणाले की, या पावसात पाण्याच्या मारा सहन करत शाळेत पोहोचण्यात खरं थ्रिल आहे. त्याला याचाही अनुभव असायला हवा."
वडिलांच्या सावलीतून बाहेर
राज कपूर दाराआडून आई-वडिलांचं बोलणं ऐकत होते. मग त्यांनी स्वतःहच वडिलांना सांगितलं की, "सर, मी ट्रामनेच शाळेत जाणार."
ऋतू नंदा यांनी या आठवणीनंतरचा किस्साही लिहिला आहे. "पृथ्वीराज कपूर यांनी बाल्कनीतून राज यांना त्या पावसात भिजत शाळेत जाताना पाहिलं, तेव्हा बायको, रामसमी यांना म्हणाले की, बघ हा मुलगा एक दिवस वडिलांपेक्षा मोठा होईल आणि याच्याकडे वडिलांपेक्षा फॅन्सी कार असतील."
'द कपूर्स – द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा' या बहुचर्चित पुस्तकात मधू जैन यांनीही साधारण या प्रकारचा एक किस्सा लिहिला आहे.
जैन लिहितात, "एकदा पृथ्वीराज कपूर घराबाहेर पडत असताना त्यांनी राजला तिथे उभा असलेला पाहिलं आणि विचारलं, 'तू अजून स्टुडिओत का नाही गेलास");