विजय माल्ल्या : RCB च्या मालकीची कहाणी ते भारतात परतण्याबाबतचं वक्तव्यं; काय म्हणाले मुलाखतीत?

विजय माल्ल्यांनी सोशल मीडियावर मुलाखत शेअर करताना किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विजय माल्ल्यांनी सोशल मीडियावर मुलाखत शेअर करताना किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. (फाइल फोटो)

मद्य व्यावसायिक विजय माल्ल्या पुन्हा एकदा भारतात चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी अलीकडेच यूट्यूबर राज शमानीला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक मोठे दावे केले आहेत.

"मी भारत सोडताना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांना सांगितलं होतं की, मी लंडनला जात आहे. मला जिनिव्हामध्ये एका बैठकीत सहभागी व्हायचं आहे. मी परत येणार आहे. कृपया बँकांना माझ्यासोबत बसून तोडगा (सेटलमेंट) काढण्यास सांगा," असं विजय माल्ल्या मुलाखतीत म्हणाले.

अरुण जेटली यांच्यासोबत बसून औपचारिक भेट घेतली, असा दावा कधीच केला नाही, असंही ते म्हणाले. संसदेत झालेल्या भेटीदरम्यान ही सर्व चर्चा झाल्याचं ते म्हणाले.

यापूर्वी 2018 मध्येही माल्ल्यांनी भारत सोडण्यापूर्वी अरुण जेटलींची भेट घेतल्याचा दावा केला होता. मात्र, त्या वेळी अरुण जेटली यांनी हा दावा फेटाळून लावला होता.

सध्या विजय माल्ल्या ब्रिटनमध्ये राहत आहे. 2016 साली भारत सोडल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा त्यांना परत भारतात आणण्यासाठी ब्रिटनच्या न्यायालयात कायदेशीर लढा देत आहेत.

माल्ल्यांवर आरोप आहे की, त्यांनी किंगफिशर एअरलाइन्स कंपनीसाठी बँकांकडून कर्ज घेतलं आणि ते न फेडताच ते देशाबाहेर निघून गेले.

हे कर्ज सुमारे 10 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. किंगफिशर एअरलाइन्स आर्थिक अडचणींमुळे बंद पडली आहे.

या मुलाखतीत माल्ल्या यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची उभारणी कशी झाली याचा किस्सा सांगितला. त्याचबरोबर भारतात परतण्याबाबत आणि त्यांना 'फरार' म्हणण्यावरही प्रतिक्रिया दिली आहे.

माल्ल्यांनी ही मुलाखत एक्सवर शेअर केली आणि किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांची माफीही मागितली आहे.

त्यांनी एक्सवर लिहिलं की, "गेल्या नऊ वर्षांत मी पहिल्यांदाच या पॉडकास्टमध्ये माझं म्हणणं मांडलं आहे. मला किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांची माफी मागायची आहे. तसेच सत्य आणि तथ्यांसह माहिती स्पष्टपणे मांडायची आहे."

जेटलींशी भेटीबद्दल आणखी काय म्हणाले?

राज शमानीनं मुलाखतीदरम्यान माल्ल्यांना विचारलं, "तीन मार्च 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयात तुमच्या प्रकरणाची सुनावणी होती आणि तुम्हाला सुप्रीम कोर्टसमोर हजर राहायचं होतं.

एक मार्चला तुम्ही दिल्लीत होता, संसदेत गेला आणि दोन मार्चला तुम्ही देश सोडून जाता. सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याच्या एक दिवस आधी, हे सर्व योग्य आहे का");