शेतकरी आंदोलन : खनौरी बॉर्डरवर मृत्यू झालेला तरुण नेमका कोण होता?

शुभकरन सिंग

फोटो स्रोत, BKU (SIDHUPUR)

फोटो कॅप्शन, 24 वर्षीय शुभकरन सिंग यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला

पंजाब आणि हरियाणादरम्यानच्या शंभू आणि खनौरी बॉर्डरवर बुधवारी प्रचंड गोंधळाची परिस्थिती पहायला मिळाली.

या तणावाच्या परिस्थितीतच खनौरीमध्ये एका तरुणाचा गोळी लागल्यानं मृत्यू झाल्याची बातमी आली आहे.

शेतकरी संघटनांबरोबरच पंजाब सरकारनंही या तरुणाच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

खनौरी बॉर्डरवर उपस्थित असलेले जसवीर सिंग हे शुभचे जवळचे नातेवाईक आहेत.

मृत तरुण शुभकरण सिंग शेतकरी आणि पोलिसांमध्ये सुरू असलेल्या संघर्षापासून 500 गज(जवळपास 450 मीटर) अंतरावर शेतांमध्ये उभा होता, असा आरोप जसवीर यांनी केला आहे.

"त्याचवेळी अचानकच शुभला गोळी लागली आणि तो खाली पडला," असं ते म्हणाले.

संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय)चे नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी सांगितलं की, मोर्चा काढणाऱ्या शेतकरी नेत्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

मात्र, हरियाणा पोलिसांनी कोणत्याही शेतकऱ्याच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे.

पतियाळा येथील राजिंद्र रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरनाम सिंग रेखी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान खनौरी सीमेवर झालेल्या कथित गोळीबारात 24 वर्षीय शुभकरन सिंगचा मृत्यू झाला आहे.

"डोक्याच्या मागील बाजूस बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याला पतियाळा येथील राजिंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आलं होतं."

शवविच्छेदनानंतरच सविस्तर माहिती समोर येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. संबंधित तरुणाचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.

कोण होता मृत तरुण?

बीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी गगनदीप सिंग यांना मिळालेल्या माहितीनुसार, शुभकरण सिंग बठिंडा जिल्ह्याच्या बालोन या गावातील रहिवासी होते.

ते कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असलेले कुटुंबातील एकटे कमावते व्यक्ती होते. काका बलजित यांच्या साथीनं ते शेती व्यवसाय करायचे.

त्यांच्या कुटुंबाकडं फक्त दोन एकर जमीन होती. पण ते दुसऱ्याची 15 एकर जमीनही भाड्यानं (बटाईनं किंवा ठोक्यानं) कसत होते.

बलजित सिंग यांनी पुतण्याबद्दल बोलताना म्हटलं की, "शुभकरणच्या आईचा मृत्यू 15 वर्षांपूर्वीच झाला होता. त्याच्या पश्चात कुटुंबात आजी आणि दोन बहिणी आहेत."

शुभकरन सिंग यांचे कुटुंबीय
फोटो कॅप्शन, शुभकरन सिंग यांचे कुटुंबीय

शेती बरोबरच शेतकरी आंदोलन

शुभ घरातील सर्व कामं सांभाळून शेतकरी आंदोलनामध्येही सहभागी होत होता, असं बलजित यांनी सांगितलं.

"सगळी कामं सांभाळून शुभ शेतकरी आंदोलनातही सहभागी व्हायचा. तो दिल्लीतील आंदोलनातही सहभागी झाला होता. मित्रांबरोबर तो 13 फेब्रुवारीला याठिकाणी आला होता. मी त्याला 19 फेब्रुवारीला फोन करून परत येण्यास सांगितलं होतं. पण त्यानं फेब्रुवारीत दिल्लीत पोहोचल्यानंतर परत येणार असल्याचं म्हटलं होतं," असं त्यांनी सांगितलं.

शेतकरी आंदोलक

फोटो स्रोत, REUTERS

शुभकरण सिंगनं मॅट्रिकमध्ये पास झाल्यानंतर शेती करण्याचा निर्णय घेत शिक्षण थांबवलं होतं.

'शुभ मला केंद्रीय मंत्र्यांबरोबरच्या बैठकांबाबत सांगायचा. सरकार या मागण्या नक्की मान्य करेल, अशी त्याला आशा होती,' असंही ते म्हणाले.

पंजाब सरकारने काय म्हटले?

शुभकरण सिंगच्या शवविच्छेदनानंतर पंजाब सरकार एफआयआर दाखल करून अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करेल, असं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं आहे.

पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर असल्याचं त्यांनी सांगितलं.

"आज शुभकरण सिंगचा खनौरी बॉर्डरवर मृत्यू झाला. व्हीडिओ पाहून मला प्रचंड दुःख झालं. तो अवघी दोन एकर शेती असलेला लहान शेतकरी होता. त्याला दिल्लीपर्यंत जायचं होतं. आपण आपल्या देशाच्या राजधानीपर्यंतही जाऊ शकत नाही का," असं मान म्हणाले.

पंजाब सरकारनं हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर आंदोलन होणाऱ्या ठिकाणी सुरक्षादल तैनात केले असल्याचंही मान म्हणाले.

भगवंत मान यांच्यापूर्वी पंजाबचे आरोग्य मंत्री डॉ. बलबीर सिंह यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. 'अन्नदात्यावरच अन्याय होणं हे अत्यंत वाईट आहे. त्यांना मारलं जात आहे. एका तरुणाची हत्या झाली, त्यामुळं मी भेटायला आलो आहे. आणखी एका व्यक्तीलाही मी भेटलो. सुदैवानं गोळी त्याला चाटून गेली.'

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

फोटो स्रोत, BHAGWANT MANN

पटियाला जिल्ह्यातील सरकारी रुग्णालय राजिंदरा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरनाम सिंह रेखी यांनी 22 वर्षीय शुभकरण सिंगचा गोळी लागल्यानं मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.

"मृत्यूचं प्राथमिक कारण डोक्याच्या मागच्या भागात गोळी लागणं हे आहे असं ते म्हणाले. त्यांना मृतावस्थेतच पटियालाच्या राजिंदरा सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात आणलं होतं."

यासंदर्भात अधिक माहिती पोस्ट मॉर्टर्मनंतरच समोर येईल. सध्या मृतदेह रुग्णालयातच ठेवण्यात आलेला आहे.

"बठिंडा जिल्ह्याच्या शुभकरण सिंगच्या मृत्यूची बातमी अत्यंत खेदजनक आहे. मी स्वतः व्हिडिओ पाहिला. त्याच्या डोक्याच्या मागच्या भागात गोळी लागली," असं काँग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा म्हणाले.

अकाली दलची भगवंत मान यांच्यावर टीका

या वृत्तानंतर पंजाबमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत.

एकिकडं आम आदमी पार्टीनं हरियाणा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

तर शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेसनं या प्रकरणी पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री भगवंत मान यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

"बठिंडाच्या मौरमधील तरुण शुभकरण सिंगचा हरियाणा पोलिसांच्या फायरिंगमध्ये मृत्यू झाल्यानं, संपूर्ण पंजाबमध्ये शोककळा आहे," असं शिरोमणि अकाली दलचे सुखबीर सिंग बादल यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं.

"पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांचा डबल गेम या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. दोन बहिणींनी त्यामुळं भाऊ गमावला, असं ते म्हणाले.

सुखबीर सिंग बादल

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"भगवंत मान पंजाबच्या शेतकऱ्यांच्या विरोधात हरियाणाच्या साथीनं इतर राज्यांच्या पोलिसांना पंजाबच्या धरतीवर पंजाबी लोकांवरच हल्ला करून त्यांना मारण्याची परवानगी देत आहे. कोणत्याही लोकशाहीत शांततेनं आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार केला जात नाही. निरपराध शुभकरण सिंगच्या हत्येसाठी भगवंत मान जबाबदार आहेत," असंही ते म्हणाले.

दरम्यान काँग्रेसनंही शुभकरण सिंगच्या मृत्यूप्रकरणी आम आदमी पार्टी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

सोशल मीडियावर याबाबत प्रताप सिंह बाजवा यांनी प्रतक्रिया दिली. "हरियाणा पोलिस अनेक दिवसांपासून विनाकारण फायरिंग करत आहे. आम्ही भगवंत मान यांना केंद्राबरोबर तुम्हीही दलाल बनू नका असं सांगत होतो. पंजाबच्या लोकांबरोबर, शेतकऱ्यांबरोबर उभं राहायला सांगत होतो. आता 150 पेक्षा अधिक शेतकरी जखमी आहेत, आणि तुम्ही एकही एफआयआर दाखल केलेला नाही");