सॅम माणेकशॉ: ज्यांनी इंदिरा गांधींच्या योजनेला थेट नकार देण्याचं धाडस दाखवलं होतं

सॅम माणेकशॉ इंदिरा गांधींसोबत

फोटो स्रोत, SAM MANEKSHAW FAMILY

फोटो कॅप्शन, सॅम माणेकशॉ इंदिरा गांधींसोबत
  • Author, रेहान फझल
  • Role, बीबीसी हिंदी

सॅम होरमुजजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ... पण या नावाने त्यांना क्वचितच कोणी हाक मारली असेल.

त्यांचे मित्र, बायको, नातवंडं आणि फिल्डवरचे अधिकारी असे सगळेच जण त्यांना सॅम किंवा 'सॅम बहादूर' म्हणायचे. पण त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळाली ती 1942 साली. दुसरं महायुद्ध सुरू असताना बर्मामध्ये एका जपानी सैनिकाने मशीनगनमधून झाडलेल्या सात गोळ्यांनी त्यांच्या आतडं, यकृत आणि मूत्रपिंडाला गंभीर इजा झाली.

त्यांचं चरित्र लिहिणारे मेजर जनरल व्ही. के. सिंग बीबीसीशी बोलताना सांगतात की, "त्यावेळचे कमांडर मेजर जनरल कोवान यांनी त्याचवेळी मिलिट्री क्रॉस सॅम यांच्या छातीवर लावला. कारण मृत सैनिकाला मिलिट्री क्रॉस देता येत नव्हता."

युद्ध सुरू असताना जखमींना आहे त्याच अवस्थेत टाकून पुढे जावं असा आदेश देण्यात आला होता. माणेकशॉ देखील जखमी होते. बटालियन जखमींना परत आणण्यात गुंतली तर सैन्याचा वेग मंदावेल म्हणून हा आदेश दिला होता. पण सुभेदार शेरसिंगने माणेकशॉ यांना खांद्यावर उचलून परत आणलं.

माणेकशॉ यांची प्रकृती इतकी गंभीर होती की, डॉक्टरांना त्यांच्यासाठी वेळ देणं योग्य वाटलं नाही.

त्यावेळी सुभेदार शेरसिंग यांनी आपली लोड केलेली रायफल डॉक्टरांच्या दिशेने रोखत म्हटलं की, "जपान्यांबरोबर लढताना जखमी झालेल्या अधिकाऱ्यांना खांद्यावर टाकून आम्ही इथवर आलोय. तुम्ही उपचारच केला नाही म्हणून त्यांचा जीव गेला आणि हे सगळं आमच्या डोळ्यादेखत घडलं असं व्हायला नको. तुम्ही यांच्यावर उपचार केले नाहीत तर मला तुमच्यावर गोळी झाडावी लागेल."

शेवटी हतबल झालेल्या डॉक्टरांनी काहीशा अनिच्छेनेच उपचार करायला सुरुवात केली. त्यांनी माणेकशॉ यांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या काढल्या, आतड्याचा खराब झालेला भाग कापला. आणि आश्चर्य म्हणजे माणेकशॉ वाचले. सुरुवातीला त्यांना मंडाले, नंतर रंगून आणि मग भारतात आणण्यात आलं. पुढे 1946 मध्ये लेफ्टनंट कर्नल सॅम माणेकशॉ यांना दिल्लीतील लष्कराच्या मुख्यालयात तैनात करण्यात आलं.

सॅम माणेकशॉ भारतीय जवानासोबत

फोटो स्रोत, BHARATRAKSHAK.COM

1948 मध्ये काश्मीरचं भारतात विलीनीकरण करायचं ठरलं. त्यावेळी व्ही. पी. मेनन श्रीनगरला महाराजा हरिसिंह यांच्याशी बोलणी करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत सॅम माणेकशॉही देखील होते. 1962 मध्ये चीनसोबतचं युद्ध हरल्यानंतर फोर्थ कॉर्प्सचे कमांडर बीजी कौल यांच्या जागी सॅम यांची नियुक्ती करण्यात आली.

पदभार स्वीकारताच सॅम यांनी सीमेवर तैनात सैनिकांना उद्देशून म्हटलं की, "जोपर्यंत तुम्हाला कोणताही लिखित आदेश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सीमेवरून माघार घ्यायची नाही. आणि लक्षात ठेवा की, असा आदेश तुम्हाला कधीच मिळणार नाहीये."

खोडकर स्वभावाचे माणेकशॉ

सॅम माणेकशॉ जवानांसोबत

फोटो स्रोत, SAINIKSAMACHAR.NIC.IN

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याच काळात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सीमाभागाचा दौरा केला होता. नेहरूंसोबत त्यांच्या कन्या इंदिरा गांधीही होत्या.

सॅम यांचे एडीसी ब्रिगेडियर बहराम पंताखी त्यांच्या 'सॅम माणेकशॉ - द मॅन अँड हिज टाईम्स' या पुस्तकात लिहितात, "सॅम यांनी इंदिराजींना ऑपरेशन रूममध्ये प्रवेश करू नये असं सांगितलं. कारण त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली नव्हती. त्यावेळी इंदिरा गांधींना याचं वाईट वाटलं होतं. पण सुदैवाने या गोष्टीमुळे त्या दोघांमधील संबंध बिघडले नाहीत."

सॅम त्यांच्या मिश्किल स्वभावासाठी ओळखले जायचे. शिवाय ते त्यांच्या खाजगी आयुष्यातही तितकेच खोडकर आणि चेष्टा करणारे होते.

त्यांची मुलगी माया दारूवाला बीबीसीशी बोलताना सांगतात की, "लोकांना वाटतं की, सॅम मोठे जनरल होते. त्यांनी अनेक लढाया लढल्या, त्यांच्या मोठ्या मिशांमुळे त्यांच्या घरी खूपच शिस्तीचं वातावरण असेल. पण तसं काहीच नव्हतं.

ते लहान मुलांसारखे खोडकर स्वभावाचे होते. आमच्यासोबत ते मस्ती करायचे, आम्हाला त्रास द्यायचे, आमच्या खोड्या काढायचे. बऱ्याचदा आम्हालाच त्यांना थांबवावं लागायचं. जेव्हा केव्हा ते आमच्या रूममध्ये यायचे तेव्हा आम्हाला प्रश्न पडायचा की हे आता काय करणार आहेत");