'भारतीय चित्रपट सृष्टीने आंबेडकरांवर बहिष्कारच टाकला आहे', असे अभ्यासकांना का वाटते?

फोटो स्रोत, BBC/@2D_ENTPVTLTD
- Author, डॉ. हरीश वानखेडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
2024 हे वर्ष अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमुळे भारतीय चित्रपट सृष्टीसाठी ऐतिहासिक ठरणारं आहे. यावर्षी आलेल्या स्त्री-2, भूल भुलैय्या-2 आणि सिंघम अगेन यांसारख्या चित्रपटांनी तब्बल 500 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा गल्ला जमवत कमाईचे नवे विक्रम रचले. भारतातील या चित्रपट उद्योगाची उलाढाल अवाक करणारी आहे.
ॲक्शन, ड्रामा, रोमान्स, गाणी आणि संगीत असं सगळ्यांचंच मिश्रण असणारे भारतीय चित्रपट देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय दर्शकांसाठीही आकर्षणाचा विषय बनलेले आहेत. त्यामुळे या चित्रपटांची देशाबाहेरील आंतरराष्ट्रीय कमाईदेखील तितकीच घसघशीत झालेली पाहायला मिळते.
पण इतक्या मोठ्या व्यावसायिक यशानंतरही कलात्मकता, बौद्धिक आशय आणि सामाजिक विषयांवरील भाष्य या बाबतीत भारतीय सिनेमा आजही कच खाताना दिसतो.
हॉलीवूड आणि युरोपातील चित्रपटातून शोषित-वंचित समूहाच्या गोष्टी धाडसीपणाने दाखवल्या जातात. सामाजिक विषयांवरती आशयघन चर्चा तिथल्या चित्रपटांमधून होते. कारण तिथे चित्रपटांकडे फक्त मनोरंजनाचं नव्हे, तर लोकांनी वैचारिक जडणघडण करण्याचं साधन म्हणूनही पाहिलं जातं.
त्यामुळे परदेशी चित्रपटांमधून समाजातील अन्याय अत्याचाराला वाचा फोडलेली पाहायला मिळते.
मनोरंजनाबरोबरच सामाजिक भान जपण्याची जबाबदारीही बाहेरचा सिनेमा उचलतो. आपल्या भारतीय चित्रपटांमध्ये दुर्दैवानं असं होताना दिसत नाही. आपले बहुतांश सिनेमे हे तद्दन व्यवसायिक गल्लाभरूच असतात.
डोकं बाजूला ठेवून फक्त मनोरंजन करण्यासाठीच आपले सिनेमे बनवले जात आहेत, असं वाटावं अशी परिस्थिती आहे. भारतातील शोषित-वंचित समूहांचे प्रश्न भारतीय सिनेमांमधून मांडले गेलेत, हे अभावानेच पाहायला मिळतं.
भारतीय चित्रपटांमध्ये इथल्या दलित-आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व जवळपास शून्यात जमा आहे.