चुंदुरू हत्याकांड : 8 जणांची हत्या केली, त्यांचे मृतदेह पोत्यात भरून तुंगभद्रेत फेकले आणि

जातीय संघर्षात जीव गमावलेल्या एका व्यक्तीचा हात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जातीय संघर्षात जीव गमावलेल्या एका व्यक्तीचा हात
  • Author, शंकर वाडीशेट्टी
  • Role, बीबीसी तेलुगूसाठी

6 ऑगस्ट 1991 रोजी घडलेल्या या घटनेत आठ जण घटनास्थळीच मरण पावले. या घटनेला 32 वर्षं होऊन गेली, तरीही या घटनेच्या आठवणीने शहारा आणणाऱ्या आहेत.

"सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काही लोक आमच्या भागात ओरडत आले- 'येतायत...पळा, पळा,'असं ते ओरडले. माझा मुलगाही मोदुकुरूच्या दिशेने धावला. शहरातील चौकात त्याला पकडलं आणि त्याचा खून केला," अंगालकुदुरू कोटिरत्नम 6 ऑगस्ट 1991 रोजीचा भयंकर घटनाक्रम सांगतात.

त्या दिवशी झालेल्या जनसंहारात त्यांचा मुलगा राजमोहन याचाही जीव गेला.

"प्रत्येकाची तीच अवस्था झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत हे सुरू होतं- काहींना जाईच्या बागेत नेण्यात आलं आणि काहींची मोदुकूरूमध्ये कत्तल करण्यात आली. तिन्हीसांजेनंतर त्या सगळ्यांना गोण्यांमध्ये भरून तुंगभद्रेच्या कालव्यात नेऊन टाकण्यात आलं.

आम्ही सगळ्यांनी रेड्डी नि तेलगा लोकांना ट्रॅक्टरांवरून जाताना पाहिलं. इतर गावांमधले रेड्डी लोकही त्यांना पाठिंबा द्यायला पुढे आले. तीन दिवस मृतदेह सापडत नव्हते. शेवटी वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह सापडले. माझ्या मुलाचं प्रेत पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि मला ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आलं," कोटिरत्नम अश्रूभरल्या डोळ्यांनी बोलत सांगतात.

चुंदुरू हत्याकांडात मरण पावलेले लोक

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, चुंदुरू हत्याकांडात मरण पावलेले लोक

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातल्या चुंदुरू मंडल इथे तीस वर्षांपूर्वी झालेल्या त्या भयंकर घटनांच्या कोटिरत्नम या प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. त्यांनी या संदर्भात न्यायालयात जाऊन साक्षही दिलेली आहे.

'त्या घटनेतून आम्ही सावरूच शकलो नाही', असं त्या म्हणतात.

ही केवळ कोटिरत्नम यांची भावना नाही. तर, चुंदुरूपासून बाजूला काढण्यात आलेल्या आंबेडकर नगरपंचायतीच्या परिसरात राहणाऱ्या माला व मडिगा जातीतील चाळीस वर्षांवरील सर्वांकडेच या घटनेच्या कडवट आठवणी आहेत. जातीच्या नावाखाली आपल्या हजेरीतच आपल्या लोकांची कत्तल करण्यात आली, हा अनुभव त्यांना विसरता येण्यासारखा नाही.

चुंदुरू पोलीस स्थानक

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, चुंदुरू पोलीस स्थानक

चुंदुरूमध्ये झालेल्या या हत्याकांडाचा परिणाम केवळ स्थानिकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचे पडसाद देशभरातील सामाजिक चळवळींमध्ये उमटले.

हेलावून टाकणारी घटना

6 ऑगस्ट 1991 रोजी घडलेल्या या घटनेत आठ जण घटनास्थळीच मरण पावले. आपल्या भावाचा मृतदेह बघून परिशुधा राव नावाची व्यक्ती हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावली. कालव्यात फेकून देण्यात आलेल्या गोण्यांमधील विघटित झालेले मृतदेह पाहून शवविच्छेदन करणाऱ्या डॉ. रवी चंदर यांनी आत्महत्या केली.

मृतदेह गोणत्यात घालून जिथे फेकून देण्यात आले तो हा कालवा

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, मृतदेह गोणीत घालून जिथे फेकून देण्यात आले तो हा कालवा

उच्चजातीयांच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांसोबतच दोन व्यक्ती मृतदेह पाहिल्यावर त्या धक्क्याने मरण पावल्या. अत्याचार कोणत्या पातळीवर झाले असतील, याचा अंदाज यावरून येईल.

चुंदुरूमधील दलितांच्या या हत्याकांडांचा निषेध करण्यासाठी विविध ठिकाणी निदर्शनं झाली. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग व रामविलास पासवान यांनी दिल्लीत झालेल्या निषेधसभांना संबोधित केलं.

गोळीबारात मरण पावलेल्या अनिल कुमार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेला स्तंभ

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, गोळीबारात मरण पावलेल्या अनिल कुमार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेला स्तंभ

आंध्र प्रदेशात तीव्र आंदोलन झालं. आरोपींना शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबांना सहाय्य मिळावं, या मागणीसाठी सभा घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये कोप्परला अनिल कुमार या दलित तरुणाचा मृत्यू झाला. दिल्लीला निदर्शनांसाठी गेलेल्या महिलेचा अपघाती मृत्यू झाला.

'त्या' घटनांची आठवण

चुंदुरूमधील घटनेवरून सर्वांना 1985 साली प्रकाशम जिल्ह्यातील करमचेडू इथे घडलेल्या अत्याचारांची आठवण झाली. सहा वर्षांपूर्वी करमचेडूमध्येही जातीच्या नावाखालीच अत्याचार झाले होते.

करमचेडूमध्ये पाण्याच्या तलावावरून सुरू झालेल्या वादाची परिणती उच्चजातीयांनी दलितांची हत्या करण्यात झाली.

त्याचपद्धतीने दलित विद्यार्थ्यांना शाळेत इतरांसोबत बसू न देण्याच्या चुंदुरूमध्ये वाद सुरू झाला आणि अखेरीस त्यातून भीषण हत्याकांड घडलं.

चुंदुरूमधील अनुसूचीत जातीयांची वसाहत

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, चुंदुरूमधील अनुसूचीत जातीयांची वसाहत

22 जुलै 1981 रोजी चित्रपटगृहात रवी या दलित तरुणाचा पाय लागल्याच्या बहाण्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला. याला दलितांनी प्रत्युत्तर दिलं, तेव्हा चुंदुरूतील रेड्डी व तेलगा जातीचे लोक संतापले.

दलित तरुणांनी प्रत्युत्तर दिल्याचं उच्चजातीयांना सहन झालं नाही आणि त्यांनी सामाजिक बहिष्कार टाकला.

पीडित लोकांनी याबद्दल पोलिसांकडे तक्रार केल्यावरही त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस रेड्डी लोकांनी शांतता समितीमध्ये सहभागी होण्यासही नकार दिल्यावर ही समस्या आणखी गंभीर झाली.

कोटिरत्नम यांचा मुलगा राजामोहन चुंदुरूतील संघर्षात मरण पावला

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, कोटिरत्नम यांचा मुलगा राजामोहन चुंदुरूतील संघर्षात मरण पावला

चुंदुरू आधीपासूनच मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे तिथे माला व मडिगा यांची लोकसंख्या जास्त आहे. तरीही जमिनीची मालकी रेड्डी व तेलगा यांच्याकडे होती. सुधारलेल्या सिंचनसुविधेमुळे शेतीतून मिळणारं उत्पन्नही वाढलं. श्रीमंत लोक गावावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी काही कारणामुळे दलितांचा उच्चशिक्षणाकडील ओढा वाढला.

गावात तोवर अऩुसूचित जातींमधील सुमारे 100 व्यक्ती विविध पदांवर होत्या. स्थिर उत्पन्न व आरामदायक आयुष्याची आश्वस्तता देणारी रेल्वेची ठेकेदारीची कामंही काही लोक करू लागले होते.

रेड्डी व तेलगा लोकांच्या शेतजमिनी माला व माडिगा जातीतील लोक भाडेकरारावर घेऊन तिथे पीक घेत असत. त्यामुळे अनुसूचित जातींमध्येही आर्थिक प्रगती होऊ लागली. राखीव जागांच्या नियमांनुसार या भागातील मंडल अध्यक्षाचं पद अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आलं.

अनुसूचित जातींमधील शिक्षक, तरुण लोक प्रश्न विचारू लागले होते, वेळप्रसंगी आव्हानही देऊ लागले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातींमधील लोकांचा उत्कर्ष प्रभुत्वशाली सामाजिक गटांना सहन झाला नाही. अशा सर्व वादांची परिणती म्हणून मुख्य चौकातील गोलामुडी याकूब या रेशन विक्रेत्यावर हल्ला झाला. पाच

ऑगस्टला ते एमआरओ कार्यालयाकडे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. गावात पोलिसांचं पथक असतानाही दुकानदारावर झालेल्या या हल्ल्याने खळबळ माजली. "धान्य विक्रेत्यांची बैठक बोलावण्यात आल्याचा संदेश देण्यात आला होता.

मी बैठकीला उपस्थित राहावं, असंही सांगण्यात आलं होतं. त्या वेळी आमच्यातील अनेक लोक आपापल्या घरातच थांबले. पण मी कोणत्याही वादात सहभागी नव्हतो, त्यामुळे मी आत्मविश्वासाने बाहेर पडलो. पण आमच्या भागातून बाहेर पडून मी चौकात गेलो, तेव्हा अचानक सुमारे 60 लोकांनी माझ्यावर हल्ला चढवला," अशी त्या दिवशीची आठवण याकूब सांगतात.

"आपापल्या घरांसमोर बसलेल्या ज्येष्ठांच्या दिशेने मी धावत गेलो. मी कोणत्याही वादात नाहीये, असं मी त्यांना हात जोडून विनवत होतो. इतक्यात कोणीतही माझ्या पायावर कुऱ्हाड मारली. दुसऱ्या एकाने चाकूने वार केला. मी जोरात ओरडलो तेव्हा जवळच असलेले पोलीस तिथे आले. पोलिसांना पाहिल्यावर गर्दी पांगली. मला तेनाली रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं," असं याकूब सांगतात.

त्या वेळी आरक्षणाच्या तत्त्वानुसार रेशनची दोन दुकानं अनुसूचित जातींमधील व्यक्तींना वाटून देण्यात आली होती. आजही याकूब रेशन दुकान चालवून उपजीविका करतात.

चुंदुरूमधील शाळा

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, चुंदुरूमधील शाळा

रेशन दुकानदारावर झालेल्या या हल्ल्याने अऩुसूचित जातींमधील काही माणसं चिडली आणि त्यांनी खुल्यावर शौचाला बसलेल्या रेड्डी समुदायातील एका माणसावर हल्ला केला. हा माणूस विकलांग होता. त्याला उपचारासाठी तेनालीला घेऊन जात असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. यामुळे वाद आणखी भडकला.

विजय पाल नावाच्या एका तरुणाने रेड्डी समुदायातील एका महिलेची छेड काढल्याचाही आरोप झाला. या पार्श्वभूमीवर रेड्डी व तेलगा समुदायातील लोक संतप्त होऊन त्यांनी आपल्या जातीतील लोकांची जमवाजमव सुरू केली.

"सगळं नियोजित पद्धतीने करण्यात आलं. त्यांनी 6 ऑगस्टला सकाळी हल्ला केला. इतका भयंकर हल्लापोलिसांच्या सहकार्यानेच होऊ शकतो," असं एम. सुब्बाराव यांनी सांगितलं.

चुंदुरूमधील पीडितांच्या चळवळीचं नेतृत्व सुब्बाराव यांनी केलं होतं.

"आम्हाला भाडेकरारावर देण्यात आलेल्या जमिनी ते परत घ्यायला लागले. आम्हाला मजुरीचं कामही मिळायचं बंद झालं. ते आम्हाला किराणा दुकानांमध्ये वस्तूही विकायचे नाहीत. तरीही आम्ही अडचणींवर मात करत दिवस काढत होतो. खरं म्हणजे 5 ऑगस्टच्या घटनेनंतर पोलिसांनी कठोर कारवाई करायला हवी होती. पण सगळं ठीक आहे, असं सांगत ते कारवाई पुढे ढकलत राहिले.

अखेरीस 6 ऑगस्टला काही मंडळी तेनालीला गेली आणि सकाळी नऊच्या सुमारास पोलीस आमच्या भागात आले. हल्ल्यात सहभागी झालेल्या सर्वांना अटक केली जाईल, असं बोललं जात होतं. त्यामुळे बहुतांश लोक शेतांकडे धावले," सुब्बाराव सांगतात.

"पुरुष मंडळी, काही सुशिक्षित तरुण मोदुकुरूच्या दिशेने धावले, काही रेल्वेरुळांच्या बाजूला पळाले. मारेकरी वसाहतीत आल्यावर ते शेतांकडे धावले. पण वाटेत लपून बसलेल्या रेड्डी व तेलगा लोकांनी त्यांना पकडलं. सगळं ठरवून घडलं होतं. जोरजोरात आरडाओरडा होऊनही पोलिसांनी तिथे यायची फिकीरही केली नाही. उलट, कोणी लोक काम करताना गाणी म्हणतायंत वाटतं, असं म्हणत पोलिसांनी टर उडवली. यामध्ये आठ लोकांची हत्या झाली," सुब्बाराव म्हणाले.

हत्याकांडाबाबत चौकशीसाठी चुंदुरूमध्ये न्यायालयीन कामकाजासाठी बांधलेली इमारत

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, हत्याकांडाबाबत चौकशीसाठी चुंदुरूमध्ये न्यायालयीन कामकाजासाठी बांधलेली इमारत

घटनास्थळी आठ जणांचा मृत्यू झाला. देवरापल्ली जयराजू, मंडलू रमेश, रुबेन, जलादी एमॅन्युएल, जलादी मुथय्या, मल्लेला सुब्बाराव, जलादी इसाक, अंकलाकुदुरू राजमोहन यांचा मृतांमध्ये समावेश होता. त्यांचे मृतदेह गोण्यांमध्ये भरून तुंगभद्रा नदीच्या कालव्यात फेकून देण्यात आली.

मृतदेह शोधण्यासाठी तीन दिवस शोधमोहीम सुरू होती.

अखेरीस विघटित झालेले, कुजलेल्या अवस्थेतले मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. अंत्यसंस्कारांचा मुद्दाही वादात सापडला. जिल्हाधिकारी नागार्जुन व पोलीस अधीक्षक आर.पी. मीना यांना दफनविधीच्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला. गावातील मुख्य रस्त्यापाशी अंत्यसंस्कार करण्यात आले.

या जागेची देखभाल होत नसल्यामुळे आता तिथे रान माजलेलं आहे आणि एक फाटलेला फलक दिसतो. पण दर वर्षी 6 ऑगस्टला मृतांना मानवंदना वाहण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.

आपल्या मुलाला विनाकारण गोळीबारात जीव गमवावा लागला, असं अनिल कुमारचे वडील

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, आपल्या मुलाला विनाकारण गोळीबारात जीव गमवावा लागला, असं अनिल कुमारचे वडील

चुंदुरूमध्ये अमारतुलुरू पोलिस स्थानकात 'अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमा'तील 148, 302, 207, 201 व 140 या कलमांतर्गत तक्रारी नोंदवण्यात आल्या. परंतु कोणालाच अटक झाली नाही. आरोपींना अटक न झाल्याचा निषेध करत आणि न्यायाची मागणी करत कट्टी पद्मराव यांच्या दलित महासभेच्या नेतृत्वाखाली निदर्शनंही झाली.

आंध्र प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांनी पीडितांविषयी शोक व्यक्त करण्यासाठी चुंदुरूला भेट दिली. त्या वेळी चुंदुरू पीडित समितीने निदर्शनं केली.

चुंदुरू खटल्यात अटक होऊन तुरुंगवास भोगून बाहेर आलेले चिडुपुडी पुन्ना रेड्डी.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, चुंदुरू खटल्यात अटक होऊन तुरुंगवास भोगून बाहेर आलेले चिडुपुडी पुन्ना रेड्डी

चुंदुरूमधील पीडितांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू असताना अखिल जनकल्याण समितीच्या नावाखाली प्रतिनिदर्शनांचंही आयोजन करण्यात आलं. या समितीच्या निदर्शनांचा भाग म्हणून गुंटूर एसी महाविद्यालयावर हल्ला झाला. त्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला.

या खटल्याच्या सुनावणीसाठी चुंदुरूमध्ये विशेष न्यायालय स्थापन करावं, अशी मागणी करणारं निवेदन 107 खासदारांच्या सह्यांनिशी राष्ट्रपतींना देण्यात आलं. स्वतंत्र न्यायालयाने ही सुनावणी घ्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर 1991 रोजीच दिला असूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. अखेर, डिसेंबर1994 मध्ये ही सुनावणी सुरू झाली.

पीडितांच्या म्हणण्यानुसार, सुनावणी लांबवण्यासाठी बरेच डावपेच लढवण्यात आले. आपल्याला न्यायालयीन खर्च परवडणार नाही, असं सांगणारी याचिका आरोपींनी दाखल केली. सर्व पीडित ख्रिस्ती आहेत, अनुसूचित जातींमधील नाहीत, असा आक्षेप नंतर घेण्यात आला.

आपण अनुसूचित जातीय आहोत, हे पीडितांना न्यायालयात सिद्ध करावं लागलं. असे अडथळे पार करत सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणाच्या चौकशीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्वतंत्र न्यायालयीन इमारतही बांधण्यात आली.

परंतु, आरोपींनी चौकशीची प्रक्रिया गुंटूरमध्ये पार पडावी अशी मागणी केली. अखेर सुनावणी चुंदुरूमध्येच पार पडली.

आरोपींपैकी 33 जण चौकशीदरम्यान मरण पावले, त्यामुळे 179 जण सुनावणीला सामोरे गेले. 79 जणांची प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून चौकशी करण्यात आली. शेवटी, 31 जुलै 2007 रोजी, म्हणजे घटनेनंतर 16 वर्षांनी

या खटल्याचा निकाल देण्यात आला. एकूण आरोपींपैकी 123 जणांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली. उर्वरित लोकांपैकी २१ जणांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. पस्तीस जणांना एक वर्षाच्या कैदेची शिक्षा झाल.

दोषी ठरवण्यात आलेल्या सर्वांनी या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. सात वर्षांनी, 22 एप्रिल 2014 रोजी उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तुरुंगवास भोगत असलेल्यांना सोडून देण्यात आलं.

चुंदुरू हत्याकांडात आरोपींवर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत, असं उच्च न्यायालयाने म्हटलं. कोणीच दोषी नसेल, तर मग या हत्या केल्या कोणी, असा प्रश्न यातून उपस्थित झाला. अनेक संघटनांनी या निकालातील त्रुटी दाखवल्या. काहींनी त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही केली.

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल स्थगित केला असून सध्या तिथे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. चुंदुरूमधील पीडितांच्या वतीने याचिका दाखल केलेल्या जलादी मोझेस यांनी बीबीसीला सांगितलं की, "आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात पाच याचिका होत्या, पण त्या सर्वांची सुनावणी न घेताच निकाल देण्यात आला. साठ व्यक्तींसंबंधीचा पुरावा आहे, असं सांगण्यात आलं, परंतु काहींना जन्मठेप सुनावण्यात आली, तर काहींना एका वर्षाची शिक्षा झाली. यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. सर्व आरोपींना सारखीच शिक्षा मिळायला हवी."

न्यायमूर्ती एल. नरसिंह रेड्डी यांनी दिलेला निवाडा निराशाजनक आहे, असं मोझेस म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

चुंदुरू आंदोलनादरम्यानची सभा

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, चुंदुरू आंदोलनादरम्यानची सभा

चुंदुरूमधील रेड्डी व तेलगा समुदायातील अनेक लोकांना बीबीसीने प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला. पण कोणीही बोलायला पुढे आलं नाही. अखेरीस या प्रकरणी तुरुंगवास भोगलेले चिडुपुडी पुन्न रेड्डी थोडं बोलले.

"त्या दिवशीची घटना घडायला नको होती. ते वादळ आल्यासारखंच झालं. त्यांचीही चूक नव्हती आणि आमचीही चूक नव्हती. आता आम्ही सर्व जण ते विसरून एकत्र राहतो आहोत. ते आमची जमीन पिकवत आहेत, शेतीकामालाही येत आहेत. भूतकाळात काय घडलं याची चिरफाड करण्यापेक्षा सगळ्यांनी ते विसरण चांगलं," असं रेड्डी म्हणाले.

न्यायालयात आपल्याला न्याय मिळालेला नाही, अशी व्यथा पीडितांनी बोलून दाखवली. अऩुसूचित जातींमधील सर्व पीडितांना एक एकर जमीन, एक घर मिळेल व सुशिक्षितांना नोकऱ्या मिळतील, असं आश्वासन सरकारने आंदोलनाच्या काळात दिलं होतं. पण केवळ ५७ लोकांना प्रत्येकी एक एकर जमीन मिळाली. शिवाय, 450 जणांना अर्धा एकर जमीन मिळाली. इतर 30 कुटुंबांना काहीच जमीन मिळालेली नाही, असं सुब्बाराव यांनी बीबीसीला सांगितलं.

"त्यांनी आम्हाला दिलेली एक एकर जमीन आमच्याकडे आहे. आम्हाला एक लाख रुपयेही देण्यात आले. पण त्याने माझा मुलगा परत येणार आहे का? कोणीच गुन्हा केला नाही, असा विचित्र निवाडा न्यायालयाने दिला. आरोपी बिनदिक्कतपणे फिरत आहेत, मग आम्हाला आमच्या मुलांची आठवण येणार नाही का");