दिल्ली जहांगीरपुरी दंगल : भारतात जातीय दंगलीच्या घटना वाढताहेत का?

जळीत कार (प्रातिनिधिक छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जळीत कार (प्रातिनिधिक छायाचित्र)

सर्वोच्च न्यायालयाने काल (20 एप्रिलला) दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात अतिक्रमण करणाऱ्या महापालिकेच्या बुलडोझरना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. आज 21 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती कायम ठेवली आणि या प्रकरणावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

16 एप्रिलला उत्तर दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात हनुमान जयंतीच्या शोभयात्रेत हिंसाचार उसळला. या घटनेत नऊ जण जखमी झाले आहेत. तसेच पोलिसांनी 24 जणांना अटक केली. दरम्यान, अनेक राजकीय पक्षांनी जहांगीरपुरीला जाण्याची घोषणा केली आहे.

नोटीस न देता अतिक्रमण काढणे बेकायदेशीर असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी म्हटलं आहे.

माकन यांनी आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ एका जुन्या प्रकरणाचा हवाला देत, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह आज जहांगीरपुरीला जाणार असल्याचे जाहीर केलं आहे.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसनेही आपले नेते आज जहांगीरपुरीला भेट देणार असल्याचे जाहीर केलं.

विशेष म्हणजे या भागात बंगाली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. सीपीएमच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा करात यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या अतिक्रमणावर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर जहांगीरपुरी गाठली आणि तेथील पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही बराच वेळ अतिक्रमणावर कारवाई सुरूच होती. त्यामुळेच न्यायालयाने पुढील सुनावणी घेण्याचे निश्चित केलं आहे.

मागील काही दिवसांमध्ये वाढलेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनांमुळे देशात त्या त्या ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली. या जातीय दंग्यांमधील सर्वांत अलीकडील घटना दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात घडली.

एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान या भागात जातीय हिंसाचार उसळला. यात सात पोलीस कर्मचार्‍यांसह 9 जण जखमी झाले.

अशा दंगलीमध्ये पोलिसांनी देशभरातून 130 हून अधिक लोकांना यापूर्वीच अटक केली आहे. मग प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे भारतात जातीय दंगलीच्या घटना वाढताहेत का?

आकडेवारी काय सांगते?

2020 मध्ये जातीय हिंसाचाराच्या एकूण 857 घटनांची नोंद झाली आहे. 2019 च्या तुलनेत या घटनांमध्ये तब्बल 94% वाढ झाली.

जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्याचं उदाहरण म्हणजे दिल्ली.

उदाहरणादाखल बघायचं झालं तर, 2014 ते 2019 दरम्यान दिल्लीत जातीय दंगलीच्या फक्त 2 घटनांची नोंद झाली होती. मात्र 2020 मध्ये, दिल्लीत 520 जातीय दंगली घडल्या. त्यामुळे साहजिकच राष्ट्रीय पातळीवरील आकडेवारीत तीव्र वाढ झाली.

ग्राफ

अलीकडेच गृह मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, भारतात 2016 ते 2020 या कालावधीत जातीय आणि धर्माच्या नावाखाली 3,399 दंगलीच्या घटना घडल्या आहेत. आणि ही आकडेवारी NCRB च्या आकडेवारीशी अचूक जुळते.

NCRB च्या नोंदीनुसार 2014 ते 2020 दरम्यान 5417 जातीय दंगलीच्या घटनांची नोंद झाली.

काँग्रेस विरुद्ध भाजप

काँग्रेस आणि भाजपच्या राजवटीत घडलेल्या जातीय दंगलींच्या घटनांच्या आकडेवारीची थेट तुलना करता येत नाही. कारण NCRB 2014 पर्यंत दंगलींना जातीय किंवा अन्य (शेती, जातीशी संबंधित, पंथा संबंधित दंगली) म्हणून वर्गीकृत करत नव्हती.

मात्र, गृह मंत्रालयाने 2006 ते 2012 मधील सांप्रदायिक घटनांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यावरून हे दोन्ही पक्ष कशा पद्धतीने चालतात यांचं चित्र स्पष्ट होतं.

दंगलींची संख्या

गृहमंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, काँग्रेस पक्षासाठी 2008 हे सर्वांत वाईट वर्ष होतं. त्या वर्षात जातीय दंगलीच्या 943 घटनांची नोंद झाली होती. तर NCRB च्या आकडेवारीनुसार 2014 मध्ये 1227 जातीय दंगली घडल्या होत्या. आणि त्याच वर्षी भाजप हा पक्ष सत्तेत आला.

या दोन्हींची तुलना करायची झाल्यास, 2006 ते 2012 (कॉंग्रेस राजवटीची एकूण 6 वर्षे) या काळात 5,142 जातीय हिंसाचाराच्या घटना नोंदवल्या गेल्या. तर 2014 ते 2020 (भाजपच्या राजवटीची पहिली 6 वर्षे) - एकूण 5,417 घटनांची नोंद झाली.

2020 पर्यंत भारतात जातीय दंगलीच्या घटनांचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं. मात्र कमी घटना म्हणजे कमी बळी असा याचा अर्थ होत नाही. 2014 मध्ये 1227 घटनांमध्ये 2001 लोक बळी पडले होते. 2018 पर्यंत, घटनांची संख्या 512 पर्यंत खाली आली मात्र दंगलींत बळी पडलेल्यांची संख्या 812 च्या घरात होती. 2019 आणि 2020 मध्ये एकूण घटनांमधील एकूण बळींचे प्रमाण कमी झालं.

2017 आणि 2018 मध्ये दंगलीच्या घटनांची नोंद कमी असूनही दंगलींना बळी पडलेल्या लोकांची संख्या मात्र जास्त होती.

हेही वाचलंत का?