पुण्यातील पुरंदर विमानतळाविरोधातील आंदोलनात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; नेमकं काय घडलं?

- Author, प्रविण सिंधू आणि प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
पुण्यातील पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा सरकारकडून ड्रोन सर्व्हे होत आहे. मात्र, बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्व्हेला तीव्र विरोध केला आहे. शनिवारी (3 मे) पोलीस बंदोबस्तात ड्रोन सर्व्हे होत असताना आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला.
"गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात अनेक पोलीस जखमी झाले आणि पोलिसांच्या वाहनांचंही नुकसान झालं," असं पोलिसांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, गावकऱ्यांनी आधी पोलिसांनी लाठीचार्ज करत मारहाण केल्याचा आरोप केला.
या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडलं, गावातील आंदोलक शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? पोलीस प्रशासनानं नेमकं काय म्हटलं आहे? पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काय भूमिका घेतली आहे जाणून घेऊयात.
नागरिकांवर बळाचा वापर करणं अतिशय दुःखद - सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. शासनाने नागरिकांच्या भावना समजावून घेऊन योग्य ती पावले उचलणे आवश्यक होते. परंतु तेथे बळाचा वापर करण्यात आला ही बाब निश्चितच अतिशय दुःखद आहे."
"या घटनेत येथील नागरिक जखमी झाले ही बाब अतिशय वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी आहे. शासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन संयम व संवेदनशीलता दाखविणे आवश्यक होते. आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो. शासनाला आवाहन आहे की कृपया आपण हा विषय संवेदनशीलतेने हाताळावा", असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.
यावेळी त्यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये मुख्यमंत्री कार्यालय, अजित पवार, पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस यांनाही टॅग केलं आहे.
पुण्याला एका विमानतळाची नितांत गरज - अजित पवार
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे घडलेल्या या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "ड्रोन मोजणी करण्यासाठी गेल्यावर मोठ्या प्रमाणावर महिला-पुरुष आक्रमक पद्धतीने पुढे आले. त्यात दुर्दैवाने एका महिलेला अटॅक आला. त्यांचं दुःखद निधन झालं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."
"मी प्रशासनाला सांगितलं आहे की, फार आक्रमकपणे जाऊ नका. आजचं कामकाज थांबवा. पुणे जिल्ह्याला एका विमानतळाची नितांत गरज आहे. सामोपचारानं पुण्याच्या जवळ जिथं विमानतळ करता येईल तिथं करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे," असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झटापट नेमकी कशी झाली?
या प्रकरणी पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शनिवारी (3 मे) पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झटापट नेमकी कशी झाली? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, "2 मेपासून पुणे विमानतळासाठीचं ड्रोन सर्वेक्षण सुरू करण्यात आलं होतं. यावेळी सर्वेक्षण करणाऱ्यांच्या साहित्याची तोडफोड करणे आणि सरकारी कामात अडथळा आणण्याची घटना घडली होती. त्या अनुषंगाने गुन्हाही दाखल होता."

"3 मे रोजीही महसूल प्रशासन, सर्वेक्षण करणारे आणि पोलीस सर्वेक्षणासाठी तेथे पोहचले होते. परंतू तेथील शेजारच्या गावात एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळं तेथील लोक थोडेसे भावनिक झाले. त्यातच त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात 5 पोलीस आणि 20 अंमलदार जखमी आहेत. आम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेत आहोत."
"पोलिसांच्या दोन गाड्यांवर दगडफेकही झाली आहे. या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत 6 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आणखीही काही आरोपींना आम्ही अटक करणार आहोत. तसेच काही गुन्ह्यांचीही नोंद करणार आहोत", असंही पंकज देशमुख यांनी नमूद केलं.

कुंभारवळण गावच्या सरपंच मंजुशा गोपाल गायकवाड यांनी पोलिसांनी दिलेली माहिती वस्तुस्थिती नसल्याचं मत व्यक्त केलं. तसेच, पोलिसांनी आधी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाल्याचं म्हटलं.
सरपंच मंजुशा गायकवाड म्हणाल्या, "सातही गावातील गावकऱ्यांचा या विमानतळाला विरोध आहे. आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नाहीत. त्यामुळे हा सर्व्हे करु नये अशी आमची भूमिका आहे. मात्र, असं असूनही प्रशासनाने शुक्रवारी (2 मे) आमच्या गावात विमानतळासाठी सर्व्हेचा प्रयत्न केला. त्याला आम्ही ठामपणे विरोध केला. त्यावर प्रशासनाने आम्ही सर्व्हे करत नाही परत जातो सांगितलं. मात्र, त्यांच्या गाड्या परत गेल्यावर त्यांनी आकाशात ड्रोन उडवत सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावकरी भयभीत झाले."

"दुसऱ्या दिवशी शनिवारी (3 मे) सकाळी 9 वाजता प्रशासनाने पोलीस बंदोबस्त वाढवून पुन्हा सर्व्हेचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्वेक्षण करणाऱ्या लोकांना पोलीस गाड्यांमध्ये बसवलेलं होतं. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी गावकरी आपल्या पशुधनासह रस्त्यावर उतरले. आम्हाला हे आंदोलन शांततेत करायचं होतं. मात्र पोलिसांनी आम्हाला दोन्ही बाजूने अडवलं होतं. त्यामुळे गावकरी शेतातून सर्वेच्या ठिकाणी येत पोलिसांच्या गाड्यांसमोरच जाऊन बसले."
"यावेळी गावकऱ्यांनी हा सर्व्हे रद्द करा, हे विमानतळ रद्द करा, अशी मागणी केली. मात्र, प्रशासनाने हे आमचं काम आहे आणि ते करणारच अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे प्रचंड उन्ह असतानाही शेतकरी पोलिसांच्या गाड्यांसमोर बसले. त्यावेळी त्यांच्या गाड्या काढण्यासाठी पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला. काही महिला बाजुला पडल्या, एका महिलेला चक्कर आली आणि गावकरी घाबरले. म्हणून पुरुष गावकऱ्यांनी महिलांचं संरक्षण केलं."

"पोलिसांनी तिथं काय घडतंय बघायला आलेल्या लोकांनाही अटक केली. पोलीस जसे त्यांचे व्हिडीओ दाखवतात तसेच आमच्याकडेही आम्ही काढलेले व्हिडीओ आहेत. सुरुवात शेतकऱ्यांनी केलेली नाही. ही सुरुवात पोलिसांकडून झालेली आहे."
"पोलीस त्यांच्या गाड्या पुढे न्यायला लागल्यावर गावकऱ्यांनी ते सर्व्हे करण्याच्या ठिकाणी जाऊ नये म्हणून बैलगाड्या रस्त्यात उभ्या केल्या. स्वतःच्या जमिनी वाचवण्यासाठी त्यांनी हे केलं. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. बैलगाडी चालकाला प्रचंड मारहाण केली. त्याचा कान फुटला आणि सात टाके पडले. अनेक गावकरी जखमी झाले आहेत. त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. पोलिसांनी थेट मारहाण करणं, महिलांना धक्काबुक्की करणं ही कोणती पद्धत आहे");