नागपूर हिंसाचार गुप्तचर विभाग आणि पोलिसांचं अपयश आहे का?

नागपूर हिंसाचार

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, भाग्यश्री राऊत
  • Role, बीबीसी मराठीसाठी

नागपुरात सोमवारी (17 मार्च) रात्री दंगल झाली. यामध्ये वाहनांची तोडफोड, जाळपोळ झाली. दगडफेक झाली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये 33 पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटकही केली आहे. आणखी काही संशयितांना ताब्यात घेण्याचं काम सुरूच आहे.

या दंगलीमध्ये पोलिसांसोबतच काही नागरिकही जखमी झाले आहेत. दंगलीत सर्वसामान्य नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, ही दंगल का घडली? ही दंगल म्हणजे पोलीस विभाग, त्यांच्या गुप्तचर विभागाचं अपयश आहे का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

हे प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे पोलिसांनी या दंगलीनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दिलेली माहिती आणि भाजप आमदार प्रविण दटके यांनी पोलिसांवर केलेले आरोप.

पोलिसांच्या एफआयआरमध्ये काय म्हटलं?

गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन करून औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यानंतर मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पक्षाचा शहराध्यक्ष फहीम खान गणेश पेठ पोलीस ठाण्यात 50 ते 60 लोकांचा जमाव बेकायदेशीरित्या घेऊन आला आणि पोलिसांना लेखी निवेदन दिले.

त्यानंतर जाळपोळ करणाऱ्या 9 आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 223, सहकलम 37 (1), 37 (3) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावाला लोकांना शांतता ठेवण्यासाठी समज देण्यात आली. तरीही त्यांनी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात 500-600 लोक जमवले.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पोलीस ठाण्यात 50-60 लोकांचा जमाव जमतो आणि विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाविरोधात पोलिसांना तक्रार देतात. पोलीस गुन्हाही दाखल करतात आणि त्या जमावाला शांतता ठेवण्याची समजही देतात. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ही दंगल पूर्वनियोजित होती. दंगल पूर्वनियोजित होती, तर गुप्तचर विभागाला, पोलिसांना याची चाहूल कशी लागली नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दंगल घडेपर्यंत गृहविभाग आणि गुप्तचर विभाग काय करत होता? असा सवाल आमदार रोहित पवार यांनीही उपस्थित केला.

नागपूर हिंसाचार

फोटो स्रोत, ANI

इतकंच नाहीतर सत्तेत असलेल्या भाजप आमदार प्रविण दटके यांनीही पोलिसांवर आरोप केलाय. नागपूर पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी पहिल्यांदा पोलीस बंदोबस्त लावला असता, तर ही घटना घडली नसती. पोलीस उशिरा आले असा आरोप त्यांनी केला.

हा आरोप नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना फेटाळला. पोलिसांनी चांगलं काम केल्याचं त्यांनी म्हटलं.

ज्या भागात दंगल झाली त्या भागातील वकील राकेश देवधारियाही असाच प्रश्न उपस्थित करतात.

ते म्हणाले, "17 मार्चला इतक्या सगळ्या घडामोडी घडत असताना पोलिसांना पुढे काहीही घडू शकतं याचा अंदाज कसा आला नाही");