'कानिफनाथ कुण्या एका समाजाचा नाही, तर सगळ्यांचा देव,' मढी गावातील मुस्लीम व्यापारी काय म्हणतात?

फोटो स्रोत, shrikant bangale
"मुस्लीम माणसं फार पूर्वीपासून याठिकाणी पुजेत आहेत आणि नाथांनी कधीही कुणाचाही भेदभाव केलेला नाही."
डॉ. रमाकांत मरकड, नाथ संप्रदायाच्या परंपरेविषयी सांगत होते. डॉ. मरकड हे कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आहेत. 10 वर्षं त्यांनी या ट्रस्टचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे.
सध्या अहिल्यानगरमधील मढी गाव चर्चेत आहे. मढी गावात कानिफनाथ महाराजांचं मंदिर आहे. दरवर्षी या गावात कानिफनाथ महाराजांची यात्रा भरते. देशभरातून मोठ्या संख्येनं लोक इथं येतात.
यंदाच्या यात्रेत मात्र मुस्लीम समाजाच्या व्यावसायिकास दुकान लावू न देण्याचा ठराव मढी गावच्या ग्रामसभेनं घेतला आहे.
मुस्लीम समाज यात्रेदरम्यान काही परंपरांचं पालन करत नसल्याचं ग्रामसभेनं पारित केलेल्या ठरावात नमूद करण्यात आलंय. मात्र आता गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात ही ग्रामसभा नियमबाह्य असल्याचं म्हटल्यामुळे हा ठराव रद्दबातल झाला आहे.
"ग्रामसभेतला हा निर्णय काही अभ्यास करुन घेतलेला नाहीये. जुने पेपर्स, कागद यांचा अभ्यास करुनच असा निर्णय घेतला पाहिजे. तसं झालेलं नाहीये," असं डॉ. मरकड म्हणतात.
27 फेब्रुवारीच्या सकाळी आम्ही मढी गावात पोहचलो, तेव्हा मोठ्या संख्येनं लोक कानिफनाथांच्या दर्शनासाठी आल्याचं दिसलं. यात महिला-पुरुष दोन्हींचीही संख्या सारखीच दिसत होती.
या दिवशी अमावस्या असल्यानं गर्दी झाल्याचं स्थानिक लोक सांगत होते.
बंदी घालणारा ठराव रद्द
मढी येथील यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी घालण्याचा मढी ग्रामसभेचा ठराव नियमानुसार नसल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालातून समोर आले आहे. 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी करण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. ही ग्रामसभा नियमबाह्य असल्याचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.
याबाबतचा तपासणी अहवाल त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
ग्रामसभाच नियमबाह्य ठरल्याने त्यातले ठराव रद्द झाले आहेत. त्या ठरावांची अंमलबजावणी होणार नाही.
'एका समाजावर बहिष्कार घालणं चुकीचं'
गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात आमची भेट मढीचे सरपंच आणि कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांच्याशी झाली.
ग्रामसभेच्या ठरावाविषयी बोलताना म्हणाले, "कानिफनाथांची यात्रा मार्च महिन्यामध्ये 17 दिवस चालणार आहे. लाखो लोक या यात्रेत सहभागी होतात. या यात्रेमध्ये मुस्लीम समाजाला, मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी घातली आहे. त्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव 22 फेब्रुवारीला पारित केलेला आहे."
पण, असा ठराव का घेतला, या प्रश्नावर ते म्हणाले, "या ठिकाणी येऊन दमदाटी करुन भाविकांची लूटमार करुन, दोन नंबरचे धंदे चालवून, याठिकाणी मांसाहार जर ते (मुसलमान) करत असतील, तर मग आम्ही किती दिवस शांत बसायचं");