छावा, औरंगजेब आणि नागपूर हिंसाचार; ऐतिहासिक सिनेमा धार्मिक सलोखा बिघडवू शकतो का?

फोटो स्रोत, Facebook/Laxman Utekar
- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Twitter,
एखाद्या सिनेमानं राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी यावं, आणि तोच मुख्य धारेतला मुद्दा बनावा, ही बाब तशी दुर्मिळच! पण, अलीकडे आलेला 'छावा' हा इतिहासावर आधारित सिनेमाही सध्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहे.
त्यातूनच, 'औरंगजेबाची कबर नष्ट केली जावी' अशी मागणी असो आणि त्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये झालेला हिंसाचार असो, ही सारी परिस्थिती पाहता काही प्रश्न नक्कीच उपस्थित होतात.
राज्यात हिंसाचार होऊ नये, याची सर्वोतोपरी खबरदारी बाळगणं, ही राज्य सरकारची जबाबदारी असते.
पण, स्वत: मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नागपूर हिंसाचाराबाबत बोलताना म्हणाले की, "मी कुठल्याही सिनेमाला दोष देत नाहीये. मात्र, छावा चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. पण राज्यामध्ये लोकांच्या भावनादेखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रज्वलित झालेल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा रागही बाहेर येत आहे."
अलीकडच्या काळात, पंतप्रधानांपासून ते सत्ताधारी पक्षातील स्थानिक पातळीवरील नेत्यांपर्यंत, सगळे एखाद्या चित्रपटाचं कौतुक करत तो पाहण्याचं आवाहन करतात. काही ठिकाणी फुकट तिकिटंही वाटली जातात.
असे चित्रपट सत्तेला अनुकूल असलेल्या प्रपोगंडासाठी तयार केले जात असल्याचा आरोप विरोधक करतात. त्यात मांडण्यात आलेल्या सत्यासत्यतेवर आणि निर्मितीच्या हेतूंबाबत वादविवाद होऊ लागतात. परिणामत: चर्चेच्या केंद्रस्थानी आल्यानं असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई करताना दिसतात.
'काश्मीर फाईल्स' असो, 'द केरला स्टोरी' वा 'द साबरमती एक्स्प्रेस' असो, अलीकडच्या काळात आलेल्या अशा काही चित्रपटांबाबत अशीच काहीशी प्रक्रिया घडताना दिसते.
नागपूरमधील हिंसाचाराच्या आधी 'औरंगजेबाची कबर' हा विषय चर्चेत आलेला होता. अर्थातच, त्याची सुरुवात 'छावा' या चित्रपटापासून झाली होती.
देशातील धार्मिक सलोखा बिघडण्यास अलीकडे येत असलेले काही चित्रपट कारणीभूत ठरत आहेत का?
कोणताही इतिहास चित्रपटांमधून समजून घेणं कितपत योग्य आहे?
वास्तवाची मोडतोड करुन सत्तेला अनुकूल असे चित्रपट हेतुपुरस्सर तयार केले जात आहेत, हा विरोधकांकडून केला जाणारा आरोप कितपत खरा आहे?
या आणि अशा सर्व प्रश्नांचा हा धांडोळा...


इतिहास चित्रपटांमधून समजून घेता येतो का?
कोणताही इतिहास चित्रपटांमधून समजून घेण्याचा प्रयत्न कितपत योग्य आहे, याबाबत आम्ही अभिनेता गिरीश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, "आपल्या समाजात ऐतिहासिक चित्रपटाचं आकलन करण्याची क्षमता तयार झालेली नाहीये. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने स्वत:चा म्हणून एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन दिला पाहिजे. मग ती गोष्ट वास्तवातील असो, इतिहासातील असो वा भविष्यातील असो. मात्र, तसं होताना दिसत नाही. ह्या दृष्टिकोनातून मिळणारा अनुभव पाहून प्रेक्षकांचं उन्नयन अपेक्षित आहे. कुठलीही कला विध्वंस वा हिंसेला कारण ठरते वा ठरावी, असं मला वाटत नाही. जर ती ठरत असेल तर ती कला नव्हे, ते काहीतरी वेगळं केलेलं आहे."

फोटो स्रोत, instagram/vickykaushal
दिग्दर्शक वरुण सुखराजदेखील चित्रपट आणि इतिहास यांच्यातील सीमारेषा स्पष्ट करताना दिसतात.
इतिहास ही अतिशय व्यामिश्र अशी गोष्ट असून चित्रपटातून समजून घेण्याचा तो विषयच नाहीये, असं त्यांचं मत आहे.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, "कुठलाही काळ समजून घ्यायचा असेल तर तो अशा एखाद-दुसऱ्या चित्रपटातून कळू शकत नाही. 'एका मिनिटांत समजून घ्या महाराजांविषयी सर्व काही...' अशा हेडलाईन्सची आपल्याला सवय लागली आहे. इतिहासकार जयसिंगराव पवार असो वा आ. ह. साळुंखे असोत, यांनी आपलं आयुष्य घालवलं तरीही ते म्हणतात की, 'आम्हाला अद्याप इतिहास समजला नाही.' तर आपण असा एखादा सिनेमा बघून कसं म्हणणार? खरा इतिहास असं काहीही नसतं. इतिहासाला अनेक कंगोरे असतात आणि ते एका चित्रपटातून समजू शकत नाहीत."
अभिनेता योगेश सोमण वेगळं मत मांडताना दिसतात.
ते म्हणतात की, "ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची भारतीय प्रेक्षकांची समज तयार झालेली असून ती आणखी वृद्धिंगत होत आहे. आज इतिहासाच्या नाण्याची दुसरी बाजू समोर येत असल्याने लोक तीदेखील स्वीकारायला लागले आहेत. काही काळापुरतं काही चित्रपटकर्त्यांनी एकच बाजू दाखवली असेल, तर आज दुसरी बाजूही समोर येताना दिसत आहे. आजवर काहींच्या सोयीचा इतिहास दाखवला गेला असेल आणि इतर काहींना त्याची दुसरी बाजू दाखवावी वाटत असेल."
मात्र, ऐतिहासिक सिनेमा बघितल्यावर त्याचं खरे-खोटेपण तपासणं, त्यातल्या दाव्यांचा अधिक अभ्यास करणं ही प्रेक्षकांचीही जबाबदारी असल्याचंही ते आवर्जून नमूद करतात.

'मूळात आपण इतिहासकडे 'इतिहास' म्हणून बघतो का', असा मूलभूत प्रश्न ज्येष्ठ सिनेअभ्यासिका श्यामला वनारसे उपस्थित करताना दिसतात.
त्या 'चित्रपट अभ्यास' या पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्या सांगतात की, "इतिहासातील प्रत्येक व्यक्तीमत्त्वाला अनेक पैलू असतात. तुम्ही प्रतिमा तयार करताना कोणता पैलू अधिक गडद करता, त्यावर बरंचसं अवलंबून असतं. ऐतिहासिक चित्रपटात तुम्ही इतिहासातील व्यक्ती रंगवत नसता, तर तुमच्या डोक्यातली व्यक्ती रंगवत असता. त्यामुळे, आता जे ऐतिहासिक सिनेमे निघतायत, त्या निर्मात्यांच्या डोक्यात कोणता इतिहास आहे, ते तुम्हाला सिनेमा बघून कळतं. खरा इतिहास तुम्हाला त्यातून कळत नाही. बनवणाऱ्यांच्या डोक्यातला इतिहास कळतो."
इतिहासाकडे बघणं आणि सिनेमाची गोष्ट ऐकणं यामध्ये फरक आहे, हेदेखील त्या अधोरेखित करतात.
त्या म्हणतात की, "प्रेक्षकांना याबाबत स्पष्टता आली, तर त्यांची चित्रपटावरची प्रतिक्रियाही वेगळी होईल आणि ते चित्रपटातून इतिहास समजून घेण्याऐवजी इतिहासाकडेच चिकित्सक दृष्टीनं बघायला लागतील."
अलीकडच्या काळात मध्ययुगीन इतिहासावर आधारलेल्या चित्रपटांचं प्रमाण वाढलं असून सत्ताधाऱ्यांना हव्या असलेल्या जाणीवा लोकांमध्ये पेरण्यासाठीच मध्ययुगीन काळातले सोयीच्या पद्धतीने चितारलेले ऐतिहासिक चित्रपट मोठ्या प्रमाणावर येत आहेत, असा दावा अभिनेता किरण माने करतात.
अशा चित्रपटांमध्ये दोन गोष्टी खऱ्या तर दहा गोष्टी खोट्या पद्धतीने सांगितल्या जातात, असंही ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात की, "राजांच्या प्रेमापोटी हे सिनेमे प्रेक्षक पाहतात. याचाच फायदा घेऊन त्यांच्या इतिहासात असत्यकारक भेसळ करणारे चित्रपट येतात. रणदीप हुडाने सावरकरांवर चित्रपट काढला, तो कुणीही पाहिला नाही. कंगना रणौतने 'इमर्जन्सी' काढला, तोही आपटला. मोदीजींवरचा सिनेमाही पडला. फक्त राजांवरचे सिनेमे लोक बघायला जातात. म्हणून त्यातून राजांचं सर्वसमावेशक स्वराज्य लपवून फक्त युद्धस्य कथा दाखवून मुस्लिमद्वेषाचं विष पेरलं जातं."
पुढे ते सांगतात की, "स्वराज्याच्या आड येणाऱ्या कुणाच्याविरोधात तलवार हातात घेणं शिवरायांना भाग होतं. ते हिंदू राजांविरोधातही लढले आहेतच. कारण, त्यांना जे स्वराज्य निर्माण करायचं होत, ते शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं होतं. ते सगळं झाकून ठेवून फक्त मुस्लीमांविरोधात लढलेले शिवराय जाणीवपूर्वक अधिक अधोरेखित केले जात आहेत. जेणेकरुन आताच्या सत्ताधाऱ्यांना अनुकूल असा अजेंडा राबवायला त्यांना मदत मिळावी. बुधभूषण लिहिणारे, इंग्रजीचा गाढा अभ्यास असणारे, महिलेला पंतप्रधान बनवणारे असे संभाजी महाराज कुठल्या चित्रपटातून समोर आलेत का");