छावा, औरंगजेब आणि नागपूर हिंसाचार; ऐतिहासिक सिनेमा धार्मिक सलोखा बिघडवू शकतो का?

छावा सिनेमा

फोटो स्रोत, Facebook/Laxman Utekar

  • Author, विनायक होगाडे
  • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Twitter,

एखाद्या सिनेमानं राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी यावं, आणि तोच मुख्य धारेतला मुद्दा बनावा, ही बाब तशी दुर्मिळच! पण, अलीकडे आलेला 'छावा' हा इतिहासावर आधारित सिनेमाही सध्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहे.

त्यातूनच, 'औरंगजेबाची कबर नष्ट केली जावी' अशी मागणी असो आणि त्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये झालेला हिंसाचार असो, ही सारी परिस्थिती पाहता काही प्रश्न नक्कीच उपस्थित होतात.

राज्यात हिंसाचार होऊ नये, याची सर्वोतोपरी खबरदारी बाळगणं, ही राज्य सरकारची जबाबदारी असते.

पण, स्वत: मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नागपूर हिंसाचाराबाबत बोलताना म्हणाले की, "मी कुठल्याही सिनेमाला दोष देत नाहीये. मात्र, छावा चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. पण राज्यामध्ये लोकांच्या भावनादेखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रज्वलित झालेल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा रागही बाहेर येत आहे."

अलीकडच्या काळात, पंतप्रधानांपासून ते सत्ताधारी पक्षातील स्थानिक पातळीवरील नेत्यांपर्यंत, सगळे एखाद्या चित्रपटाचं कौतुक करत तो पाहण्याचं आवाहन करतात. काही ठिकाणी फुकट तिकिटंही वाटली जातात.

Skip सर्वाधिक वाचलेले and continue reading
सर्वाधिक वाचलेले