पुढच्या 25 वर्षांत भारतात असतील 45 कोटी लठ्ठ लोक, आपला नंबर त्यात न येण्यासाठी काय काळजी घ्याल?

भारतात येत्या 25 वर्षांत एक तृतियांश लोक लठ्ठ असणार Lancet Obesity लॅन्सेट अहवाल लठ्ठपणा

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, ओंकार करंबेळकर
  • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

एकीकडे अनेक देश उपासमार, युद्धामुळे आलेला अन्नतुटवडा, नैसर्गिक कारणांमुळे आलेला दुष्काळ तसेच कुपोषणाशी झगडत असताना अर्धं जग मात्र लठ्ठ होण्याच्या मार्गावर आहे.

2050 पर्यंत जगातील प्रौढांपैकी निम्मे लोक आणि लहान मुले, पौगंडावस्थेतील मुलं तसेच तारुण्याच्या पहिल्या वर्षांमध्ये असलेल्या जनतेपैकी एकतृतियांश लठ्ठ झालेले असतील.

लॅन्सेट या आरोग्य शोधपत्रिकेनं जाहीर केलेल्या एका अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. या अहवालात जगभरातील 200 देशांचा अभ्यास करण्यात आलेला आहे.

यामध्ये भारतीयांसाठी विशेष धोका व्यक्त करण्यात आला आहे. भारतामध्ये पुढच्या 25 वर्षांत लठ्ठ लोकांची संख्या 45 कोटीवर जाईल. म्हणजेच साधारणतः एकूण लोकसंख्येच्या एक तृतियांश लोकसंख्या लठ्ठ असेल.

प्रत्येक तीन माणसातला एक माणूस लठ्ठ झाल्यावर साहजिकच लठ्ठपणा, त्याच्याबरोबर येणारे इतर आजारही वाढीला लागतील आणि त्या सर्वाचा ताण भारताच्या साधनसंपत्ती, अन्नपुरवठा, औषधं, आरोग्यसेवा यावर येणार आहे.

या अहवालात तज्ज्ञांनी आणखी एक लक्षवेधी भीती व्यक्त केली आहे. ती म्हणजे कमी उत्पन्न असणाऱ्या लोकसंख्येच्या देशात या दशकभरात लठ्ठपणा वेगानं वाढणार आहे.

लॅन्सेट नक्की काय म्हणतंय?

लॅन्सेटच्या अहवालात मिळालेल्या धक्कादायक माहितीवर लॅन्सेटने काही स्पष्ट निरीक्षणं नोंदवली आहेत.

अतिवजन वाढण्याच्या आणि लठ्ठपणा वाढण्याच्या गतीला संथ करण्यामध्ये कोणत्याही देशाला यश आलेलं नाही असं या अहवालात म्हटलं.

जर का आताच तत्काळ आणि परिणामकारक उपाय केले नाहीत तर जगभरात वजनवाढ आणि लठ्ठपणा असाच वाढत जाईल.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

याबाबतीत या अभ्यासानं अफ्रिका आणि आशियाकडे विशेष लक्ष वेधलं आहे. या दोन खंडात लठ्ठपणा वेगानं वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांचं 'वजन' या देशांवर पडणार आहे असं हा अभ्यास म्हणतो.

आता फक्त लठ्ठपणा जगात आहे असं तोंडानं बोलून जाणार नाही तर त्याविरोधात आक्रमक उपाय योजून काम केलं पाहिजे असं या अहवालात म्हटलं आहे. असं झालं नाही तर जगभरात लठ्ठपणामुळे होणारे आजार आणि मृत्यू यांची संख्या वाढणार अशी धोक्याची घंटाही यात वाजवली आहे.

काय होतो आपण? काय झालो आपण?

लॅन्सेटचा अहवाल म्हणतो 1990 ते 2021 या काळात जगात सर्वच प्रदेशात लठ्ठपणाचा वेग वाढला.

2021 पर्यंतच्या माहितीनुसार जगातले 1अब्ज पुरुष आणि 1.11 अब्ज महिला लठ्ठ म्हणजे ओबिस होत्या.

या लठ्ठ लोकसंख्येत चीनमधील लोक सर्वाधीक आहेत. यात सुमारे 40 कोटी लोक चिनी असावेत. त्यानंतर भारताचा नंबर येतो. भारतातील 18 कोटी जनता अमेरिकेतले 17.2 लोक लठ्ठपणाचा सामना करत आहेत.

आणखी धक्कादायक बाब म्हणजे ओशानिया भागातले देश, उत्तर अफ्रिका आणि मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये अतिवेगानं वाढलेला लठ्ठपणा. यातील अनेक देशांमध्ये प्रौढ लोकसंख्येतील 80 टक्के लोक लठ्ठ आहेत.

भारतात येत्या 25 वर्षांत एक तृतियांश लोक लठ्ठ असणार, Lancet Obesity लॅन्सेट अहवाल लठ्ठपणा
Health आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

आजवरचा इतिहास पाहाता आणि लठ्ठपणा वाढत जाण्याचा हा वेग पाहाता 2050 साली जगातील 3.80 अब्ज प्रौढ लोक लठ्ठ असतील.

यातगी चीन, भारत आणि अमेरिका अग्रेसर असतील. सबसहारन देशांमध्ये म्हणजे सहारा वाळवंटाच्या खालील देशामध्ये लठ्ठपणा 254.8 टक्के वेगाने वाढेल असं या अहवालात म्हटलं आहे. विशेषतः नायजेरियातील चौदा कोटी प्रौढ लठ्ठ असतील आणि हा देश चौथ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे.

हा लठ्ठपणा ठरवण्यासाठी लॅन्सेटच्या अभ्यासकांनी BMI हे प्रमाण एकक मानले आहे.

बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स. अर्थात बीएमआयला मर्यादा आहेत हे लॅन्सेटच्या संशोधकांनी मान्य केलं आहे. तरीही बीएमआयमुळे बहुतांश आरोग्याची आणि आजाराची माहितीचा अंदाज येतो.

25 पेक्षा जास्त बीएमआय असेल तर अतिवजन (overweight) आणि तो 30 च्या वर गेला तर ओबेसिटी (Obesity- लठ्ठपणा) असं मानलं जातं.

2050 मध्ये भारतीयांची काय स्थिती असेल?

2050 या वर्षाबद्दल म्हणजे येत्या 25 वर्षांत कशी स्थिती असेल याबद्दल लॅन्सेटने शक्यता वर्तवली आहे. आजवरचे कल पाहाता येत्या 25 वर्षांत लठ्ठपणा वेगानं वाढलेला दिसेल असं या अहवालात म्हटलं आहे.

जगात पंचविशी पूर्ण केलेल्या लठ्ठ आणि अतिवजन असलेल्या लोकांची संख्या 3.8 अब्जवर जाईल. चीनमधील सुमारे 62.7 कोटी लोक तसेच भारतातील 45 कोटी लोक लठ्ठ असतील आणि अमेरिकेतील 21 कोटी लोक लठ्ठ असतील. नायजेरियातील लठ्ठ लोकांची संख्या 3.6 कोटी वरुन 14.1 कोटीवर जाईल

असंसर्गजन्य आजारांची जननी

लठ्ठपणाला किंवा वजनवाढीला असंसर्गजन्य आजारांची जननी म्हटलं जातं. म्हणजेच हृदयरोग, रक्तदाब वाढणे असे आजार यामध्ये येतात.

लॅन्सेटचा हा अहवाल आणि एकूणच भारताची याबाबत असलेली स्थिती याबद्दल आम्ही मुंबईतल्या झँड्रा हेल्थकेअर येथे मधुमेहशास्त्र विभागाचे प्रमुख आणि 'रंग दे नीला' या आरोग्य उपक्रमाचे संचालक डॉ. राजीव कोविल यांना विचारलं.

भारतात येत्या 25 वर्षांत एक तृतियांश लोक लठ्ठ असणार Lancet Obesity लॅन्सेट अहवाल लठ्ठपणा
Health आरोग्य
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते म्हणाले, "भारताची लठ्ठपणामधली स्थिती पाहाता अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लठ्ठ किंवा जास्त बीएमआय असणारे लोक भारतात आहेत. ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे. रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग, डायबेटिस अशा असंसर्गजन्य आजारांची ही जननी आहे."

डॉ. कोविल सांगतात, "सरकारनं चांगलं आरोग्यदायी अन्न स्वस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाकिटबंद अन्न, बाटलीबंद पेयं स्वस्तात सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे जे आरोग्यासाठी काही करू पाहातात, चांगली आरोग्यशैली बाळगतात, चांगलं आरोग्यदायी सकस अन्न खातात, व्यायाम करतात त्यांना कामाच्या ठिकाणी सवलती किंवा करसवलती देण्याची पद्धती आणली पाहिजे असं माझं मत आहे."

डॉ. कोविल म्हणतात, "लहान मुलांमधला लठ्ठपणा पाहिला तर आपल्याकडे एकदम विरोधाभासाचं चित्र आहे. प्रत्येक पाचात दोन मुलांना अतिवजन किंवा लठ्ठपणाचा त्रास होतोय तर दुसरीकडे आपल्या देशात कुपोषणाचाही प्रभाव अजून आहे. लहान वयापासूनच मुलांना पोषण आणि आरोग्य याचे धडे दिले पाहिजेत.

"शाळांच्या उपहारगृहात, शाळेकडून मिळणारे जेवण, डब्यातले अन्न यात कमी कर्बोदकं, कमी साखर आणि कमी प्रक्रिया केलेलं अन्न असावं. तसेच प्रत्येक पदार्थाला कमी साखरेचा किंवा साखरविरहित पर्याय त्यांना मिळावा. लहानपणीच अभ्यासक्रमात आणि आचरणात याचे धडे दिले तर भविष्यात ते एक सुदृढ प्रौढ म्हणून जगतील," कोविल सांगतात.

लठ्ठपणाची कारणं आणि लठ्ठपणामुळे होणारे मोठे परिणाम

पर्यावरणाचे परिणाम आणि चुकीची जीवनशैली, अनुवंशिकता, शहरीकरण, प्रक्रिया केलेले अन्न, बैठी जीवनशैली, हार्मोनल असंतुलन, मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव ही कारणंही आहेत.

काही लोकांमध्ये लठ्ठपणा येण्यामागचं कारण एखादा आजारही असू शकतो किंवा कधीकधी विशिष्ट प्रकारची औषधं देखील वजन वाढवू शकतात.

गरोदरपणात महिलांचं वजन वाढतं. त्यामुळे देखील लठ्ठपणा येण्याची शक्यता असते. पुरेशा झोपेच्या अभावामुळे देखील वजन वाढू शकतं. कारण त्यामुळे शरीरात हार्मोनल बदल होतात आणि भूक वाढते.

भारतात येत्या 25 वर्षांत एक तृतियांश लोक लठ्ठ असणार Lancet Obesity लॅन्सेट अहवाल लठ्ठपणा
Health आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

1) मधुमेह : मद्यासह अनेक गोष्टींमुळे यकृतात चरबी जमा होते. जर स्वादुपिंडात (pancreas)फक्त 1 ग्रॅम चरबी जरी जमा झाली तरी त्यातून मधुमेह होऊ शकतो.

2) हृदयविकाराचा झटका: चरबी जर ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठू लागली (atherosclerosis)तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

3) स्ट्रोक (मेंदूच्या रक्तपुरवठ्यात अडथळा): मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये जर चरबी जमा होऊ लागली तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता असते.

4) उच्च रक्तदाब: रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठल्यानं रक्ताचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी अधिक दाबाची आवश्यकता पडते. यातूनच उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.

5) कर्करोग: अलीकडच्या काळात झालेल्या वैद्यकीय अभ्यासातून असं आढळून आलं की लठ्ठ लोकांमध्ये निरोगी वाढीच्या अभावामुळे कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते.

6) झोपेशी निगडीत श्वसन विकार (Obstructive sleep apnea): लठ्ठ लोक जास्त घोरतात. ही देखील एक समस्या होऊ शकते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.