'एक दिवस लेखकाला सुपरस्टारपेक्षा जास्त पैसे मिळतील', हे म्हणणं खरं करून दाखवणारे सलीम-जावेद

सलीम खान आणि जावेद अख्तर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सलीम खान आणि जावेद अख्तर ही जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखकांची सर्वात यशस्वी जोडी मानली जाते.
  • Author, यासिर उस्मान
  • Role, चित्रपट इतिहासकार, बीबीसी हिंदीसाठी

शोले, दीवार, डॉन, जंजीर सारखे चित्रपट आठवतायेत. किंबहुना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जवळपास आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात या चित्रपटांनी, त्यातील संवाद आणि नाट्यानं गारुड घातलेलं आहे. या चित्रपटातील जादूमागचे जादूगार म्हणजे सलीम-जावेद.

या आठवड्यात ख्यातनाम पटकथा लेखक सलीम-जावेद यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाची मालिका (डॉक्युमेंटरी सिरीज) प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होते आहे. या माहितीपटाचं नाव आहे...'दि अँग्री यंग मेन'.

किंबहुना यापेक्षा वेगळं आणि चांगलं शीर्षक या लेखकद्वयीवरील माहितीपटासाठी असू शकत नाही.

पटकथा लेखकांवर माहितीपट तयार होणं, ही भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील एक अनोखी आणि मोठी घटना आहे.

सर्वसाधारणपणे अभिनेता, अभिनेत्री, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक-गायिकांवर माहितीपटापासून ते चरित्रपटांची निर्मिती झाली आहे. मात्र पटकथालेखकांच्या (स्क्रीनप्ले रायटर्स)

बाबतीत असं काहीही झालेलं नाही.

कारण पटकथा लेखकांना अभिनेता, अभिनेत्री, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार यांच्याइतकं महत्त्व कधी दिलंच गेलं नाही. पटकथा लेखकांना हा सन्मान पहिल्यांदा मिळवून दिला सलीम-जावेद या जोडीनं. म्हणूनच हा माहितीपट तयार होणं ही काही सामान्य बाब नाही.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

लेखकांशिवाय कोणत्याही चित्रपटाचा विचारच केला जाऊ शकत नाही. मात्र सर्वसाधारणपणे चित्रपटाच्या यशात लेखकांना स्थान गौण होतं. सलीम-जावेद यांनीच लिहिलेल्या 'मिस्टर इंडिया' या पात्राप्रमाणेच श्रेयामधून लेखकांना गायब केलं जात होतं.

मात्र 50 वर्षे उलटून गेल्यानंतर देखील पटकथा लेखनाच्या क्षेत्रात सलीम-जावेद यांचा प्रभाव तितकाच आहे. पटकथा लेखनाचे ते एकप्रकारे सुपरस्टारच आहेत.

लेखकांची ही जोडी नेमकं काम कसं करत असेल?

मी बालपणी पहिल्यांदा 'जंजीर' चित्रपट पाहिला. त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की अमिताभ बच्चननं काय जबरदस्त संवाद म्हटले आहेत - “जब तक बैठने को न कहा जाए शराफ़त से खड़े रहो, ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं”.

चित्रपट पाहिल्यावर मी अमिताभ बच्चन यांचा फॅन झालो. मला वाटायचं की हे संवाद अमिताभ बच्चन त्यांच्या मनानेच बोलत असतील.

मागाहून कळलं की हे संवाद स्वत: अमिताभ बच्चन यांनी विचार करून म्हटलेले नाहीत. मला कळालं की हे संवाद सलीम-जावेद यांनी लिहिले आहेत.

बालपणी अनेक वर्षे मला असंच वाटत होतं की सलीम जावेद नावाचा एक माणूस आहे आणि तोच हे जबरदस्त संवाद लिहितो.

जावेद अख्तर आणि अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जंजीर चित्रपटात सलीम-जावेद यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी संवादही लिहिले होते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आमचे एक कौटुंबिक मित्र होते आणि त्यांचं नाव देखील सलीम जावेद होतं.

असो, अमिताभ बच्चन यांचा फॅन असल्यामुळे त्या नादात मी त्यांचे अनेक चित्रपट पाहिले. यात एक गोष्ट कॉमन होती. ते म्हणजे या सर्व चित्रपटांची पटकथा सलीम जावेद यांनी लिहिली होती.

नंतरच्या काळात मला ही बाब स्पष्ट झाली की सलीम जावेद ही एकच व्यक्ती नसून दोन लेखक आहेत. ते एकत्रितपणे चित्रपटाची पटकथा लिहितात. हे समजल्यावर मला खूपच आश्चर्य वाटलं.

दोघे मिळून लिखाण करतात याचा अर्थ काय? मनात प्रश्न आला की दोघांमध्ये कोण काय लिखाण करतं?

म्हणजे असं असेल का, की ‘मेरे पास बंगला है, गाडी है, बैंक बैलेंस है’ हे वाक्य जावेद अख्तर यांनी लिहिलं असेल? आणि त्यानंतरचं वाक्य 'मेरे पास मां है' सलीम खान यांनी लिहिली असेल?

'जब तक बैठने को न कहा जाए…' पर्यंत कदाचित सलीम खान यांनी लिहिलं असेल आणि त्यानंतरचं वाक्य "ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं" जावेद अख्तर यांनी लिहिलं असेल?

'बुराई ने बंदूक चलाना सिखा दिया था, नेकी हल चलाना सिखा देगी' काय जबरदस्त डायलॉग होता तो.

असं असेल का की जय चे संवाद सलीम खान यांनी लिहिले असतील आणि वीरू चे संवाद जावेद अख्तर यांनी? बालपणात चित्रपटांविषयी असलेल्या वेडापायी मी अनेकदा अशाप्रकारे अनेक आवडत्या संवादाबद्दल दोघांनाही अर्धं-अर्धं श्रेय देऊन खूश व्हायचो.

या जोडीत कामाची विभागणी कशी होती?

अनेक वर्षांनंतर मी पत्रकारिता करू लागलो आणि तीही चित्रपटांशी निगडित. तेव्हा सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्याशी स्वतंत्रपणे भेट झाली. तेव्हाही माझ्या मनात हा प्रश्न होताच.

आतापर्यंत इतकं समजलं होतं की चित्रपट लेखनात मूलत: तीन गोष्टी प्रमुख असतात - कथा, पटकथा (स्क्रीनप्ले) आणि संवाद. या तिन्हींचं श्रेय सलीम-जावेद यांना एकत्रितपणे दिलं जायचं.

2014 मध्ये माझ्या पहिल्या पुस्तकाची (राजेश खन्ना यांचे चरित्र) प्रस्तावना सलीम खान यांनीच लिहिली.

त्यांना भेटल्यावर मी प्रश्न विचारला होता की तुम्हा दोघांच्या जोडीत कोणाचं काय काम असायचं.

त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, "आमचं ट्युनिंग इतकं उत्तम होतं की माझं काम कुठे सुरू व्हायचं आणि जावेद साहेबांचं काम कुठे संपायचं, हे सांगता येणं अवघड आहे."

सलमान खान, जावेद अख्तर आणि सलीम खान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, "जावेद साहेब नेहमी म्हणायचे की मी नाम (नाऊन्स) लिहायचो आणि सलीम साहेब क्रियापदं (वर्ब्स)"

"ही सर्व प्रक्रिया आपोआपच होत जायची. ही अतिशय क्लिष्ट स्वरूपाची क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटी आहे. आम्हा दोघांचे विचार एकाच दिशेनं, एकाच गतीनं चालायचे."

हे काही स्पष्ट उत्तर नव्हतं. मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे विचारून पाहिलं मात्र त्यांच्याकडून स्पष्ट उत्तर मिळालं नाही. मग अनेक वर्षांपूर्वी एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनासुद्धा हाच प्रश्न विचारला होता.

तेव्हा ते म्हणाले होते, "आम्ही दोघं एका टीमप्रमाणे काम करायचो. नेमकं कोण काय करायचं, याचं उत्तर देणं योग्य ठरणार नाही," इथेसुद्धा या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळालं नाही.

सलीम-जावेद यांच्यावर लेखक दीप्तोकीर्ति चौधरी यांनी 'रिटन बाय सलीम-जावेद' हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे.

दीप्तोकीर्ति चौधरी यांनी मला सांगितलं, "लेखनाच्या कामाची विभागणी कशी व्हायची, याबद्दल जावेद साहेब नेहमी सांगायचे की मी नाम (नाऊन्स) लिहायचो आणि सलीम साहेब क्रियापदं (वर्ब्स)."

आता हे उघड आहे की चेष्टेच्या स्वरात प्रश्न टाळण्याची ही पद्धत होती. अनेक वर्षे हे दोघं या प्रश्नाचं उत्तर देणं टाळत राहिले.

जावेद अख्तर यांनी उघड केलं गुपित

चित्रपट जगतात वेगवेगळ्या लोकांकडून यासंदर्भात निरनिराळ्या गोष्टी देखील ऐकण्यास मिळाल्या.

यातील काही चर्चा अशा होत्या, "जावेद साहेबच लिखाण करायचे. सलीम साहेबांचं काम जनसंपर्क (Public Relation) करणं आणि पटकथा वाचून दाखवण्याचं होतं", "सर्व पटकथा हॉलीवूडच्या चित्रपटांवरून घेतलेल्या होत्या."

"शोले चित्रपटाची कल्पना देखील 'मेरा गांव मेरा देश' या चित्रपटावरून घेण्यात आली होती", "दोघं खूपच उद्धट होते आणि निर्मात्यांसमोर चित्रविचित्र अटी ठेवायचे" इत्यादी.

मात्र या सर्व चर्चेनंतरसुद्धा मुख्य प्रश्न अनुत्तरीतच होता. शेवटी, अनेक वर्षांनी या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जावेद अख्तर यांनी दिलं.

मागील वर्षी (मे 2023) लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या 'जावेद अख्तर-टॉकिंग लाइफ' या पुस्तकाचं प्रकाशन लंडनच्या प्रसिद्ध ब्रिटिश लायब्ररीमध्ये होतं. त्यावेळेस मला जावेद अख्तर यांच्याशी सविस्तर बोलण्याची संधी मिळाली.

मी हा प्रश्न त्यांना पुन्हा विचारला की तुम्ही आणि सलीम खान यांच्या टीममध्ये कोण काय करायचं?

यावेळेस मात्र त्यांनी मोकळेपणानं उत्तर दिलं. "आम्ही लिहिलेल्या बहुतांश चित्रपटांच्या कथेची कल्पना, कथा जवळपास प्रत्येक वेळेस सलीम साहेबांच्याच होत्या. दीवार, त्रिशूल, शोले, डॉन या सर्व चित्रपटांची मुख्य कथा सलीम साहेबांचीच होती."

"कथेत नाट्यमयता आणणं, धक्का देणं (ट्विस्ट अॅंड टर्न) तेच करायचे आणि अॅंग्री यंग मॅनचं व्यक्तिमत्त्व ही कल्पना देखील त्यांचीच होती."

कोट कार्ड

नसरीन मुन्नी कबीर लिखित याच नव्या पुस्तकात जावेद अख्तर यांनी स्पष्टपणे सलीम खान यांना कथेच्या कल्पनेचं श्रेय दिलं आहे.

ते म्हणतात, "शोले चित्रपटात एक ठाकूर आहे. त्याचे दोन्ही हात एका भयानक खलनायकानं कापले आहेत. तो ठाकूर आपल्या गावाच्या संरक्षणासाठी दोन तरुणांना बोलावतो. ही सर्व कल्पना सलीम साहेबांची होती."

शोले चित्रपटाची उल्लेख करताना जावेद अख्तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. "शोले चित्रपटाची पटकथा लिहिण्यात रमेश सिप्पी यांचा देखील वाटा होता. मात्र त्यांना याचं श्रेय देण्यात आलं नाही."

हे तर झालं सलीम खान यांच्या योगदानाबद्दल. "मग पुढचं पाऊल काय असायचं आणि तुमचं काम कुठून सुरू व्हायचं"'दि अ‍ँग्री यंग मेन' या डॉक्युमेंटरी सीरीजचा ट्रेलर लॉंच होतानाचा फोटो " loading="lazy" width="800" height="502" style="aspect-ratio:800 / 502" class="bbc-139onq"/>

फोटो स्रोत, Getty Images

अर्थात 'जावेद अख्तर-टॉकिंग लाइफ' या पुस्तकात जावेद अख्तर म्हणतात, 'मिस्टर इंडिया' या चित्रपटाची पटकथा मी स्वत:च लिहिली होती. त्यानंतर मी संवाद देखील लिहिले."

"चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांना मी सांगितलं की या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत सलीम-जावेदचं नाव देण्यात यावं. कारण या कथेच्या कल्पनेचा जन्म 'सलीम-जावेद' जोडीच्या काळात झाला होता."

तो काळ पुन्हा आला नाही, मात्र सलीम-जावेद नावाची जादू आणि प्रभाव आजही हिंदी चित्रपट विश्वात जाणवतो.

गुरुदत्त यांच्या चित्रपटांचं लेखन प्रसिद्ध चित्रपट लेखक अबरार अल्वी करायचे. कित्येक वर्षांआधी सलीम खान अबरार अल्वी यांना म्हणाले, "लक्षात ठेवा, एक दिवस लेखक चित्रपटाच्या नायकापेक्षा जास्त पैसे घेतील."

त्यावर अबरार अल्वी यांनी डोळे विस्फारून आश्चर्यानं उत्तर दिलं होतं की, "काहीही सांगत आहात. असं कधीच होणार नाही."

मात्र असंच घडलं. सलीम-जावेदच्या जोडीनं ते करून दाखवलं. या घटनेनंतर अनेक वर्षांनी 'दोस्ताना' या चित्रपटासाठी सलीम-जावेद जोडीला सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा पन्नास हजार रुपये अधिक देण्यात आले होते.

म्हणूनच आज चित्रपट लेखकांची जी स्थिती आहे ते पाहून जाणवतं की सलीम-जावेद यांनी जे केलं, त्याची पुनरावृत्ती होणं बहुधा, 'मुश्किल ही नहीं नामुमकिन है'.

(लेखकानं गुरुदत्त, राजेश खन्ना, संजय दत्त आणि रेखा यांच्या जीवनावर पुस्तकं लिहिली आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.