'मिसेस' चित्रपटावर पाकिस्तानात काय चर्चा होतेय ? सोशल मीडियावरही अत्यंत गंभीर प्रतिक्रिया

अलीकडेच ओटीटीवर आलेल्या 'मिसेस' चित्रपटातील काही दृश्यं प्रेक्षकांनी खूपच अस्वस्थ करणारे आहेत, मात्र तरीदेखील अनेक महिलांना यात स्वत:च्या आयुष्याचं प्रतिबिंब दिसतं

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA

फोटो कॅप्शन, अलीकडेच ओटीटीवर आलेल्या 'मिसेस' चित्रपटातील काही दृश्यं प्रेक्षकांना खूपच अस्वस्थ करणारे आहेत, मात्र तरीदेखील अनेक महिलांना यात स्वत:च्या आयुष्याचं प्रतिबिंब दिसतं
  • Author, ताबिन्दा कौकब
  • Role, बीबीसी उर्दू

"वेलकम टू द फॅमिली, आता तू आमची मुलगी आहेस."

विवाहाच्या दिवशी सासऱ्याकडून हे ऐकून कोणतीही वधू नक्कीच आनंदी होईल. सासरच्या पुढील आयुष्याबद्दल तिच्या मनात खूप विश्वास देखील निर्माण होईल. मात्र कदाचित बहुतांश भारतीय आणि पाकिस्तानी तरुणींच्या बाबतीत हे एक भंगलेलं स्वप्न ठरू शकतं.

हा एका चित्रपटाचा संवाद आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील सोशल मीडिया आणि गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आला आहे.

'मिसेस' या चित्रपटाचा विषय तसा जुनाच आहे. म्हणजे विवाह झाल्यानंतर मुलींवर पडणारं सासरच्या जबाबदाऱ्यांचं ओझं, विवाहानंतरच्या आयुष्याबद्दलच्या स्वप्नांचा चुराडा होणं आणि पतीबरोबरच्या वैवाहिक जीवनासंदर्भातील समस्या इत्यादी.

मात्र या कथेत एकत्र कुटुंबातील अरेंज मॅरेजबद्दलच्या काही वास्तवाची मांडणी करण्यात आली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

या चित्रपटातील काही दृश्ये प्रेक्षकांना खूपच अस्वस्थ करणारी आहेत. मात्र, तरीही अनेक महिलांना त्यात त्यांच्या आयुष्याचं प्रतिबिंब दिसतं.

या चित्रपटात ज्या समस्येची मांडणी करण्यात आली आहे, ती समस्या म्हणजे पती-पत्नी यांच्यातील वैवाहिक संबंध.

सेक्स लाईफमधील असंवेदनशील वर्तणूक

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

विवाहाच्या दिवशी ऋचा आणि तिचा पती दिवाकर यांच्यात एक भावनिक दुरावा स्पष्ट दिसून येतो. ऋचाच्या पतीचा रोमांस चार दिवसात संपतो आणि त्यानंतर तो तिच्याजवळ निव्वळ सेक्ससाठी येतो.

चित्रपटात दिवाकर स्त्री रोगतज्ज्ञ आहे. मात्र, चित्रपट पाहणाऱ्यांचं देखील हेच मत आहे की, गायनेकोलॉजिस्ट असून देखील त्याला सेक्स करताना महिलेला होणाऱ्या वेदनेची जाणीव नाही.

ऋचाच्या पतीला त्याची पत्नी शारीरिक संबंधांसाठी तयार आहे की नाही, या गोष्टीनं काहीही फरक पडत नाही. याच कारणामुळे ऋचा त्याला म्हणते, की तिला फक्त 'यांत्रिक सेक्स' करण्याची इच्छा नाही.

चित्रपटात पती जेव्हा एका क्षणी पत्नीचं चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती म्हणते की तिला 'वास येतो आहे.' त्यावर पती म्हणतो, "तुझ्या अंगाला किचनचा सुगंध येतो आहे आणि हा जगातील सर्वात सेक्सी गंध आहे."

मात्र, थोडा वेळ गेल्यानंतर, पत्नी जेव्हा पतीकडे प्रेम करण्याची आणि 'फोरप्ले' करण्याची मागणी करते, तेव्हा हाच पती तिला 'सेक्स एक्सपर्ट' असण्याचा टोमणा मारतो. तो म्हणतो की तुझ्यावर प्रेम काय करू, "तुझ्या अंगाला तर सारखा किचनचा दुर्गंध येतो."

'मिसेस' चित्रपटात पती-पत्नीमधील भावनिक संबंधांमध्ये निर्माण झालेली दरी दाखवण्यात आली आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'मिसेस' चित्रपटात पती-पत्नीमधील भावनिक संबंधांमध्ये निर्माण झालेली दरी दाखवण्यात आली आहे.

प्रेक्षकांनी या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ही एक महत्त्वाची समस्या आहे. अनेक पुरुष या समस्येकडे डोळेझाक करतात.

चित्रपटातील मुख्य पात्र ऋचाप्रमाणेच अनेक महिला याच कारणामुळे सेक्स टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण सेक्सच्या बाबतीत पुरुषांकडून रोमांटिकपणा कमी होत जातो. त्यामुळे घरातील रोजच्या कामामुळे थकलेल्या महिला, खोलीत जाणंच टाळतात.

चित्रपटात एका दृश्यात ज्याप्रमाणे ऋचा लाउंजवरच्या सोफ्यावरच झोपते, अगदी तसंच महिलांच्या बाबतीत देखील होतं.

सेक्सबाबत महिलांचं विचारमंथन

डॉ. एविड डीहार महिला अधिकारांसंदर्भातील सक्रिय कार्यकर्त्या आहेत आणि ब्रिटनमध्ये मुलांच्या तज्ज्ञ म्हणून काम करतात. त्या म्हणाल्या, "शारीरिकदृष्ट्या विचार करता महिलांना अनेक कामं असतात. मासिक पाळीच्या वेळेस महिलांच्या हार्मोन्समध्ये चढ-उतार होत असतात."

त्याचं म्हणणं आहे की, हार्मोन्समध्ये दर महिन्याला होणाऱ्या चढ-उतारांमुळे महिलांमध्ये उदासपणा, थकवा येतो आणि शारीरिक ऊर्जेची कमतरता निर्माण होते.

त्या पुढे म्हणतात, "अशा परिस्थितीत महिलांना समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यांच्यातील सेक्सची इच्छा कमी किंवा अधिक होऊ शकते."

"त्यामुळे पत्नीच्या शरीर आणि वर्तनात होणाऱ्या या बदलांना पती जर योग्य वेळीच समजू शकले तर ते त्यांच्या जोडीदाराबरोबर चांगले शारीरिक संबंध ठेवू शकतात. महिलांच्या शरीरात हार्मोन्सची जी अस्थिरता निर्माण होते, त्यामुळे शारीरिक संबंधांसाठी त्या नेहमीच तयार असू शकत नाहीत."

चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना तो सीन देखील अस्वस्थ करतो, ज्यात ऋचाला मासिक पाळी आल्यावर तिचा पती तिला किचनमध्ये येण्यापासून रोखतो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना तो सीन देखील अस्वस्थ करतो, ज्यात ऋचाला मासिक पाळी आल्यावर तिचा पती तिला किचनमध्ये येण्यापासून रोखतो.

एविड डीहार म्हणतात, "अशा स्थितीत महिलांना सेक्स करण्यासाठी भाग पाडणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे त्यांच्या जननेंद्रियाला अपाय होण्याचा धोका असतो.

त्याचबरोबर महिलांवर गंभीर स्वरुपाचा मानसिक आघात देखील होऊ शकतो. त्यानंतर यातून सावरण्यासाठी महिलांना अनेक वर्षे शारीरिक आणि मानसिक उपचारांची आवश्यकता पडू शकते."

मुलगी-सून यांच्यातील भेदभाव

विवाहानंतर मुलगी घरकामच करेल, ही मानसिकता विवाहात मिळणाऱ्या भेटवस्तूंवर देखील लक्षात येते. या चित्रपटातील मुख्य पात्र असलेल्या ऋचाला देखील त्याप्रमाणे बहुतांश भेटवस्तू म्हणून स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तूच मिळतात.

ऋचा देखील सासरा आणि पतीच्या आनंदासाठी तिचा नृत्याचा छंद विसरून सासूच्या गैरहजेरीत घरातील कामं करत राहते. इतकंच काय स्वयंपाक आणखी चांगला कसा होईल याचा प्रयत्न देखील करते.

मात्र जसजसा काळ जातो तसंतसं तिला वाटू लागतं की, काहीही केलं तरी तिचं कौतुक होत नाही. ऋचाची आईदेखील तिला परिस्थितीशी तडजोड करत 'जुळवून घेण्यास' सांगते.

एका प्रसंगी ऋचाचे सासरे तिला कपडेसुद्धा हातानं धुण्यास सांगतात. कारण त्यांना वाटतं की वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यावर कपड्यांच्या घामाचे डाग जात नाहीत.

चित्रपट पाहणारा एका सीनमुळे आश्चर्यचकित होतो. त्यात ऋचाला मासिक पाळी आल्यानंतर तिचा पती तिला स्वयंपाकघरात जाण्यास रोखतो.

मात्र, याचा फायदा असा होतो की पाच दिवस ऋचा तिच्या घरातील जबाबदाऱ्या, काम यातून मुक्त होते आणि तिला आराम करण्याची संधी मिळते.

दुसऱ्या बाजूला विटाळ मानणाऱ्या तिच्या पती आणि सासऱ्यासाठी मात्र हा काळ कठीण ठरतो.

भारत आणि पाकिस्तानातील कुटुंबांमध्ये नेहमीच मुलगा आणि सून यांच्याबाबतीत भेदभाव केला जातो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारत आणि पाकिस्तानातील कुटुंबांमध्ये नेहमीच मुलगा आणि सून यांच्याबाबतीत भेदभाव केला जातो.

भारत आणि नेपाळमधील काही भागांमध्ये अजूनही मासिक पाळीच्या काळात महिलांना स्वयंपाकघरात जाऊ दिलं जात नाही. इतंकच नाही तर त्यांना घरातून देखील बाहेर काढलं जातं.

घरकाम करताना होणारा त्रास तर ऋचा सहन करून घेते. मात्र ज्यावेळेस तिला नृत्याचा छंद जोपासण्यापासून रोखलं जातं आणि सोशल मीडियावरील तिच्या नृत्याचे जुने व्हिडिओदेखील डीलीट करण्यास सांगितलं जातं, तेव्हा ती दु:खी होते.

एक वेळ अशी येते की ऋचाला या गोष्टीची जाणीव होते की काहीही केलं तरी उपयोग नाही. मग ती घर सोडून निघून जाते. मात्र, तिचे आईवडील तिला परत सासरी जाण्यास सांगतात.

त्यावेळेस ती म्हणते, "तुमच्यासारख्या आईवडिलांनीच मुलांना बिघडवलं आहे. मी मुलगा नाही, मुलगी आहे. मुलांना जो मानसन्मान मिळतो, तोच मानसन्मान मुलींना देखील मिळायला हवा."

चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात ऋचा आणि दिवाकर वेगळे होत त्यांच्या आयुष्यात पुढील वाटचाल करताना दाखवले आहेत.

ऋचा तिचा नृत्याचा छंद जोपासताना दिसते तर दिवाकरच्या घरात एक नवीन सून दिसते. ऋचा ज्याप्रकारे कधीकाळी घरकामात व्यस्त असायची, मेहनत करायची तशीच स्थिती नव्या सुनेचीसुद्धा दिसते.

'भारत-पाकिस्तानातील महिलांच्या आयुष्याचं प्रतिबिंब'

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये सोशल मीडियावर या चित्रपटावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

एका बाजूला चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या पुरुष अभिनेत्यांच्या फोटोंबरोबर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत की, 'सद्यपरिस्थितीत सर्वाधिक तिरस्कारप्राप्त पुरुष आहेत'. तर दुसरीकडे महिलांच्या समस्या इतक्या सुंदर पद्धतीनं मांडल्याबद्दल चित्रपटाचं कौतुक देखील होतं आहे.

सोशल मीडियार मेहनाज अख्तर या युजरनं प्रतिक्रिया दिली की, "जर तुम्ही गृहिणी असाल तर यात तुमच्यासाठी नवं काहीही नाही.

जे तुमच्या आयुष्यात चोवीस तास घडतं आहे, तेच रुपेरी पडद्यावर का पाहायचं? पुरुषांना मात्र सल्ला आहे की हा चित्रपट नक्की पाहा. असे चित्रपट विशेषकरून पुरुषांसाठीच तयार केले जातात."

तर इकरा बिन्त सादिक या युजरनं सोशल मीडियावर म्हटलं आहे की, "प्रश्न, भांडी घासणं, चटणी तयार करणं किंवा घराची साफसफाई स्वत: करण्याचा नाही! तसा तो कधीच नव्हता!"

"प्रश्न एवढाच आहे की तुम्ही जर तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात हे काम करण्याची जबाबदारी एखाद्यावर टाकली आहे... तर कमीत कमी ती जबाबदारी पार पाडण्यासाठी त्या व्यक्तीला मानसन्मान तरी द्या."

मोमिना अन्वर यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, "मिसेस हा फक्त एक चित्रपट नाही. भारतीय आणि पाकिस्तानी महिलांच्या आयुष्याचं ते प्रतिबिंब आहे. हा चित्रपट प्रत्येक महिला आणि पुरुषानं पाहायलाच हवा."

"यातून आपल्या समाजाचं वास्तव तर समोर येतंच. पण त्याचबरोबर नात्यांमध्ये आदर, समानता आणि माणुसकी असणं किती महत्त्वाचं आहे, याचा विचार करण्यासदेखील हा चित्रपट भाग पाडतो."

पाकिस्तानात सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा होते आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानात सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा होते आहे.

प्रसाद कदम नावाच्या यूझरनं म्हटलं की, "मला आठवतं, एकदा मी बिर्याणी बनवली होती. त्यावेळी आईवडिलांनी माझं कौतुक केलं होतं, मात्र माझी बहीण रागावलेली होती. बिर्याणी बनवण्यासाठी तिनेच खूप मेहनत घेतली होती. मी तर फक्त बिर्याणीसाठी लागणाऱ्या गोष्टी एकत्र केल्या होत्या."

"स्वयंपाकघरात मी जी घाण केली होती, त्याची साफसफाई कोणी केली ते मला आठवत देखील नाही. हा पितृसत्ताक विचार भारतीय कुटुंबाचं वास्तव आहे. भारतीय पुरुषांच्या संगोपनात काहीतरी चुकतं आहे."

आणखी एका पुरुष यूझरनं चेष्टा करण्याच्या सुरात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

त्यात तो म्हणतो आहे की, "माझ्या पत्नीनं नुकताच 'मिसेस' चित्रपट पाहिला. तेव्हापासून ती रुसून बसली आहे.

मी स्वयंपाक करतो आहे. आता मी आलू पराठे बनवतो आहे. चित्रपट निर्मात्यांनी अशी टीप देत जावी की हा चित्रपट सर्वांसाठी नाही. सर्व महिला एकसारख्या नसतात आणि सर्व पुरुषदेखील एकसारखे नसतात."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.