तुम्ही यापूर्वीच घेतलेली लस कोरोनाच्या नव्या व्हेरियंटलाही रोखू शकेल का?

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, भाग्यश्री राऊत
  • Role, बीबीसी मराठीसाठी

राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागानुसार सध्या राज्यात कोरोनाचे 425 सक्रीय रुग्ण आहेत, तर 19 मेनंतर कोरोनामुळे 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

याआधीही कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या आहेत. यामध्ये आजाराची तीव्रता जास्त होती. त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर देशात लसीकरण मोहीम राबवण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

पण, आपण 2022 पर्यंत घेतलेल्या लशी या नवीन व्हेरियंटवर परिणामकारत ठरणार आहेत का? तसेच नवीन व्हेरियंटमुळे कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता आहे का? अशाच काही प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात.

पण, त्याआधी कोरोनाचा हा नवा व्हेरियंट नेमका काय आहे? त्याची लक्षणं नेमकी काय आहेत? हेही समजून घेऊ.

काय आहे कोरोनाचा नवा JN.1 व्हेरियंट?

सध्या सिंगापूर, हाँगकाँगमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सिंगापूरमध्ये आतापर्यंत ज्या नमुन्यांचं जिनोम सिक्वेसिंग झालं, त्यात बहुतेक प्रकरणं JN.1 व्हेरियंटची आढळून आल्याचं इकॉनॉमिक टाइम्सने म्हटलंय.

पण, हा JN.1 व्हेरियंट नवीन नाही. गेल्या काही वर्षात आढळून आलेल्या ओमिक्रॉनकचा हा सब-व्हेरियंट आहे.

दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स (AIIMS) चे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संजय राय हे कोव्हॅक्सिन या कोव्हिड लशीच्या तीनही टप्प्यांमध्ये प्रमुख संशोधक होते.

बीबीसीचे प्रतिनिधी चंदन जजवाडे यांनी त्यांच्याकडून कोव्हिड 19 च्या JN.1 व्हेरियंटबद्दल माहिती घेतली होती.

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉ. संजय राय म्हणाले की,"JN.1 कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरसचाच एक व्हेरियंट आहे. याचा शोध लागून वर्षभरापेक्षा अधिक काळ उलटलाय. हा काही नवीन व्हायरस नाही. हा गंभीर ठरू शकतो वा नाही, याबद्दल आपल्याकडे सगळी माहिती आहे. JN.1 व्हेरियंटला घाबरण्याची गरज नाही. तसे कोणतेही पुरावेही नाहीत. आता आढळलेल्या गोष्टींनुसार हा कॉमन सर्दी-खोकल्याप्रमाणे किंवा त्याहीपेक्षा सौम्य असू शकतो."

पण, हा नवीन व्हेरियंट धोकादायक ठरू शकतो का? यासाठी काय काळजी घ्यायला हवी? याबद्दल आम्ही तज्ज्ञांची मतं जाणून घेतली.

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे हे कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारनं तयार केलेल्या टास्क फोर्समध्ये होते.

डॉ. गावंडे सांगतात की, "हा व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षा सौम्य आहे. पण, हा व्हेरियंट वेगानं पसरतो. एका व्यक्तीला लागण झाली असेल तर त्याच्याकडून अनेक लोकांना वेगानं या व्हेरियंटची बाधा होऊ शकते."

पण, या व्हेरियंटची तीव्रता जास्त नाही. त्यामुळे सर्वसाधारण लोकांना घाबरण्याची इतकी गरज नाही. लहान मुलं, म्हातारी माणसं आणि ज्यांना आधीच खूप आजार आहेत अशा लोकांनी नक्कीच काळजी घ्यायला हवी, असंही ते म्हणाले.

तसेच ज्यांना कोरोनाच्या या व्हेरियंटची लागण झालेली आहे स्वतःला इतर लोकांपासून दूर ठेवावं. इतरांना आपल्यापासून लागण होणार नाही याची काळजी घ्यावी.

ग्राफिक्स

तर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनीही लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलेलं आहे.

प्रकाश आबीटकर बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले की, "अलीकडच्या काळात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढले हे खरं आहे. पण, अनेक लोकांना लागण झाली तरी घाबरण्याची गरज नाही.

कारण, हा व्हेरियंट सौम्य आहे. 2022 ला कोरोनाचं जसं स्वरुप होतं तसं आता नाही. कोरोना आता आपल्यासोबतच राहणार आहे. पण, लक्षणं सौम्य आहेत. योग्य त्या पद्धतीच्या खाटांची व्यवस्था, औषधोपचार सगळ्या दृष्टीनं आपलं प्रशासन सज्ज आहे."

आधी घेतलेल्या लशी परिणामकारक ठरणार का?

कोरोनानं दोन वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घातला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आपल्या देशात लसीकरण मोहीम राबवण्यात आली.

यामध्ये कोव्हॅक्सीन, कोव्हिशिल्ड अशा दोन लशींचं मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं. तर रशियाची स्पुतनिक ही लसही काही लोकांनी घेतली होती.

पण, दोन वर्षांपूर्वी झालेलं लसीकरण आताच्या व्हेरियंटविरोधात उपयोगी ठरेल का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

ज्यांनी लशींच्या दोन डोससह बूस्टर डोस घेतला त्यांना थोडा फायदा निश्चितच होईल, असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.

ते म्हणाले की, "आपल्याकडे कोव्हीडचा पहिला जो विषाणू होता त्यावरच लशी बनल्या होत्या. त्या लशी मूळ विषाणूवरच पूर्णपणे प्रभावी नव्हत्या.

लस घेतल्यानंतर कोरोना होत नाही असं नाही. पण, लागण झाली तर त्याची लक्षणं सौम्य असतात. पण, ज्या लोकांनी लशीचे दोन्ही डोस आणि बूस्टर डोस घेतला असेल अशा लोकांमध्ये थोडी रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टाकू शकते.

पण, फक्त दोन डोस घेतले असतील किंवा एक डोस घेतला असेल तर अशा लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असेल. कोरोनाच्या लशींचा फायदा निश्चितच होईल पण ज्यांनी दोन डोसह बूस्टर डोस घेतला आहे त्यांनाच हा फायदा होईल."

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

तर तेव्हा झालेलं लसीकरण आताच्या व्हेरियंटवर काम करणार नाही असं डॉ. अविनाश गावंडे यांना वाटतं.

त्यांच्या मते, "कोरोनासाठी दरवर्षी लसीकरण करणं फायद्याचं ठरणार आहे. त्यासाठी दरवर्षी नवीन लशी तयार कराव्या लागतील. कारण, त्याच लशी नवीन व्हेरियंटवर काम करणार नाहीत.

जसं एक वर्षाआधी इन्फ्लुएन्झावर दिलेली लस दुसऱ्या वर्षी कुठल्या कामाची नसते, दुसऱ्या वर्षी नव्यानं लस तयार करावी लागते, तसंच कोरोना पूर्णपणे आटोक्यात आणायचा असेल तर अशाच नवीन लशी तयार कराव्या लागतील.

पण, जुन्या लशींमुळे काहींच्या शरीरात थोडीशी रोगप्रतिकारशक्ती असेल, तर ती या व्हेरियंटविरोधात लढण्यास मदत करेल."

पण, संशोधनासाठी होणारा खर्च जास्त असल्यानं नवीन लशी येणं शक्य नाही असं अविनाश भोंडवे सांगतात.

इन्फ्लूएन्झाचा व्हायरस पूर्णपणे बदलतो. त्यामुळे नवीन लस निघते. कोरोनामध्ये त्याचे नवीन व्हेरियंट वीक होत आहेत. तसं इन्लफ्लूएंजामध्ये होत नाही. त्यामुळे कोरोनावरील आधीच्या लशींचा थोडातरी फायदा होईल, असं त्यांचं म्हणणं आहे.

पण, अधिक शक्तीशाली व्हेरियंट आला तर ही रोगप्रतिकारशक्ती टीकून राहील का ही शंकाही त्यांनी उपस्थित केली.

कोरोनाचे नवीन व्हेरियंट येत राहीतील. पण, त्यावर प्रत्येकवेळी नव्यानं लस तयार करणं शक्य होत नाही. कारण लसीकरणाला लोकांचा विरोध असतो. त्यामुळे लशीसाठी होणारा खर्चही भरून निघत नाही.

त्यामुळे रिसर्च होऊन नवीन लशी येत नाहीत. कारण, संशोधनाला खूप खर्च लागतो. दरवर्षी व्हेरियंट आला की, लस बनली पाहिजे हे बरोबर आहे. आर्थिक कारणामुळे लसी येत नाहीत. जर त्या लसी आल्या तर प्रत्येकानं लसीकरण करणंही गरजेचं आहे, असंही मत त्यांनी मांडलं.

नवीन लाट येईल का?

कोरोनाचा हा व्हेरियंट वेगानं पसरणारा आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर मग कोरोनाची नवी लाट येईल का? असेही प्रश्न अनेकांना पडले आहेत.

यावेळी नवीन लाट येण्याची शक्यता कमी आहे, असं डॉ. अविनाश गावंडे यांना वाटतं. यामागे ते तीन कारणं असल्याचं सांगतात.

पहिलं म्हणजे, आपल्या देशात बऱ्यापैकी लोकांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे या व्हेरियंटविरोधात लढण्यासाठी किमान थोडी तरी रोगप्रतिकारशक्ती काही जणांच्या शरीरात आहे.

दुसरं म्हणजे हा व्हेरियंट वेगानं पसरत असला, तरी त्याची तीव्रता कमी आहे. अनेक लोकांना झाला तरी तो लवकर बरा होईल. त्यामुळे मागच्यासारखी परिस्थिती उद्भवणार नाही, असं मत त्यांनी मांडलं.

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

तिसरं म्हणजे एखाद्या व्यक्तीला या व्हेरियंटची लागण झाली असेल, तरी आजाराची तीव्रता कमी असल्यामुळे कदाचित त्याला माहितीही पडणार नाही.

पण, या व्हेरियंटची लागण झाल्यानं त्या व्यक्तीच्या शरीरारात या व्हेरियंटविरोधात लढण्यासाठी प्रतिकारशक्ती तयार झालेली असेल.

डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की, नवीन व्हेरियंट JN.1 हा ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे. याची आक्रमकता जास्त आहे. पण, लक्षणं सौम्य आहेत. ते गंभीर स्वरुप धारण करत नाही. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण देखील कमी दिसतं.

रुग्णांची संख्या वाढली आणि जास्तीत जास्त लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं, मृत्यूदर वाढला की कोरोनाची नवीन लाट आली असं म्हणता येईल.

पण, या व्हेरियंटमध्ये रुग्णांची संख्या वाढली तरी खूप लोकांना रुग्णालयात दाखल व्हावं लागेल अशी परिस्थिती मुळातच येणार नाही. कारण, लक्षणं खूप सौम्य आहेत.

तसेच मृत्यूदर पण कमी आहे. त्यामुळे कोरोनाची नवीन लाट येईल असं म्हणता येणार नाही. पण ज्या लोकांना आधीच सहव्याधी आहेत त्यांनी काळजी करण्याची गरज आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)