हुमायून: हरलेलं साम्राज्य हुमायूनने परत कसं मिळवलं?

फोटो स्रोत, Getty Images
हुमायून बद्दलच्या खूप साऱ्या कथा प्रसिद्ध आहेत. यातलीच एक अशी की, एकदा हुमायून खूप आजारी पडला होता. दिवसेंदिवस त्याची तब्येत खालावत चालली होती. त्यावेळी त्याच्या वडिलांनी म्हणजेच बाबरने त्याच्या पलंगाला तीन चकरा मारल्या आणि प्रार्थना केली की, 'परमेश्वरा, जर एखाद्या आयुष्याच्या बदल्यात आयुष्य देता येत असेल तर, तू माझं आयुष्य घे.'
हुमायूनची बहीण गुलबदन हुमायूनच्या चरित्रात लिहिते, 'आणि त्या दिवसापासून बाबरची तब्येत खालावू लागली आणि दुसऱ्या बाजूला हुमायून बरा व्हायला लागला. बाबर आता अंथरुणाला खिळला होता. तो या आजारपणातून बरा होत नाही असं वाटू लागल्यावर हुमायूनला बोलावणं धाडलं.'
बाबरच्या मृत्यूच्या चार दिवस आधी हुमायून आग्ऱ्यात येऊन पोहोचला.बाबरने सर्व सेनाप्रमुखांना बोलावून हुमायून आपला वारस असेल असं घोषित केलं. आणि जशी तुम्ही माझी काळजी घेतली तशीच काळजी हुमायूनची देखील घ्या असं सांगितलं. आपल्या प्रजेची आणि भावांची काळजी घे आणि त्यांच्याशी दयाळूपणे वाग असा कानमंत्र बाबरने हुमायूनला दिला होता.
इब्राहिम लोदीविरुद्धची मोहिम...
हुमायूनचा जन्म 6 मार्च 1508 रोजी काबूल मध्ये झाला. सत्तेवर आला त्यावेळी तो अवघ्या 27 वर्षांचा तरुण होता. या काळात त्याने चांगले गुण तर दाखवलेच सोबतच त्याच्या वाईट गुणांची देखील प्रचिती आली. त्यामुळे पदरी कधी यश तरी निराशा पडत गेली.
12 वर्षांचा असताना बाबरने त्याला बदक्शाँच्या सुभेदारीवर पाठवलं. आणि 17 वर्षांचा झाल्यावर हुमायून आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून लढायांमध्ये सहभागी होऊ लागला. बाबरने आपल्या 'बाबरनामा' या आत्मचरित्रात लिहिलंय की, 'मी हुमायूनला इब्राहिम लोदीच्या सैन्याचा सामना करण्यासाठी हिसार फिरोजाच्या गव्हर्नरच्या नेतृत्वाखाली पुढे पाठवलं होतं. आणि त्याने जेव्हा लोदीच्या सैनिकांना धूळ चारली तेव्हा मी त्याला हिसार फिरोजाची जहागीर देऊ केली.

फोटो स्रोत, ATLANTIC
पानिपतच्या विजयानंतर मी त्याला आग्र्याच्या मोहिमेवर पाठवलं. तिथं ग्वाल्हेरच्या राजघराण्याने त्याला एक मोठा हिरा दिला. या हिऱ्याची किंमत इतकी होती की, तो विकला तर त्यात संपूर्ण जगाचं अडीच दिवस पोट भरेल. मी आग्र्याला गेल्यावर त्याने मला गो हिरा दाखवला पण मी तो त्याला परत केला.'
मजबूत साम्राज्य निर्माण करण्याची इच्छा...
बाबरचा मृत्यू झाल्याची बातमी तीन दिवस बाहेरच्या जगापासून लपवून ठेवण्यात आली होती. यावरून कळतं की, बाबरच्या मृत्यूमुळे मुघल साम्राज्याला असुरक्षित वाटत होतं. 30 डिसेंबर 1530 रोजी हुमायून भारताच्या सत्तेवर आला. एस.एम. बर्क त्यांच्या 'अकबर द ग्रेटेस्ट मुघल' या पुस्तकात लिहितात, 'हुमायून घोडेस्वारी आणि धनुर्विद्येत तरबेज झाला होता. पण मोठा विजय मिळवण्याची इच्छाशक्ती त्याच्याकडे नव्हती. शिवाय त्याचं नेतृत्व देखील म्हणावं तितकं आक्रमक नव्हतं. त्याच्या गरजेच्यावेळी लोकांनी त्याची साथ सोडली. पण काही झालं तरी हिंमत न हरण्याची वृत्ती त्याच्याकडे होती. याच वृत्तीमुळे त्याला त्याचं गेलेलं साम्राज्य पुन्हा एकदा मिळवता आलं. सम्राट म्हणून गादीवर असताना झालेल्या पहिल्या लढाईत म्हणजेच 1531 साली हुमायूनने जौनपूरजवळ महमूद लोदीचा पराभव केला होता. पुढे 1534 मध्ये शेरशाहच्या वाढत्या ताकदीला पायबंद घालण्यासाठी त्याला पूर्वेकडील मोहीम आखावी लागली. पण तो तिथं पोहोचण्यापूर्वीच बहादूरशहाने डोकं वर काढलं आणि हुमायूनला मोहीम अर्ध्यात टाकून परतावं लागलं. याचा परिणाम, शेरशाहची ताकद पूर्वीपेक्षा कैक पटींनी वाढली. 1534-35 मध्ये हुमायूनने माळवा आणि गुजरात जिंकून घेतलं.
चौसाच्या मोहिमेत पराभव...
शेरशाहवर नियंत्रण मिळवण्यासाठी हुमायूनने 1537 मध्ये पुन्हा एकदा पूर्वेची मोहीम आखली. त्याने बंगालची राजधानी गौरवर विजय मिळवला.
त्या वेळचे प्रसिद्ध इतिहासकार जोहर आफताबची आपल्या 'तजकिरात-उल-वकियात' या पुस्तकात लिहितात, "गौर वर विजय मिळवल्यानंतर हुमायूनने आपलं हरम सोडलंच नाही. दरम्यानच्या काळात शेरशाहने बनारस आणि जौनपूर काबीज केलं. ही ठिकाणं राजधानीच्या वाटेवर असल्याने हुमायूनच्या मार्गात अडथळे येणार होते."

फोटो स्रोत, RUPA
ते लिहितात, '7 जून 1539 साली झालेल्या चौसाच्या युद्धात हुमायूनचा पराभव झाला. हुमायून स्वतः या लढाईत सहभागी झाला होता आणि यावेळी एक बाण त्याच्या दंडात घुसला होता. हुमायूनने त्याच्या सैन्याला जेव्हा पुढे जाण्याचे आदेश दिले तेव्हा सैन्याने त्याच्या आदेशाचं पालन केलंच नाही. शेवटी हुमायूनलाच आपला जीव वाचवण्यासाठी युद्धाचं मैदान सोडून पळावं लागलं.
'गंगा नदी ओलांडत असताना नदीच्या जोरदार प्रवाहात त्यांचा घोडा वाहून गेला. एका भिष्टीने त्याला आधार देऊन त्याचा जीव वाचवला. नंतर हुमायूनने त्याला अर्ध्या दिवसासाठी आपल्या गादीवर बसवून त्याच्या उपकारांची परतफेड केली.'
कन्नौजमध्येही पराभव...
चौसाच्या युद्धात झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी हुमायूनने पुढच्याच वर्षी मोहीम आखली. पण त्याच्या सहकाऱ्यांनी याहीवेळी त्याची साथ सोडली आणि 17 मे 1540 रोजी कनोजजवळ शेरशाह सूरीने पुन्हा त्याचा पराभव केला. विशेष म्हणजे याहीवेळी हुमायूनकडे शेरशाहपेक्षा मोठी फौज होती आणि तरीही त्याचा पराभव झाला. जोहर आफताबची लिहितात, 'अफगाण सैनिक हुमायूनच्या समोर त्याचा तोफखाना लुटत होते. जवळच असलेला हत्ती हुमायूनच्या नजरेस पडला, हा हत्ती त्याच्या वडिलांसोबत म्हणजे बाबरसोबत असायचा. हुमायूनने हत्तीवर मांड ठोकली , पण त्या क्षणाला त्याला वाटलं की हत्तीचा माहूत त्याला शत्रूच्या छावणीकडे घेऊन चाललाय.
'त्याच हौद्यात लपून बसलेल्या किन्नराने हुमायूनला सांगितलं की, तलवारीने माहूतचा शिरच्छेद कर. पण माहुताला मारलं तर हत्तीला पुढं न्यायचं कसं हा प्रश्न त्याच्या समोर होता. कारण हुमायूनला हत्तीवर स्वार कसं व्हायचं माहीत नव्हतं. त्यावर आपल्याला हत्तीवर स्वार व्हायचं माहिती आहे असं किन्नराने हुमायूनला सांगितलं. मग हुमायूनने मागचा पुढचा विचार न करता तलवारीने माहूतचा शिरच्छेद केला.'

फोटो स्रोत, ATLANTIC
अबुल फजलनेही अकबरनामामध्ये या घटनेचं वर्णन केलंय. व त्याने यात कोणत्याही किन्नराचा उल्लेख केलेला नाही.
हैदर मिर्झा डोगलत त्यांच्या 'तारीख-ए-रश्बिदी' या पुस्तकात लिहितात, 'त्या दिवशी हुमायूनकडे 17 हजरांची फौज होती. मात्र पळून जाताना तो एकटाच उरला होता. ना त्याच्या डोक्यावर त्याचा जिरेटोप होता ना पायात चपला. त्याच्या चपलांप्रमाणे त्याचा आत्मविश्वासही थंडावला होता.'
भावांशी असलेले मतभेद...
कनोज ते आग्रा असा प्रवास करण्यासाठी हुमायूनने उधारीवर एक घोडा घेतला. हुमायून आग्र्याला पोहोचण्याआधीच त्याच्या पराभवाची बातमी पोहोचली होती. जोहर लिहितात, 'आग्र्याच्या वाटेवर असताना भानगावजवळ 3,000 गावकऱ्यांनी हुमायुनची वाट अडवली. हे गावकरी पराभूत सैन्याला लुटण्यात निपुण होते. या गावकऱ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी हुमायूनने त्याचे भाऊ हिंदाल आणि अस्करी यांच्याकडे मदत मागितली. पण त्याचे हे दोन्ही भाऊ आपापसातच भांडू लागले. शेवटी कसंबसं त्या गावकऱ्यांना चकवा देऊन हुमायून आग्रा गाठण्यात यशस्वी झाला. पण जुलै 1540 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर 10 वर्षांतच हुमायूनलाही आग्राही सोडावं लागलं हुमायून आग्र्याहून पळला तेव्हा शेरशाहने त्याच्या राजपूत सेनापती ब्रम्हदत्त गौरला हुमायूनच्या मागावर पाठवलं. यावेळी ब्रम्हदत्त गौर मोठ्या सैन्यानिशी आग्र्याकडे आला. अब्बास सरवानी लिहितात, ब्रम्हदत्तने हुमायूनशी लढण्याऐवजी फक्त त्याचा पाठलाग करावा असे आदेश होते. हुमायूनचा पाठलाग करून पकडण्याऐवजी त्याला भारताबाहेर हुसकावून लावणं हा शेरशाहचा उद्देश होता. शेरशाहविरुद्धच्या पहिल्या मोहिमेत हुमायूनसोबत त्याचे भाऊ हिंदाल आणि अस्करी दोघेही होते. पण ब्रम्हदत्त मागावर असल्याचं कळताच हिंदालने हुमायूनची साथ सोडून आग्र्याला परतण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
तिथं हुमायूनच्या अनुपस्थितीत सत्ता हस्तगत करून हिंदालने स्वतःच्या नावाने खुत्बा वाचायला सुरुवात केली होती. शेरशाहचा पराभव करण्यासाठी हुमायूनने आपल्या भावांसमोर एकतेचा प्रस्ताव ठेवला. पण त्याचा दुसरा भाऊ कामरानने या प्रस्तावाला आडकाठी आणली. शेवटी त्याने आपल्या सैनिकांसह लाहोरच्या दिशेने कूच केली. गुलबदन बेगम लिहितात, 'हुमायूनने लाहोरहून शेरशाहला संदेश पाठवला की, मी तुमच्यासाठी संपूर्ण हिंदुस्थान सोडलाय, निदान मला लाहोरमध्ये तरी राहू द्या. यावर शेरशाहने उत्तर दिलं की, मी तुझ्यासाठी काबुल राखून ठेवलंय तू तिकडे का जात नाहीस? त्यानंतर पुढची 15 वर्ष हुमायूनने दिल्लीपासून दूर इराण, सिंध आणि अफगाणिस्तानमध्ये घालवली.
भारतावर हल्ला...
मे 1545 मध्ये युद्धादरम्यान झालेल्या एका स्फोटात शेरशाहचा मृत्यू झाला. शेरशाह नंतर सत्तेवर आलेल्या त्याच्या मुलाचा 1553 मध्ये मृत्यू झाला.
त्यानंतर मात्र शेरशाहच्या साम्राज्याला सुरुंग लागला. इकडे काबुलमध्ये 1554 दरम्यान सलीम शाह सूरी मरण पावल्याच्या, त्याच्या मुलाला काकाने मारल्याच्या बातम्या येऊन धडकू लागल्या. याच दरम्यान आपलं गेलेलं साम्राज्य परत मिळवण्यासाठी हुमायूनने भारतावर आक्रमण करण्याचं ठरवलं.

फोटो स्रोत, JUGGERNAUT
त्याने नोव्हेंबरमध्ये भारताच्या दिशेने कूच केली. आता यावेळी त्याच्याकडे 3 हजारांचं सैन्य होतं. त्याने डिसेंबर 1554 मध्ये सिंधू नदी ओलांडली तेव्हा सुरी वंशावर दावा सांगणारे तीन जण उभे राहिले. यात सर्वात पुढे होता सिकंदर शाह. सिकंदरचं दिल्लीपासून पंजाबमधील रोहतास पर्यंत नियंत्रण होतं. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी हुमायूनने बैराम खानला कंदहारहून बोलावून घेतलं. त्याच्यासोबत 12 वर्षांचा अकबरही होता. 24 फेब्रुवारी 1555 मध्ये हुमायून लाहोरमध्ये दाखल झाला पण त्याला कोणताही विरोध झाला नाही. सरहिंदच्या लढाईत अकबराने एका तुकडीचे नेतृत्व केलं. यावेळी सिकंदरने युद्धभूमीतून काढता पाय घेतला आणि पंजाबच्या जंगलात पळून गेला. 23 जुलै 1555 रोजी हुमायूनचे सैन्य दिल्लीत दाखल झालं. पण यावेळीही नशिबाने हुमायनला साथ काही दिली नाही.
पायऱ्यांवरून घसरला...
24 जानेवारी 1556 ला हुमायूनने गुलाबपाणी मागवून अफूचा शेवटचा डोस घेतला. त्यानंतर त्याच दिवशीच्या दुपारी हज यात्रेहून आलेल्या काही लोकांची भेट घेतली. या लोकांना त्याने लाल दगडांनी बांधलेल्या ग्रंथालयात भेटीसाठी बोलावून घेतलं.
तिथं भेटीसाठी बोलावण्याचं आणखी एक कारण होतं, ते म्हणजे बाजूच्या मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी जमलेल्या लोकांना त्यांच्या सम्राटाचे दर्शन व्हावं. या भेटीनंतर हुमायुनने आपल्या गणितज्ञांना बोलावून आकाशात आज शुक्र तारा दिसणार का याची विचारपूस केली. जेणेकरून या शुभप्रसंगी तो आपल्या काही लोकांच्या पदोन्नतीचे आदेश देईल.

फोटो स्रोत, Getty Images
गुलबदन बेगम हुमायूनच्या आत्मचरित्रात लिहितात, 'त्या दिवशी वातावरणात गारठा होता. हुमायून पायऱ्यांवरून खाली येऊ लागला. तो दुसऱ्या पायरीवर होता इतक्यात जवळच्या मशिदीतून 'अल्ला हो अकबर' अशी अजान ऐकू आली. हुमायून धार्मिक होता. अजानचा आवाज कानावर पडताच त्याने गुडघ्यात वाकून खाली बसण्याचा प्रयत्न केला. व त्याचवेळी त्याचा पाय त्याच्या अंगरख्यात अडकला आणि तो पायऱ्यांवरून घसरला.
'त्याच्या सोबतच्या अंगरक्षकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. सगळेजण जेव्हा खाली गेले तेव्हा हुमायून जमिनीवर पडला होता. त्याच्या डोक्याला खोल जखम झाली होती तर उजव्या कानातून रक्ताच्या धारा वाहत होत्या.' यानंतर हुमायूनने आपले डोळे उघडलेच नाहीत आणि तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
पुस्तकांची आवड...
भलेही हुमायूनच्या नेतृत्व क्षमतेवर लोकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं असेल पण त्याच्या अंगी इतरही चांगले गुण होते. त्याला शिक्षित लोकांचा आणि कवींचा सहवास आवडायचा. दक्षिणेतील मोहिमेदरम्यान त्याने आपल्या सोबत अनेक दुर्मिळ पुस्तकं सोबत घेतली होती. अबुल फजल लिहितो, 'उश्तर गावात विजय मिळाल्यानंतर हुमायूनला किपचकजवळ पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यावेळी त्याला त्याची हरवलेली पुस्तकं सापडली आणि त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. इराणमधील वास्तव्यादरम्यान त्याच्यासोबत एक ग्रंथपाल नेहमी असायचा. ज्याठिकाणी शाही शिबिर असेल तिथं या ग्रंथपालाची उपस्थिती आवश्यक असायची.'

फोटो स्रोत, Getty Images
हुमायूनचा ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास होता. तो ग्रहांच्या रंगानुसार कपडे घालायचा. अल बदाऊँनी आपल्या 'मुंतखबुत तवारीख' या पुस्तकात लिहितात, 'हुमायून चालताना नेहमी त्याचा उजवा पाय पुढे टाकायचा. तर एखादा व्यक्ती त्याच्या कक्षात येत असताना डावा पाय टाकून आत येत असेल तर त्याला तिथंच अडवलं जायचं आणि उजवा पाय टाकून मगच प्रवेश दिला जायचा.' हुमायूनला निसर्गाविषयी, कलेविषयी प्रचंड ओढ होती. सिंधच्या वास्तव्यात एकदा त्याच्या तंबूत एक सुंदर पक्षी आला होता. हा पक्षी हुमायूनला इतका आवडला की त्याने तंबूचं दार बंद करून एका चित्रकाराला त्या पक्ष्याचं चित्र काढण्यासाठी बोलावलं. चित्र तयार झाल्यानंतर त्याने त्या पक्ष्याला जाऊ दिलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)