मुंबईतील बॉलीवुड उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीमुळे खरंच धोक्यात येईल?

मुंबई, फिल्मसिटी

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, मुंबईतील फिल्मसिटी
  • Author, मधु पाल
  • Role, बीबीसीसाठी

दोन दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आलेले उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूडच्या 50 हून अधिक प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांची भेट घेतली. उत्तरप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यात देशातील सर्वांत मोठी 'फिल्म सिटी' उभारण्याचा निर्णय घेतलाय.

नोएडामध्ये बनवण्यात येणाऱ्या या फिल्म सिटीबद्दल चर्चा करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारसोबतही चर्चा केली.

प्रोड्युसर आणि दिग्दर्शकांसोबत फिल्म सिटीची रूपरेषा आणि बॉलीवुड समोरील आव्हानं या विषयावरही त्यांनी चर्चा केली.

पण, उत्तरप्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्म सिटीमुळे मुंबईच्या फिल्म उद्योगाला धोका आहे का? यावर बॉलीवुडचं म्हणणं काय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

चित्रपट निर्मीतीत 20 ते 30 टक्क्यांची वाढ अपेक्षित

प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक आणि डिस्ट्रीब्यूडर राज बंसल बीबीसीशी बोलताना सांगतात, "हिंदी चित्रपटांसाठी मुंबई वगळता इतरत्र काहीच होत नसल्याचं माझं पहिल्यापासून मत आहे. जयपूरमध्ये आम्ही काही गोष्टी शक्य होतात का? यासाठी प्रयत्न केले होते. पण, काही होऊ शकलं नाही. उत्तरप्रदेश सरकारने यासाठी प्रयत्न सुरू केलेत, ही चांगली गोष्ट आहे."