राज कपूर : ‘चणे-फुटाणे त्यांच्या आयुष्यात जणू एक 'सेक्स ऑब्जेक्ट' ठरले होते’

राज कपूर, सिनेमा, मनोरंजन
फोटो कॅप्शन, राज कपूर
  • Author, रेहान फजल
  • Role, बीबीसी प्रतिनिधी

राज कपूर यांच्याबाबत एक आठवण नेहमी सांगितली जाते, 50 च्या दशकामध्ये जेव्हा पंडित नेहरू रशियाला गेले त्यावेळी सरकारी भोजनादरम्यान नेहरूंनंतर रशियाचे पंतप्रधान निकोलाई बुल्गानिन यांची बोलण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी मंत्र्यांसह 'आवारा हू' हे गाणं गात सुखद धक्का दिला होता.

1996 मध्ये जेव्हा राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर आणि मुलगी ऋतू नंदा चीनला गेले त्यावेळी चिनी लोकांनी त्यांना पाहताच 'आवारा हू' हे गाणं गायलं. त्यावेळी दोघांच्या डोळ्यात अश्रू आले.

हे दोघं राज कपूर यांची मुलं आहेत, हे त्यांना माहिती नव्हतं पण या गाण्याद्वारे ते राज कपूर आणि भारताप्रती आदर व्यक्त करत होते. असंही म्हटलं जातं की, 'आवारा' हा माओ त्से तुंग याचा आवडता चित्रपट होता.

ऋतु नंदा सांगतात की, 1993 मध्ये जेव्हा रशियाचे राष्ट्रपती बोरिस येल्तसीन भारतात आले आणि ऋतू नंदा यांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी ते तयारही झाले आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकावर एक संदेशही लिहिला. "मी तुमच्या वडिलांवर प्रेम करत होतो. ते आजही आपल्या आठवणींमध्ये जीवंत आहेत" असं त्यावर लिहिलेलं होतं.

पण अखेर राज कपूर यांच्या एवढ्या लोकप्रियतेचं गमक काय होतं? एकदा राज कपूर लंडनमध्ये बीबीसीच्या बुश हाऊस कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी याचं उत्तर देताना म्हटलं होतं की, "हा 1954 मधील किस्सा आहे. त्यावेळी मी माझे दोन फोटो घेऊन रशियाला गेलो होतो. त्यापैकी एक होता 'आवारा'चा. या फोटोमुळे रशियाबरोबर आमची पहिली ओळख झाली. त्यांना भारताबद्दल फार माहिती नव्हती, पण याफोटोंमुळं ते भारताच्या आणखी जवळ आले."

"आवारामधील पात्राचा चेहरा जरूर राज कपूर सारखा होता, पण त्याचं मन सामान्य जनतेचं होतं, आजही तेवढ्याच प्रेमानं धडधडणाऱ्या भारताच्या तरुणाचं ते मन होतं. खरंतर त्या लोकांनी राज कपूरला नव्हे तर भारताच्या त्या तरुणाला स्वीकारलं होते, ज्याचं मन वारंवार हेच म्हणत होतं..."

"आबाद नहीं, बर्बाद सही, गाता हूँ खुशी के गीत मगर

अनजान मगर सुनसान डगर का प्यारा हू, आवारा हू!"

पृथ्वीराज कपूर यांनी बनवलं कणखर

राज कपूर यांना वाढवण्यात आणि त्यांना राज कपूर बनवण्यात त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांचा सर्वाधिक वाटा होता. त्यांनी राज कपूर यांच्या म्हणण्यानुसार त्यांना 1 रुपया महिन्याची नोकरी दिली होती. त्यांचं काम होतं स्टुडिओमध्ये झाडू मारणं.

राज कपूर यांच्या कन्या ऋतू नंदा सांगतात की, "राज कपूर इतर मुलांप्रमाणेच ट्राममध्ये शाळेत जायचे. एक दिवस जोरदार पाऊस होत होता. राज कपूर यांनी आईला विचारलं की, आज मी कारमधून शाळेत जाऊ का? त्यांची आई म्हणाली मी तुझ्या वडिलांना विचारून सांगते. पृथ्वीराज कपूर यांना हे समजलं तेव्हा ते म्हणाले की, या पावसामध्ये पाणी अंगावर झेलत भिजत शाळेमध्ये जाण्यातही एक वेगळं 'थ्रिल' आहे. त्याचाही अनुभव घेऊ द्या."

राज कपूर, सिनेमा, मनोरंजन

फोटो स्रोत, RITU NANDA

फोटो कॅप्शन, पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर

राज कपूर दारामागे लपून त्यांची चर्चा ऐकत होते. त्यांनी स्वतः वडिलांना म्हटलं की, "सर, मी ट्राममधूनच शाळेत जाईल."

त्या सांगतात, "पृथ्वीराज कपूर यांनी जेव्हा बाल्कनीमधून राज कपूर यांना भिजत शाळेत जाताना पाहिलं तेव्हा ते पत्नी रामसमी यांना म्हणाले की, या मुलाकडे एक दिवस त्याच्या वडिलांपेक्षाही अधिक फॅन्सी कार असतील."

कपूर कुटुंबाबाबतचं बहुचर्चित पुस्तक 'द कपूर्स-द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा', लिहिणाऱ्या मधू जैनही असाच एक किस्सा सांगतात.

त्या सांगतात, "एकदा जेव्हा पृथ्वीराज कपूर घरातून बाहेर निघाले तेव्हा त्यांना राज कपूर उभे असलेले दिसले. त्यांनी विचारलं की, तू आतापर्यंत स्टुडिओत का नाही गेला? एवढं विचारून ते कारमध्ये बसले आणि वेगानं पुढं निघून गेले. दोघांनाही एकाच ठिकाणी जायचं होते, पण त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या कारमध्ये बसवलं नाही. राज कपूर यांना अखेर बसने स्टुडिओत जावं लागलं."

नेहमी जमिनीवर झोपायचे राज कपूर

राज कपूर यांच्याबाबत आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे. ती म्हणजे ते कधीही पलंगावर झोपत नव्हते, कायम खाली जमिनीवरच झोपायचे. त्यांची ही सवय भारताचे माजी राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंह यांच्यासारखी होती.

राज कपूर, सिनेमा, मनोरंजन

फोटो स्रोत, RITU NANDA

फोटो कॅप्शन, राज कपूर

ऋतु नंदा सांगतात की, "राज कपूर कोणत्याही हॉटेलमध्ये थांबले तर, पलंगावरील गादी काढून जमिनीवर अंथरायचे. त्यामुळे त्यांना अनेकदा अडचणींचा सामनाही करावा लागला. लंडनच्या प्रसिद्ध हिल्टन हॉटलमध्ये त्यांनी असं केलं तेव्हा व्यवस्थापकांनी त्यांना याबाबत इशारा दिला होता. पण त्यांनी पुन्हा तसंच केलं तर त्यांच्यावर दंडही लावण्यात आला होता. ते पाच दिवस हॉटेलमध्ये राहिले आणि आनंदाने त्यांनी पलंगावरील गादी जमिनीवर अंथरून रोज दंडही भरला."

नग्नतेचे उपासक

राज कपूर नेहमी त्यांच्या चित्रपटांमध्ये ते सर्वकाही दाखवत होते, ज्याचा त्यांनी कधीतरी स्वतः अनुभव घेतला होता. ते स्वतःच म्हणायचे की, ते नग्नतेचे उपासक आहेत. त्यासाठी ते एक उर्दू शब्द वापरायचे 'मुक़द्दस उरियाँ' म्हणजे पवित्र नग्नता. याचं कारण सांगताना ते म्हणायचे की मी लहानपणी आईबरोबरही अंघोळ करत होतो.

त्यांची मुलगी ऋतु नंदा त्यांच्या बालपणीचा एक किस्सा सांगताना म्हणाल्या, "पपा जेव्हा दीड किंवा दोन वर्षांचे असतील तेव्हा गावात काही महिला फुटाणे विकायच्या. एकदा राज फुटाणे घ्यायला गेले तेव्हा त्यांनी एक शर्ट घातलेला होता आणि खाली काहीही परिधान केलं नव्हतं. त्या मुलाला पाहून फुटाणे विकणारी म्हणाली की, तू शर्ट वर करून त्याची झोळी तयार केली तर मी तुला फुटाणे देईल. राज यांनी तसं केलं तर ती मुलगी प्रचंड हसली होती."

त्या सांगतात, "राज कपूर यांना ही घटना कायम लक्षात राहिली आणि फुटाणे हे त्यांच्या जीवनात जणू 'सेक्स ऑबजेक्ट' बनले होते. अनेक वर्षांनी जेव्हा त्यांनी 'बॉबी' चित्रपट बनवला तेव्हा त्यांनी ऋषी कपूर आणि डिंपल यांच्यावर एक सीन शूट केला. त्यात डिंपल एका लायब्ररीमध्ये बसलेली असते. ऋषी तिचं लक्ष आकर्षित करण्यासाठी आरसा चमकावतो. डिंपल जेव्हा बाहेर येते तेव्हा ती म्हणते, चल चहा प्यायला जाऊ. त्यावर ऋषी तिला म्हणतात चहा नको चल चणे (फुटाणे) खायला जाऊ. राज कपूर यांनी गावातील ती घटना त्यांच्या पद्धतीने सिनेमात उतरवली होती."

नर्गिस बरोबरची पहिली भेटही पडद्यावर दाखवली

त्याचप्रमाणे 'बॉबी' चित्रपटात आणखी एक सीन आहे, ज्यात ऋषी कपूर पहिल्यांदा डिंपलला भेटायला त्यांच्या घरी जातो.

ऋतु नंदा सांगतात की, "त्या काळात नर्गिस मोठ्या स्टार बनल्या होत्या. तर राज कपूर हे किदार शर्मा यांचे केवळ असिस्टंट होते. त्यांना त्यांचा 'आग' हा चित्रपट महालक्ष्मी स्टुडिओमध्ये शूट करायचा होता. नर्गिस यांच्या आई जद्दनबाई तिथं 'रोमियो-ज्युलियट' शूट करत होत्या. स्टुडिओमध्ये कशी व्यवस्था आहे हे जाणण्यासाठी राज कपूर त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते."

राज कपूर, सिनेमा, मनोरंजन

फोटो स्रोत, RITU NANDA

फोटो कॅप्शन, ऋषी कपूर आणि डिंपल

त्या सांगतात, "जेव्हा राज कपूर यांनी बेल वाजवली तेव्हा, नर्गिस भजे तळत होत्या. जेव्हा त्यांनी दार उघडलं तेव्हा चुकून बेसनानं भरलेला त्यांचा हात केसांना लागला होता. राज कपूर यांनी नर्गिसचा तो चेहरा आयुष्यभर लक्षात ठेवला. त्यांनी जेव्हा 'बॉबी' चित्रपट तयार केला तेव्हा अगदी हुबेहूब तो सीन त्यांनी शूट केला."

पण नर्गिस यांचा या भेटीबाबतचा दृष्टीकोन नेमका कसा होता, हे फार कमी लोकांना माहिती आहे.

टीजेएस जॉर्ज त्यांच्या 'द लाइफ अँड टाइम्स ऑफ नर्गिस' मध्ये लिहितात की, "सर्वांत जवळची मैत्रीण नीलमला ही घटना सांगताना नर्गिस म्हणाल्या होत्या की, एक जाड, निळे डोळे असलेला मुलगा आमच्या घरी आला होता. त्यांनी नीलमला हेही सांगितलं की, 'आग'च्या शुटिंगदरम्यान त्या मुलाने माझ्यावर लाईन मारायला सुरुवात केली होती."

जेव्हा सोबत काम करायला तयार झाल्या नर्गिस

नर्गिस राज कपूर यांच्या 'आग' या पहिल्या चित्रपटात काम करायला तयार झाल्या तेव्हा त्यांच्या आईने त्यांचं नाव पोस्टरमध्ये कामिनी कौशल आणि निगार सुल्ताना यांच्यावर ठेवण्यास सांगितलं.

राज कपूर, सिनेमा, मनोरंजन

फोटो स्रोत, RITU NANDA

फोटो कॅप्शन, राज कपूर आणि नर्गिस

पृथ्वीराज कपूर यांच्या विनंतीवर जद्दनबाई मुलीसाठी केवळ दहा हजार रुपये मानधन घ्यायला तयार झाल्या. मात्र नंतर नर्गिस यांचा भाऊ अख्तर हुसेन यांनी त्यांना 40 हजार रुपये मिळावे अशी मागणी केली, आणि ती पूर्णही करण्यात आली.

'आग'ची शूटिंग खंडाळ्यामध्ये झालं होतं आणि नर्गिस यांच्या शंकेखोर आई जद्दनबाईदेखिल त्यांच्याबरोबर गेल्या होत्या. राज कपूर यांनी त्यांच्या 'बरसात' चित्रपटाचं शुटिंग कश्मिरमध्ये करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांनी स्पष्ट नकार दिला होता.

नंतर महाबळेश्वरलाच काश्मिर बनवून चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं. इकडे कपूर कुटुंबामध्येही या रोमान्सवरून तणाव वाढला होता. पृथ्वीराज कपूर यांनी मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण राज कपूर यांच्यावर त्याचा परिणाम झाला नाही. 'आवारा' चं शुटिंग सुरू झालं तेव्हा नर्गिस यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर त्यांना अडवणारं कोणीही नव्हतं.

राज कपूर, सिनेमा, मनोरंजन
फोटो कॅप्शन, राज कपूर आणि नरगिस दत्त

'बरसात' चित्रपट पूर्ण होईपर्यंत नर्गिस या राज कपूर यांच्यासाठी पूर्णपणे कमिट झाल्या होत्या.

मधू जैन लिहितात की, "नर्गिसने त्याचं मन, आत्मा अगदी त्यांचा पैसाही राज कपूर यांच्या चित्रपटांमध्ये लावायला सुरुवात केली होती. आर. के. स्टुडिओला आर्थिक अडचणी निर्माण झाल्या तेव्हा नर्गिस यांनी सोन्याचं कडं विकून पैसे दिले होते. आरके फिल्म्सची आर्थिक स्थितीमजबूत करण्यासाठी त्यांनी इतर निर्मात्यांचे 'अदालत', 'घर' 'संसार' आणि 'लाजवंती' असे चित्रपटही केले.

नंतर राज कपूर यांनी त्यांच्याबाबत एक प्रसिद्ध पण असंवेदनशील वक्तव्य केलं होतं, "माझी पत्नी माझ्या मुलांची आई आहे, पण माझ्या चित्रपटांची आई तर नर्गिसच आहे" असं ते म्हणाले होते.

नर्गिस यांना आलेलं प्रेम पत्र वाचलं

नर्गिस आणि राज कपूर यांचा आणखी एक किस्सा आहे. निर्माता दिग्दर्शक शाहीद लतीफ यांनी नर्गिस यांना लग्नासाठी प्रस्ताव पाठवला होता.

याबाबत मधू जैन लिहितात की एकदा राज कपूर यांनी स्वतः सांगितलं होतं, "आम्ही दोघं एका पार्टीत जात होतो. आम्हाला उशीर होत होता. जेव्हा मी नर्गिसकडे गेलो तर तिच्या हातात एक कागद होता. मी तिला विचारलं हे काय आहे? तर काही नाही... असं म्हणत तिनं तो कागद फाडून टाकला. आम्ही दोघं कारजवळ गेलो तर मी म्हटलं की, माझा रुमाल विसरला आहे. मी परत खोलीत गेलो. मोलकरीणीने झाडू मारत ते कागदाचे तुकडे कचऱ्यात टाकले होते."

राज कपूर, सिनेमा, मनोरंजन

फोटो स्रोत, RITU NANDA

फोटो कॅप्शन, राज कपूर आणि नर्गिस

त्या पुढे लिहिलात राज कपूर म्हणाले की, "दुसऱ्या दिवशी प्रचंड प्रयत्न करून मी त्या कागदाचा एक एक तुकडा जोडला आणि तेव्हा मला समजलं की, एका निर्मात्याने पत्र लिहून नर्गिसला लग्नाचा प्रस्ताव पाठवला आहे. मी त्या पत्राला फ्रेम केली आणि हा सीन जसाच्या तसा संगम चित्रपटात वापरला."

नर्गिस आणि राजकपूर यांचं ब्रेक-अप झालं तर राज कपूर यांच्यावर प्रचंड परिणाम झाला होता.

त्यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांनी बनी रूबेन यांना सांगितलं होतं की, 'अनेक रात्री राज कपूर हे रात्री खूप उशिरा घरी यायचे. ते प्रचंड दारु प्यायलेले असायचे. टबमध्ये पडून ते खूप रडायचे. मला माहिती होतं की, ते नर्गिससाठी रडत आहेत.'

दारुची जातीव्यवस्था

दारु आणि राज कपूर यांचंही एक वेगळं नातं होतं. रणधीर कपूर सांगतात की, ते नेहमी 'जॉनी वॉकर' ब्लॅक लेबल व्हिस्की प्यायचे. तीही लंडनवरून खरेदी केलेली असायची.

मधू कपूर त्यांच्या पुस्तकात ऋषी कपूर यांनी सांगितलेला किंस्सा लिहिताना म्हणतात की, "राज कपूर त्यांच्या ब्लॅक लेबल व्हिस्कीवर खूप अधिकार गाजवायचे. ते पार्ट्यांमध्ये गेले तरी स्वतःची दारु स्वतः घेऊन जायचे. जणू दारुबाबतही ते जातीव्यवस्था वापरत होते. लंडनहून खरेदी केलेली ब्लॅक लेबल ते स्वतः प्यायचे किंवा त्यांच्या अगदी खास जवळच्यांनाच पाजायचे."

त्या पुढं लिहितात की, "तनुजा त्यांच्यापैकी एक होत्या. दुबईहून खरेदी केलेली ब्लॅक लेबल ते त्यांच्या इतर मित्रांसाठी ठेवायचे आणि शेवटी दिल्ली आणि मुंबईतून खरेदी केलेली ब्लॅक लेबल त्यांच्या मुलांना मिळायची. रणधीर यांना अत्यंत वाईट वाटायचं की, तनुजाला लंडनमधली व्हिस्की मिळतेय पण त्यांना मात्र भारतात खरेदी केलेली."

पाहुणचारात अग्रेसर

राज कपूर यांचा पाहुणचार अत्यंत खास असायचा. ते जेव्हा मेजवानी द्यायचे तेव्हा त्यांचं टेबल विविध पदार्थांनी भरलेलं असायचा. पण राज कपूर स्वतः फार कमी खायचे. त्यांचे आवडते पदार्थ पाव, अंडी आणि थोडी डाळ असे होते.

राज कपूर, सिनेमा, मनोरंजन
फोटो कॅप्शन, राज कपूर यांची कन्या ऋतु नंदा यांच्याबरोबर रेहान फझल

अनेक वर्षं ते दिवसा जेवण करत नव्हते. रात्रीही जेव्हा ते फार उशिरा घरी यायचे तेव्हा फक्त तळलेली अंडी खाऊन झोपी जायचे. ते नेहमी अॅम्बेसेडर कार वापराचे. त्यांच्याकडे मर्सिडीजही होती. पण त्यात फक्त त्यांच्या पत्नी कृष्णा बसायच्या.

राष्ट्रीय पुरस्कार घेताना दम्याचा अटॅक

1988 मध्ये त्यांना 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यावेळी ते सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये पुरस्कार घेण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांना दम्याचा गंभीर अॅटॅक आला होता. त्यावेळी पत्रकार प्रदीप सरदाना तिथं उपस्थित होते.

राज कपूर, सिनेमा, मनोरंजन

फोटो स्रोत, RITU NANDA

फोटो कॅप्शन, राज कपूर

सरदाना सांगतात की, "राज कपूर यांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा ते उभं राहण्याच्या स्थितही नव्हते. त्यावेळी राष्ट्रपती वेंकटरमण सर्व प्रोटोकॉल मोडत मंचावरून खाली उतरले होते आणि त्यांनी राज कपूर यांचा गौरव केला होता. त्यानंतर काही लोक त्यांना बाहेर घेऊन गेले. मीही पळत बाहेर गेलो. "

ते सांगतात की, "राष्ट्रपतींच्या अॅम्ब्युलन्समध्येच त्यांना एम्समध्ये नेण्यात आलं. स्ट्रेचरवर झोपण्यास राज कपूर यांनी नकार दिला. त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये बसवण्यात आलं. ड्रायव्हर वेगाने चालवत होता. त्यानं एकदा ब्रेक लावला तर राज कपूर माझ्या खांद्यावर पडले. त्यावर ते ओरडून ड्रायव्हरला म्हणाले, भाई धीरे चलाओ. मारोगे क्या");