Lagaan: आमिर खानने 'लगान' सिनेमाला वाईट चित्रपट का म्हटलं होतं?

फोटो स्रोत, LUCY NICHOLSON/GETTYIMAGES
- Author, मधू पाल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
2001 साली आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला 'लगान' चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक समजला जातो. आमिर खानने साकारलेलं 'भुवन' हे पात्र अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन 20 वर्षं होऊन गेलेत.
पण फार कमी लोकांना माहिती असेल की, आशुतोष गोवारीकर यांनी हा चित्रपट लिहिला नसता तर आमिर खान कधीच चित्रपट निर्माते झाले नसते.
आशुतोष यांनी आमिर खान यांना पहिल्यांदा या चित्रपटाची कथा ऐकवली होती, तेव्हा त्यांना ती अजिबात आवडली नव्हती.
आशुतोषने यावर पुढे काम करू नये, असंच आमिरचं म्हणणं होतं. पण जेव्हा चित्रपट रिलीज झाला, तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर तर हिट ठरलाच. पण त्याला ऑस्कर नॉमिनेशनही मिळालं. पण या चित्रपटाला ऑस्कर मिळाला नाही.
'या स्क्रिप्टसाठी तू तीन महिने वाया घालवलेस'
'लगान' चित्रपट रिलीज होऊन 20 वर्षं झाल्याच्या निमित्ताने बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खाननी त्यावेळेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
त्यांनी म्हटलं की, "जेव्हा लगानची कथा आशुतोषने पहिल्यांदा ऐकवली तेव्हा मोजून दोन मिनिटात सांगितलं की - एक गाव आहे, तिथे पाऊस पडत नाही. त्यामुळे तिथले लोक शेतसारा भरू शकत नाहीत. त्यामुळे आपला शेतसारा माफ करण्यासाठी ते लोक पैज लावतात आणि क्रिकेट खेळतात. मला ही आयडिया भंगार वाटली. मी आशुतोषला म्हटलं काहीही काय सांगतोस? लोक 1893 मध्ये क्रिकेट काय खेळतात आणि शेतसारा काय माफ करवून घेतात. मी म्हटलं मला हे पचनी पडलेलं नाही."

फोटो स्रोत, ARKO DATTA/GETTYIMAGES
पुढे आमिर म्हणतात, "मी आशुतोषला समजावलं आणि म्हटलं की तुझे याआधीचे दोन चित्रपट चाललेले नाहीत. तू आधी धड काम काम कर. माझं बोलण ऐकून तो थोडा निराश झाला आणि म्हणाला ठीक आहे. त्यानंतर तीन महिने तो गायब झाला."
आमिर म्हणतात, "तीन महिन्यांनी त्याने मला फोन केला आणि मला म्हणाला की मी एक स्क्रिप्ट ऐकवू इच्छितो. मला संशय होता की तो हीच क्रिकेटची कथा सांगेल. मी म्हटलं ऐकव तर म्हणाला भेटून ऐकवेन. मी म्हटलं मला नाही ऐकायची. मी तुला सांगितलं होतं की भंगार कथा आहे तरीही त्यामागे तू 3 महिने घालवलेस."
'गुरुदत्त, के आसिफ, व्ही शांतारामच्या आठवणीने दूर झाली भीती'
आशुतोष आमिर यांचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या हट्टापायी मी स्क्रिप्ट ऐकली असं आमिर म्हणतात.
"यावेळी त्याने पूर्ण तपशीलांसह स्क्रीप्ट ऐकवली आणि मी दंग झालो. मी ती कथा ऐकताना रडत होतो, हसत होतो. मी त्याला म्हटलं हा खूप महागडा चित्रपट ठरेल, पण याला बनवणार कोण? मी तर अभिनेता आहे निर्माता नाही. तुझा बाजी चित्रपटही चालला नाही. मग या चित्रपटासाठी कोण पैसे लावेल? तू आधी असा निर्माता शोध जो यावर पैसे लावेल मगच मी या चित्रपटात काम करेन. पण निर्मात्याला सांगू नको की मी या चित्रपटात आहे. माझी इच्छा आहे की निर्मात्याने या चित्रपटाची कथा ऐकून हो म्हणावं, फक्त मी या चित्रपटात आहे म्हणून नाही."
आमिर म्हणतात की त्यांनी आशुतोष गोवारीकरांना स्पष्ट सांगितलं होतं की माझी वाट पाहू नका. दुसरा कोणी तयार असेल तर त्याला घेऊन चित्रपट बनव.

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/GETTYIMAGES
ते म्हणतात, "यानंतर आशुतोषने सगळ्या इंडस्ट्रीमधल्या निर्माते-अभिनेत्यांना ही कथा ऐकवली. पण कोणालाही समजली नाही. मला कथा तर आवडली होती त्यामुळे मी अधूनमधून याबद्दलचे अपडेट घ्यायचो.
दर सहा महिन्यांनी ही कथा ऐकायचो. मी तीनदा या चित्रपटाची पूर्ण कथा ऐकली, प्रत्येक वेळेस कथेचं कौतुक केलं पण या चित्रपट बनवण्याची हिंमत झाली नाही. मग एक दिवस मी विचार केला की मी का हा चित्रपट बनवायला घाबरतोय? माझ्या जागी जर गुरुदत्त, व्ही शांताराम, के आसिफ किंवा विमल रॉय असते तर ते हा चित्रपट बनवायला कचरले असते का");