पानिपत युद्धात मराठ्यांना हरवणारा अब्दाली का आहे अफगाणिस्तानात हिरो?

फोटो स्रोत, TWITTER/DUTTSANJAY
- Author, दाऊद आजमी
- Role, बीबीसी पश्तो सेवा
पानिपतचं तिसरं युद्ध मराठा आणि अफगाण सैन्य यांच्यात झाल्याचं आपण इतिहासात शिकलो आहोत. 14 जानेवारी 1761 ला झालेल्या या युद्धात अफगाण सैन्याची कमान सांभाळली ती अहमद शाह अब्दाली-दुर्रानी यानं. हिंदुस्तानच्या अनेक पिढ्या या युद्धाच्या केवळ आठवणीने रोमांचित झाल्या आहेत. इतिहासाच्या अभ्यासकांनाही या युद्धानं वेड लावलं आहे.
'पानिपत' सिनेमात भारतीय उपखंड आणि मध्य आशियाचं एक अत्यंत महत्त्वाचं आणि निर्णायक वळण दाखवण्यात आलं आहे. पण या सिनेमाबद्दल अफगाणिस्तानातील नागरिक नाराज आहेत.
त्यांचा नायक असलेल्या अहमद शाह अब्दाली-दुर्रानी याची (1722-1772) नकारात्मक आणि खलनायकाची प्रतिमा या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याची त्यांची भावना आहे. भारतीयांसाठी खलनायक असलेल्या अहमद शाह अब्दालीला अफगाणिस्तानात मात्र 'बाबा-ए-कौम' किंवा 'राष्ट्रपिता' अशी उपाधी मिळालेली आहे.
अहमद शाह अब्दाली-दुर्रानी हा अफगाणिस्तानी लोकांसाठी हिरो का आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला.
सर्वात महान अफगाण
ही 1747 मधली घटना आहे. सेनापती आणि कबिल्याचा सरदार असलेल्या अहमद शाह अब्दाली याची सर्वसहमतीनं अफगाणिस्तानचा शाह म्हणजेच राजा म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी त्याचं वय होतं केवळ 25 वर्षे
अफगाणिस्तानच्या पारंपरिक कबिल्यांची पंचायत असलेल्या जिरगाने त्याची शाह पदी नेमणूक केली होती. ही बैठक पश्तून म्हणजेच पठाणांचा गढ असलेल्या कंदाहारमध्ये झाली होती.
कंदाहार आता दक्षिण अफगाणिस्तानात येतं. अहमद शाह अब्दाली त्याची विनयशीलता आणि करिश्मा यासाठी प्रसिद्ध होता.

फोटो स्रोत, Getty Images
राज्याभिषेकावेळी साबिर शाह नावाच्या एका सुफी संताने अहमद शाह अब्दालीचे अंगभूत गुण आणि योग्यता ओळखून त्याला 'दुर-ए-दुर्रान' हा किताब बहाल केला होता. 'दुर-ए-दुर्रान' याचा अर्थ मोत्यांमधला सर्वोत्कृष्ट मोती. तेव्हापासून अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या कबिल्याला दुर्रानी या नावाने ओळखले जाऊ लागलं.
अब्दाली हा पठाण आणि अफगाणिस्तानच्या लोकांचा अत्यंत महत्वाचा कबिला आहे. अहमद शाह याच सन्मानित घराण्यातून होता. त्याने त्याच्या शासनकाळात अपेक्षेहून उत्कृष्ट यश संपादित केलं. तो इतका यशस्वी ठरेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती.
त्याने सर्व अफगाणी कबिल्यांमध्ये आपापसात असलेलं वैर दूर करून सर्वांची एकजूट केली आणि अफगाण राष्ट्राची पायाभरणी केली. तो सर्व युद्धे जिंकला. इतिहासकार याला दुर्रानी साम्राज्य म्हणतात.
अहमद शाह अब्दालीचं विशाल साम्राज्य पश्चिमेकडे इराणपासून ते पूर्वेकडे भारताच्या सीमेपर्यंत, उत्तरेकडे मध्य आशियाच्या अमू दरिया नदीच्या किनाऱ्यापासून दक्षिणेकडे हिंद महासागरापर्यंत पसरलं होतं. ढोबळमानाने हे साम्राज्य 20 लाख चौरस किमी इतकं विशाल होतं.
अहमद शाह अब्दाली-दुर्रानीने आपल्या लोकांना एक नवी ओळख आणि स्वतंत्र राष्ट्र दिलं. अब्दालीनेच स्थापन केलेल्या राष्ट्राला आज आपण अफगाणिस्तान या नावाने ओळखतो. त्या जुन्या अफगाणिस्तानची झळाळी कायम राहिली नसली तरी सीमा अजूनही जवळपास तशाच आहेत.
पश्तो भाषेतील प्रसिद्ध कवी अब्दुल बारी जहानी म्हणतात, "अहमद शाह बाबा सर्वात महान अफगाणी होते."
अब्दुल बारी जहानी अफगाणिस्तान सरकारमध्ये संस्कृती आणि माहिती मंत्री होते. त्यांनीच अफगाणिस्तानचं आजचं राष्ट्रगीतही लिहिलं आहे. "अफगाणिस्तानच्या 5 हजार वर्षांच्या इतिहासात आम्हाला अहमद शाह बाबासारखा शूर, प्रसिद्ध आणि लोकप्रिय शासक मिळाला नाही", असं बारी यांनी लिहून ठेवलं आहे.
परिणामकारक आणि निर्णायक घटना
अहमद शाह अब्दाली याने राजा झाल्यानंतर आणि त्याआधीही अनेक महत्त्वाची युद्धं लढली होती. मात्र, जानेवारी 1761 मध्ये दिल्लीजवळ पानिपतच्या मैदानात लढण्यात आलेलं युद्ध एक सेनापती आणि बादशाह म्हणून अहमद शाह अब्दालीच्या आयुष्यातील सर्वात मोठं युद्ध होतं.
हा तो काळ होता जेव्हा एकीकडे अब्दाली आणि दुसरीकडे मराठा दोघेही साम्राज्य विस्ताराच्या महत्त्वाकांक्षेने पछाडले होते.
एकापाठोपाठ एक युद्ध जिंकल्याने मराठा साम्राज्याची महत्त्वाकांक्षा वाढली होती. मराठ्यांनी आपल्या साम्राज्याचा वेगाने विस्तार केला होता. त्यामुळे अहमद शाह अब्दालीला त्याच्या साम्राज्याला मराठ्यांपासून धोका असल्याचं वाटू लागलं होतं.

फोटो स्रोत, DEA / BIBLIOTECA AMBROSIANA
उत्तर भारतातील त्याकाळातील जे प्रांत अब्दालीच्या साम्राज्याचा भाग होते ते अब्दालीच्या नवीन अफगाण साम्राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळेच पानिपतचं तिसरं युद्ध अब्दालीसाठी आत्मसुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचं होतं, असं सामान्य अफगाणी नागरिकांचं मत आहे.
अब्दालीसाठी या युद्धाचा उद्देश आपल्या साम्राज्याला असलेला मोठा धोका दूर करणं हा होता. जेणेकरून तो त्याच्या साम्राज्यासह त्याच्या क्षेत्रीय सहकाऱ्यांचंही रक्षण करू शकेल.
या युद्धात अफगाण सैन्याचा विजय झाला असला तरी दोन्ही सैन्याचे हजारो सैनिक ठार झाले.
अफगाणिस्तानातील एका प्रांतात आजही या युद्धाला 'मराटाई वहाल' (मराठ्यांना परास्त करणं) म्हणून ओळखलं जातं. कंधार भागात पश्तो भाषेत ही आजही एक म्हण म्हणून प्रचलित आहे. एखाद्याच्या ताकदीला आव्हान देण्यासाठी किंवा व्यंगात्मक टीकेसाठी ही म्हण वापरतात.
पठाणांमध्ये आजही दैनंदिन बोलीभाषेत 'तू तर असं बोलत आहेस जणू तू मराठ्यांना पराभूत केलं', असं सर्रास म्हटलं जातं. किंवा मग 'तू कोणत्या मराठ्याला हरवलं आहेस");