जोधपूर: भारतातलं लुप्त होत चाललेलं 'निळं' शहर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अर्शिया
- Role, बीबीसीसाठी
ब्ल्यू सिटी नावाने प्रसिद्ध असलेलं राजस्थानमधील जोधपूर शहर पर्यटकांना कायम आपल्याकडे आकर्षित करतं.
तरीही जोधपूरमधील निळ्या रंगाच्या इमारतीचं तेज लोप पावत आहे असं लेखिका अर्शिया यांचं मत आहे.
जोधपूरमधील ब्रह्मपुरीचा हा भाग प्रसिद्ध मेहरानगड किल्ल्याच्या जवळ वसला आहे. 1459 मध्ये राजपूत राजा राव जोधा यांनी मेहरानगड नावाच्या एका मोठ्या किल्ल्याजवळ मजबूत तटबंदी असलेलं हे शहर वसवलं.
राजाच्या नावावर या शहराला जोधपूर असं नाव दिलं गेलं. त्यानंतर निळ्या रंगाच्या घरांच्या या परिसरातल्या भागाला जोधपूरच्या जुन्या किंवा मूळ शहराच्या रूपात मान्यता दिली गेली.

फोटो स्रोत, AFP
'जिंदाल स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर'च्या सहायक प्राध्यापक ॲस्टर क्रिस्टिन श्मिट यांच्या मते हा लोकप्रिय निळा रंग बहुतेक 17 व्या शतकाच्या आधी स्वीकारला गेला नव्हता.
मात्र तेव्हापासून निळा रंग हीच जोधपूरची ओळख झाली आहे.
मेहरानगड संग्रहालयाची देखभाल करणाऱ्या सुनैना राठौर म्हणाल्या, “राजस्थानमधील जोधपूरला ब्ल्यू सिटी या नावाने ओळखलं जातं. कारण गेल्या 70 वर्षांच्या विस्तारानंतरही ब्रह्मपुरी हा भाग अजूनही त्याचं मुख्य केंद्र आहे."
त्याची तुलना होते शेफचोएनशी
ब्रह्मपुरीचा संस्कृतमध्ये अर्थ ब्राह्मणांचं शहर असा होतो. या शहराची निर्मिती कथित उच्च जातीच्या लोकांनी केली होती. इथे राहणाऱ्या लोकांनी हिंदू जाती व्यवस्थेत आपली विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक आणि धर्मनिष्ठेचं प्रतीक म्हणून निळा रंग स्वीकारला होता.
ते त्यांची ओळख वेगळ्या पद्धतीने सांगतात. जसे मोरोक्को येथील शेफचोएनमधील ज्यू आपली ओळख सांगतात तशी ओळख हे लोक सांगतात. ज्यू लोक 15 व्या शतकात स्पेनमधील कायदेशीर कारवाईपासून पळत मदिना नामक शहराच्या जुन्या भागात वसले होते.
त्यांनी आपल्या घराला, प्रार्थना स्थळांना आणि इतकंच काय तर आपल्या सार्वजनिक कार्यालयांनाही निळा रंग दिला होता असं मानतात. ज्यू धर्मात निळा रंग पवित्र मानला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
हा रंग अनेक अर्थाने फायदेशीर ठरला. चुना, दगड, प्लॅस्टर यांच्याबरोबर एकत्र केलेल्या निळ्या रंगामुळे घर थंड राहण्यास मदत मिळते. ब्रह्मपुरीमध्ये अशाच मिश्रणाचा वापर झालेला आहे. हा रंग फक्त घर थंड करत नाही तर पर्यटकांनाही आपल्याकडे आकर्षित करतो.
मात्र शेफचोएनच्या अगदी उलट जोधपूरमध्ये निळा रंग आता फिका पडला आहे. त्याची अनेक कारणं आहेत.
ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं गेलं तर अतिशय सहज उपलब्ध असल्यामुळे ब्रह्मपुरीच्या लोकांसाठी पेंटऐवजी हा चांगला पर्याय होता.
पूर्व राजस्थानमधील बयाना शहर त्यावेळी देशात नीळ उत्पादक केंद्रांपैकी एक होतं. त्यावेळी निळीची शेती कमी केली जायची कारण या पिकामुळे मातीचं खूप नुकसान होतं.


तापमान: एक मोठी समस्या
वाढत्या तापमानामुळे सुद्धा त्याचं तेज हरवलं आहे. आता घरं थंड करण्यासाठी निळा रंग पुरेसा नाही. तसंच लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे सुद्धा लोकांचा कल आधुनिक सोयी सुविधांकडे गेला आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आता लोक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी वातानुकूलित यंत्राचा वापर करतात.
आयआयटी गांधीनगरमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे सहाय्यक प्राध्यापक असलेले उदय भाटिया म्हणतात, "गेल्या काही वर्षांपासून तापमानात हळूहळू वाढ होत आहे."

फोटो स्रोत, तरुण शर्मा
प्रा. भाटिया तापमान बदलांचा सामना करण्यासाठी तयार होणाऱ्या इमारती आणि पायाभूत सुविधांवर काम करतात.
आयआयटी गांधीनगरतर्फे केलेल्या विश्लेषणानुसार जोधपूरचं सरासरी तापमान 1950 च्या दशकात 37.5 होतं. तेच 2016 मध्ये 38.5 झालं.
निळ्या रंगाच्या पेंटमुळे घरं थंड राहतात आणि त्याचबरोबर कीटकांपासूनही बचाव होतो. कारण त्यात नैसर्गिक निळा रंग चकाकत्या निळ्या कॉपर सल्फेट बरोबर मिसळतात.
शहरीकरणामुळे पारंपरिक गोष्टी पडल्या मागे
प्रा. भाटिया यांच्या मते, शहरीकरण वाईट नाही. मात्र शहरीकरणामुळे पारंपरिक पद्धती मागे पडत आहे. या पद्धती त्यावेळेस वातावरण आणि तापमान बदल यांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या होत्या.
ते सांगतात, "जोधपूरच्या एखाद्या गल्लीत दोन्ही बाजूला निळ्या रंगाची घरं असतील आणि आज कोणी तिथे गेलं तर त्या व्यक्तीला आता गडद रंगाची घरं दिसतील. त्यामुळे तिथे स्पष्ट फरक जाणवतो. निळ्या रंगाच्या घरापेक्षा गडद रंगाच्या घरामध्ये जास्त उष्णता जाणवते."

फोटो स्रोत, तरुण शर्मा
याला हिट आयलँड इफेक्ट असंही म्हटलं जातं. जर तुमच्या आसपास काँक्रीट, सिमेंट आणि काचेचा वापर केला असेल आणि तुमच्या घराला गडद रंग असेल तर उकाडा आणखी वाढतो आणि परिस्थिती आणखी बिकट होते.
शहरात आता घरं बांधण्याच्या जुन्या पद्धती कालबाह्य होत आहेत. ज्या ठिकाणी जास्त तापमान आहे तिथे घरं बांधण्यासाठी चुना आणि दगडांचा वापर केला जायचा. त्याची जागा आता सिमेंट आणि काँक्रीटने घेतली आहे कारण तिथे निळा रंग योग्य पद्धतीने शोषला जात नाही.
निळीच्या अभावाने वाढला खर्च
ब्रह्मपुरीमध्ये राहणारे 29 वर्षीय सिव्हिल इंजिनियर आदित्य दवे म्हणतात की, त्यांच्या पिढीजात घराला बहुतांशी निळाच रंग आहे.
कधी कधी बाहेरच्या भिंतींना ते वेगळा रंगही देतात कारण गेल्या काही काळात निळीचा अभाव जाणवत आहे, त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे.
दहा वर्षांपूर्वी घरांना निळा रंग देण्यासाठी पाच हजार रुपये खर्च यायचा. आता त्याचा खर्च 30,000 पेक्षा जास्त होतो.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "आजकाल घरांसमोर उघड्या नाल्या आहेत. त्यामुळे निळा रंग खराब होतो आणि भिंतींचं नुकसान होतं."
म्हणूनच पाच वर्षांपूर्वी ब्रह्मपुरीमध्ये त्यांनी जेव्हा स्वतःचं घर बांधलं तेव्हा तिथे फरशीचा वापर केला जेणेकरून वारंवार रंगरंगोटी करण्याची गरज भासणार नाही.
ते म्हणतात, "ही पद्धत जास्त फायदेशीर आहे."
पारंपरिक ओळख धोक्यात
मात्र यामुळे जोधपूर शहराची ओळख धोक्यात आली आहे. या भागातील कपडे व्यापारी दीपक सोनी म्हणतात की, निळ्या रंगाची घरं कमी झाल्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना त्यांची फसवणूक झाल्यासारखं वाटेल. स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर मिळून ब्रह्मपुरीची निळ्या रंगाची ओळख कायम ठेवण्यासाठी दीपक काम करत आहेत.
ते विचारतात, "जर एखादी व्यक्ती आपल्या शहराची ओळख म्हणून निळ्या रंगाची घरं बघायला आली आणि त्याला ती दिसलीच नाही तर? या परिस्थितीची आपल्याला लाज वाटली पाहिजे. बहुतांश परदेशी पर्यटक जोधपूरची तुलना शेफचोएनशी करतात. ते अनेक शतकांपासून आपल्या निळ्या रंगाच्या घराची ओळख कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहे तर आपण असं का करू शकत नाही");