दलित युवकाचा बेदम मारहाणीत मृत्यू; कोंबडा बनण्याची शिक्षा, कित्येक तास काठीने बडवल्याचा आरोप

फोटो स्रोत, Mohar Singh Meena/ BBC
- Author, मोहर सिंह मीणा
- Role, बीसीसी हिंदीसाठी, झुंझुनूमधील बलौदा गावाचा दौरा केल्यानंतर
राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात दलित युवकाला 'आमच्या दुकानातून दारू का विकत घेत नाही' असे म्हणत बेदम मारहाण करण्यात आली. या युवकाला अत्यंत कठोर शिक्षा देण्यात आल्या. कोंबडा बनवण्यात आले, बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना काय आहे, युवकाला कधी, कशी मारहाण करण्यात आली याचा हा ग्राउंड रिपोर्ट.
"मी एकटीच राहिले. तो माझा लाडका, माझ्या गळ्यातील ताईत, माझं सारंकाही होता. मी त्याला लहानाचा मोठा केला होता. माझी इच्छा आहे की एकतर मला तरी फाशी द्या किंवा त्यांना तरी फाशी द्या."
एका झाडाखाली खाटीच्या शेजारी जमिनीवर हात जोडून बसलेल्या रडत हुंदके देणाऱ्या 65 वर्षांच्या या वयोवृद्ध महिलेचं नाव राधा देवी आहे.
26 वर्षांपूर्वी राधा देवीचे पती हडमान वाल्मिकी यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा सर्वांत लहान मुलगा रामेश्वर फक्त सहा दिवसांचा होता. त्यांनी एकटीनं आयुष्याचा संघर्ष करत रामेश्वरचं संगोपन केलं आणि आता तोच त्यांच्या म्हातारपणाचा आधार होता.
14 मे च्या दिवशी रामेश्वरची त्याच्या घरापासून जवळच कथितरित्या हत्या करण्यात आली. त्याला कथितपणे जवळपास सहा तास लाठ्यांनी निर्दयीपणे मारहाण केल्यानं त्याचा मृत्यू झाला.
या उतार वयात थकलेलं शरीर, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि मागील दहा दिवसांपासून तापानं फणफणलेल्या राधा देवी आपल्या मुलाच्या खून्यांना फाशी देण्याची मागणी करत आहेत.
बलौदा गावातील घटना
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरापासून जवळपास अडीचशे किलोमीटर दूर असलेल्या झुंझुनू जिल्ह्यात हरियाणाच्या सीमेच्या अगदी जवळ बलौदा गाव आहे.
गावात पक्क्या रस्त्याहून निघून सरकारी शाळेच्या शेजारून जाणाऱ्या वाळूच्या वाटेवरून एक किलोमीटर पुढे गेल्यावर गल्लीच्या कोपऱ्यावर असलेलं एक घर.
याच घराच्या चार भिंतीच्या आत एका झाडाखाली राधा देवी बसलेल्या आहेत.

फोटो स्रोत, Mohar Singh Meena/ BBC
घराच्या अगदी मागे काही अंतरावर एक गोशाला आहे. 26 वर्षांच्या रामेश्वर तिथे साडे नऊ हजार रुपयांवर नोकरी करायचा. घराच्या दुसऱ्या बाजूला काही अंतरावर सूरजमल यांची रिकामी पडलेली एक हवेली आहे.
याच हवेलीमध्ये रामेश्वरला जवळपास सहा तास काठ्यांनी अत्यंत निर्दयपणे मारहाण करत हत्या करण्यात आली होती.
आरोपींची इतकी दहशत होती की गावातील अनेकांना ते मारहाण करत होते, मात्र त्याची कोणी तक्रार केली नाही.
गावातील मनीष हा 25 वर्षांचा तरुण म्हणतो, "या गुन्हेगारांनी RBM नावानं एक ग्रुप बनवला आहे. त्यांचा अनेक गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. ते सर्व एकत्र मिळून बेकायदेशीर कामं करतात."
"हे आरोपी गावातील कोणालाही मारहाण करतात. त्यांनी गावात खूप दहशत पसरवली आहे."
जेवणसुद्धा केलं नाही
घरातील परिस्थिती या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची जाणीव करून देते. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व वस्तूदेखील घरात नाहीत. घरात खाटेवर काही भांडी आहेत, काही कपडे आणि बंद पडलेली चूल आहे.
हुंदका आवरत राधा देवी सांगतात की "गोशालेतून तो घरी आला होता. मी त्याला जेवण करण्यास सांगितलं तर तो म्हणाला मी आताच तर आलो आहे. थोड्या वेळानं जेवतो. मग तो थंड पाणी घेण्यासाठी टाकीकडे गेला."

फोटो स्रोत, Mohar Singh Meena/ BBC
त्या सांगतात, "मला दहा दिवसांपासून ताप आहे. मी थोड्या वेळ आराम करण्यासाठी झोपले होते. बराच वेळ झाला तरी रामेश्वर आला नाही. म्हणून मी पाहण्यासाठी गेले तर गावातील सुभाष या तरुणानं सांगितलं की रामेश्वरला दारू विकणारे लोक घेऊन गेले."
"मी हात जोडून त्याला म्हटलं की ते कुठे घेऊन गेले आहेत तिथे मला घेऊन चल. मी स्वत: शोधण्यास गेले मात्र माझ्या रामेश्वरला कुठे घेऊन गेले आहेत हे कोणीही सांगितलं नाही. थकून भागून मी घरी परतली आणि तीन वाजता खाटेवर झोपले."
हातानेच घराच्या दरवाजाकडे इशारा करत त्या सांगतात, "संध्याकाळी मी जागे झाल्यावर पाहिलं तर रामेश्वर जमिनीवर पडलेला होता. मी रडू लागल्यावर सर्व लोक गोळा झाले. सर्वांनी मला पकडून दरवाजा बंद केला."
"माझा मुलगा कोणाशी भांडणंदेखील करायचा नाही. माझी दोन मुलं कोटपूतली आणि सीकर मध्ये पाच-पाच हजार रुपयांवर मजुरी करतात," असं राधादेवी विचारतात.
रडत त्या म्हणाल्या, "माझा रामेश्वरच माझ्या सोबत राहायचा. माझ्या लाडक्या मुलाला का मारलं");