तेलंगणा : एकाचवेळी 3 जागांवर जिंकणारा नेता, जे वाजपेयींनाही जमलं नव्हतं

पेंड्याला राघव राव

फोटो स्रोत, RAGHAVA RAO FAMILY/NA PRAJA JEEVITHAM

फोटो कॅप्शन, पेंड्याला राघव राव
  • Author, अरुण सांडिल्य
  • Role, बीबीसी तेलुगु प्रतिनिधी
  • Twitter,

भारतातील निवडणुकींच्या इतिहास अनेक विक्रमांच्या नोंदी आहेत. पेंड्याला राघव राव यांचा विक्रम त्यातीलच एक.

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यालाही त्यांच्या विक्रमाची बरोबरी करता आली नाही.

संयुक्त आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे संस्थापक एनटी रामाराव यांनीच केवळ या विक्रमाची बरोबरी केली होती.

पेंड्याला राघव राव यांनी 70 वर्षांपूर्वी एकाच वेळी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तीन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तिन्ही जागा जिंकल्या.

तुरुंगातून निवडणूक लढली आणि 3 जागा जिंकल्या

कम्युनिस्ट नेते पेंड्याला राघव राव यांनी 1952 च्या सार्वत्रिक निवडणुकीत हा विक्रम केला होता. त्यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या.

पेंड्याला राघव राव यांनी वारंगल लोकसभा, तसंच हणमकोंडा आणि वर्धन्नापेट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

या तीन जागा त्यांनी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक फ्रंटचे (पीडीएफ) उमेदवार म्हणून लढवून तीन्ही जागा जिंकल्या. मात्र, जिंकल्यानंतर त्यांनी हणमकोंडा आणि वर्धनपेट विधानसभा मतदारसंघ सोडले आणि वारंगळ लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

या निवडणुकीत उमेदवारी दिली त्यावेळी पेंड्याला राघव राव तुरुंगात होते. सरकारविरुद्ध लढल्याच्या आरोपाखाली तत्कालीन सरकारनं त्यांना अटक करून तुरुंगात टाकलं.

पेंड्याला राघव राव यांनी ही निवडणूक जिंकली, तेव्हा त्यांचं वय 35 वर्षे होतं.

वारंगळमध्ये कालोजींवर विजय

पेंड्याला राघव राव यांनी वारंगळ लोकसभा मतदारसंघातून प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीएफ) उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, तर कालोजी नारायण राव यांनी काँग्रेसच्या वतीनं निवडणूक लढवली होती.

समाजवादी पक्षाकडून के. सोमायाझुलु निवडणूक लढवली होती.

या तिघांपैकी पेंड्याला राघव राव यांना सर्वाधिक 77 हजार 267 मते मिळाली आणि ते विजयी झाले.

कालोजी नारायण राव

फोटो स्रोत, KALOJI NARAYANA RAO UNIVERSITY OF HEALTH SCIENCES

फोटो कॅप्शन, कालोजी नारायण राव

पेंड्याला राघव राव यांनी हणमकोंडा आणि वर्धन्नापेट मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.

त्या दोन मतदारसंघातून ते विजयी झाले. यासह त्यांनी एकाच वेळी तीन मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

वाजपेयींनाही हे शक्य झालं नाही...

वाजपेयी हे 'या' तेलुगु नेत्याची बरोबरी करु शकले नाहीत. पेंड्याला राघव राव यांच्याप्रमाणं केवळ एनटीआर तीन मतदारसंघातून विजयी झाले होते.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एकाच वेळी तीन जागांवर निवडणूक लढवली होती, पण त्यांना फक्त एकच जागेवर विजय मिळाला.

1957 च्या निवडणुकीत भारतीय जनसंघाचे (नंतर भाजप) नेते वाजपेयी यांनी एकाच वेळी तीन जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांनी उत्तर प्रदेशातील बलरामपूर, मथुरा आणि लखनौ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.

बलरामपूरमध्ये ते जिंकले पण लखनौ आणि मथुरेत पराभूत झाले.

अटल बिहारी वाजपेयी

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, अटल बिहारी वाजपेयी

मथुरा लोकसभा मतदारसंघात वाजपेयींना केवळ 23 हजार 620 मते मिळाली आणि ते चौथ्या स्थानावर राहिले. या जागेवर अपक्ष उमेदवार राजा महेंद्र प्रताप विजयी झाले. काँग्रेसचे उमेदवार दिगंबर सिंह दुसऱ्या तर अपक्ष उमेदवार पूरन हे तिसऱ्या स्थानावर आहेत.

वाजपेयींचा लखनौमधून पराभव झाला. इथं काँग्रेसचे उमेदवार पुलिन बिहारी बॅनर्जी विजयी झाले. वाजपेयींना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. बॅनर्जी यांना 69,519 मतं मिळाली तर वाजपेयी 57,034 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते.

वाजपेयी बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून मात्र विजयी झाले. वाजपेयी यांना 1,18,380 मतं मिळाली तर पराभूत काँग्रेस उमेदवार हैदर हुसेन यांना 1,08,568 मतं मिळाली.

बलरामपूरमधील या विजयानं वाजपेयी पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचले.

एनटीआर यांनी केली विक्रमाची बरोबरी

1985 च्या विधानसभा निवडणुकीत एनटीआर यांनी आंध्र प्रदेशात तीन जागांवर निवडणूक लढवली होती.

1985 मध्ये, एनटीआर यांनी राज्याच्या तीन भागांतून निवडणूक लढवण्याच्या उद्देशानं किनारपट्टीवरील गुडीवाडा, रायलसीमामधील हिंदूपुरम आणि तेलंगणातील नलगोंडा या विधानसभा जागा लढवल्या होत्या. त्यांनी तिन्ही जागा जिंकल्या.

गुडीवाडा मध्ये एनटीआर यांना 49,660 मतं मिळाली, तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार उप्पलापती सूर्यनारायण बाबू यांना 42,003 मतं मिळाली. गुडीवाड्यात आणखी सहा अपक्ष उमेदवारांनीही ही निवडणूक लढवली.

नलगोंडा विधानसभेच्या जागेवर एनटी रामाराव यांना 49,788 मतं मिळाली, तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी मंदाडी रामचंद्र रेड्डी यांना 18,201 मतं मिळाली. रामाराव 30 हजार मतांनी विजयी झाले.

इतर सात अपक्ष उमेदवारांनीही याठिकाणी निवडणूक लढवली, मात्र त्यापैकी कोणालाही आपली अनामत रक्कम वाचवता आली नाही.

एनटीआर

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, एनटी रामाराव

एनटी रामाराव यांनी हिंदुपुरममध्ये 56,599 मतं मिळवून विजय मिळवला. एनटीआर यांना एकूण मतदानापैकी 75.64 टक्के मतं मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे उमेदवार ई. आदिमूर्ती यांना 16,070 मतं मिळाली. येथे आणखी पाच उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

तिन्ही जागांवर निवडणूक जिंकलेल्या एनटी रामाराव यांनी नलगोंडा आणि गुडीवाडा जागा सोडल्या आणि हिंदूपुरमचं प्रतिनिधित्व केलं.

पण पुढील 1989 सालच्या विधानसभा निवडणुकीत एनटीआर यांनी हिंदुपुरम आणि तेलंगणा क्षेत्रातील कालवकुर्ती

मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि कलवकुर्तीमध्ये चित्तरंजन दास यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. हिंदुपुरम मधून ते विजयी झाले होते.

पेंड्याला राघव राव कोण आहेत?

पेंड्याला राघव राव यांचा जन्म 15 मार्च 1917 रोजी वारंगळ जिल्ह्यातील चिनपेंडया इथं झाला. त्यांनी निजामाच्या राजवटीविरुद्ध लढा दिला. हैदराबाद राज्यातील सरकारी धोरणांना विरोध करणारे नेते राघवराव या लढाईमुळं तुरुंगात गेले.

‘माय पब्लिक लाइफ’ या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या काळातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती तसंच त्यांचा संघर्ष आणि राजकीय परिस्थिती यांचं वर्णन केलं आहे.

पेंड्याला राघव राव यांनी विशेषत: अस्पृश्यता, महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्यावर लादलेल्या निर्बंध या विरुद्ध अनेक लढाया लढल्या. तेलंगणातील शेतकऱ्यांच्या लढ्यातही त्यांनी भाग घेतला होता.

पेंड्याला राघवराव यांचा पुतळा
फोटो कॅप्शन, पेंड्याला राघवराव यांचा पुतळा

स्वातंत्र्यसैनिक आणि कम्युनिस्ट नेते म्हणून त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला.

हैदराबाद राज्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ते तीन वर्षे तुरुंगात होते. त्यावेळी 1952 मध्ये त्यांनी तुरुंगातूनच उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणूक जिंकली.

पेंड्याला राघव राव यांची कन्या कोंडापल्ली निहारिणी यांनी अनेक प्रसंगी सांगितलं की, त्यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालं असलं तरी ते इंग्रजी, हिंदी आणि उर्दूभाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं, त्यामुळेच त्यावेळच्या कम्युनिस्ट नेत्यांनी त्यांना विधिमंडळातील जिंकलेल्या दोन जागा सोडण्याचा सल्ला दिला होता आणि लोकसभेचं प्रतिनिधीत्व करण्यास सांगितलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)