कुंभमेळ्याचे स्नान सुरू असलेल्या ठिकाणी गंगेचे पाणी खरंच प्रदूषित आहे का? अहवाल काय सांगतो?

उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डानं (यूपीपीसीबी) एनजीटीला एक नवीन अहवाल सादर केला.

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, आनंद मणि त्रिपाठी
  • Role, बीबीसी प्रतिनिधी

प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्याच्या समारोपाच्या आधी या संगम क्षेत्रात गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत दोन अहवाल समोर आले आहेत. त्यावरून एक नवीन वाद सुरू झाला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानं (सीपीसीबी) नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (एनजीटी) कडे 3 फेब्रुवारीला एक अहवाल सादर केला होता.

गंगा-यमुना नद्यांच्या पाण्यात निश्चित करण्यात आलेल्या मानक किंवा निकषांपेक्षा कितीतरी पट अधिक फीकल कॉलीफॉर्म बॅक्टेरिया असल्याचं, त्या अहवालात म्हटलं होतं.

त्यानंतर 18 फेब्रुवारीला उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डानं (यूपीपीसीबी) एनजीटीला एक नवीन अहवाल सादर केला. त्यामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानं (सीपीसीबी) सादर केलेला अहवाल फेटाळण्यात आला.

यावर कडक ताशेरे ओढत एनजीटीनं यूपीपीसीबीकडून नवीन अहवाल मागवला आहे. या प्रकरणावर 28 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. तर 26 फेब्रुवारीला कुंभमेळ्याची सांगता होणार आहे.

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात 13 जानेवारीपासून स्नान सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत तब्बल 58 कोटी लोकांनी संगमात स्नान केलं आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सीपीसीबीच्या अहवालात काय आहे?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानं (सीपीसीबी) कुंभमेळ्याच्या काळात श्रृंगवेरपूर घाट, लॉर्ड कर्झन ब्रिज, नागवासुकी मंदिर, दीहा घाट, नॅनी ब्रिज आणि संगम क्षेत्रातील पाण्याचे नमुने घेतले.

13 जानेवारी 2025 ला गंगा नदीवरील दीहा घाट आणि यमुना नदीवरील जुन्या नॅनी ब्रिजजवळून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये प्रति 100 मिलीलीटर पाण्यात 33,000 एमपीएन फीकल कॉलीफॉर्म बॅक्टेरिया आढळले.

श्रृंगवेरपूर घाटावरील पाण्याच्या नमुन्यात 23,000 एमपीएन फीकल कॉलीफॉर्म बॅक्टेरिया आढळले.

सीपीसीबीनुसार आंघोळीसाठीच्या प्रति 100 मिलीलीटर पाण्यातील फीकल कॉलीफॉर्म बॅक्टेरियाची सुरक्षित पातळी 2,500 एमपीएन इतकी आहे.

एनजीटीच्या अहवालात कुंभमेळ्याच्या काळात नदीच्या पाण्याच्या स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एनजीटीच्या अहवालात कुंभमेळ्याच्या काळात नदीच्या पाण्याच्या स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

संगमाच्या ठिकाणी जिथं सर्वाधिक लोक स्नान करतात. तिथं सकाळी आणि संध्याकाळी नमुने घेण्यात आले. त्यातून दिसून आलं की, तिथे प्रति 100 मिलीलीटर पाण्यात फीकल कॉलीफॉर्म बॅक्टेरियाचं प्रमाण 13,000 एमपीएन इतकं आहे.

अहवालातून फक्त फीकल कॉलीफॉर्म बॅक्टेरियाच्याच बाबतीत नाही तर इतर मानकांच्या बाबतीतही स्नान क्षेत्रातील पाणी आचमन आणि स्नान करण्यास योग्य नसल्याचं दिसून आलं.

सीपीसीबीनं असंही नमूद केलं आहे की, कुंभमेळ्यात मोठ्या संख्येनं लोक स्नान करतात. त्यामुळे लोकांच्या शरीरावरील आणि कपड्यांवरील घाण पाण्यात जाते. त्यामुळे पाण्यातील घाण, मैला याच्याशी निगडीत जीवाणूची घनता वाढते.

कॉलीफॉर्म बॅक्टेरिया काय असतो?

कॉलीफॉर्म बॅक्टेरिया अनेक बॅक्टेरिया किंवा जीवाणूंचा समूह असतो. वॉशिंग्टन स्टेट डिपार्टमेंट ऑफ हेल्थ (डब्ल्यूओडीओएच) नुसार, हा जीवाणू माणूस आणि प्राण्यांचे आतडे आणि शौचात आढळतो.

हा जीवाणू शरीरात असला तर अपायकारक नसतो. मात्र पाण्यात मिसळल्यानंतर हा जीवाणू धोकादायक होतो.

कॉलीफॉर्म बॅक्टेरिया अनेक बॅक्टेरियांचा समूह असतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कॉलीफॉर्म बॅक्टेरिया अनेक बॅक्टेरियांचा समूह असतो.

फीकल कॉलीफॉर्म हा टोटल कॉलीफॉर्मचा एक प्रकार आहे. याचाच एक प्रकार ई-कोलाय बॅक्टेरिया देखील आहे.

टोटल कॉलीफॉर्म माती किंवा इतर कारणांमुळे वाढू शकतो. मात्र फीकल कॉलीफॉर्म आणि ई. कोलाय जीवाणू शौचामधूनच येतो.

ई. कोलायचा प्रत्येक स्ट्रेन धोकादायक नसतो. मात्र ई. कोलाय 0157:H7 या प्रकाराला धोकादायक मानलं जातं.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फेटाळला अहवाल

कुंभमेळ्यात गंगा-यमुना नदीच्या पाण्यावरून राजकीय टीकाटिप्पणी देखील सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं सीपीसीबीचा अहवाल सरसकट फेटाळला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 19 फेब्रुवारीला विधानसभेत हा अहवाल फेटाळताना म्हटलं की, त्रिवेणी संगमाचं पाणी फक्त आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठी देखील पूर्णपणे योग्य आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "त्रिवेणी संगमाच्या पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संगम आणि त्याच्या जवळपासच्या सर्व नाल्यांमधील पाणी शुद्धीकरणानंतरच नदीत सोडलं जातं आहे. उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्ड पाण्याची गुणवत्ता कायम राखण्यासाठी सातत्यानं देखरेख करतं आहे."

सीपीसीबीचा अहवाल उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळला आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सीपीसीबीचा अहवाल उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळला आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, प्रयागराजमध्ये फीकल कॉलीफॉर्म बॅक्टेरियाचा स्तर सध्या प्रति 100 मिलीलीटर पाण्यात 2,500 युनिटपेक्षा कमी आहे. याचा अर्थ फक्त महाकुंभ मेळ्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

ते असंही म्हणाले की, संगमाच्या ठिकाणी पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण 8-9 युनिट आहे. तर बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड 3 पेक्षा कमी असते. याचा अर्थ संगमाचं पाणी फक्त आंघोळीसाठीच नाहीतर आचमनासाठीदेखील योग्य आहे.

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, "भाजपावाल्यांनी या पाण्याचा वापर खाण्या-पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी करावा. त्यानंतरच हे मान्य करता येईल की गंगेचं पाणी स्वच्छ आहे."

तर बुधवारी विधानसभेत राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेच्या वेळेस सपा नेते शिवपाल सिंह यादव यावर म्हणाले की "सरकारनं गंगेला इव्हेंट मॅनेजमेंटचं केंद्र केलं आहे.

गंगेचं पाणी आचमनायोग्य नाही. सरकारनं गंगाजल हाती घ्यावं आणि सत्य बोलावं. 2025 मध्ये या सरकारच्या अपयशाची गंगा वाहिली आहे."

फीकल कॉलीफॉर्मचं प्रमाण किती पाहिजे?

सीपीसीबीनं सहा मानक किंवा निकषांच्या आधारे संगम क्षेत्रातील पाण्याची तपासणी केली. प्रदूषणाच्या मानकांनुसार फीकल कॉलीफॉर्मचं प्रमाण प्रति 100 मिलीलीटर पाण्यात 2,500 युनिटपेक्षा कमी असलं पाहिजे. तर अहवालात हे प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलं आहे.

तर यूपीपीसीबीचे प्रयागराजचे विभागीय अधिकारी असलेल्या सुरेश चंद्र शुक्ला यांनी 18 फेब्रुवारीला 549 पानांचा अहवाल एनजीटीला दिला आहे.

या अहवालात पाण्याचे निकष किंवा मानक योग्य प्रमाणात असल्याचं म्हणत यूपीपीसीबी, जल प्राधिकरण, जियो ट्युब आणि मोतीलाल नेहरू राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा (एमएनआयटी) तपासणी अहवालदेखील सोबत जोडला आहे.

यूपीपीसीबीनं 18 फेब्रुवारीला प्रदूषणासंदर्भातील अहवाल एनजीटीला दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, यूपीपीसीबीनं 18 फेब्रुवारीला प्रदूषणासंदर्भातील अहवाल एनजीटीला दिला आहे.

या अहवालात ज्या जिओ ट्युबचा उल्लेख करण्यात आला आहे, ती संगमाच्या ठिकाणी पाण्यामध्ये आहे. त्याद्वारे पाण्याच्या गुणवत्तेची माहिती मिळत असते.

नद्यांच्या पाण्यावर संशोधन करणारे दीपेंद्र सिंह कपूर म्हणाले, "सीपीसीबीच्या अहवालात जर नदीचं पाणी प्रदूषित असल्याचं म्हटलं असेल तर ते नाकारलं जाऊ शकत नाही."

ते म्हणाले, "याच्या दोन बाजू आहेत. पहिली बाजू आहे की, एवढ्या स्नानात कोणालाही कोणताही आजार झाला नाही."

"तर याची दुसरी बाजू अशी आहे की, तिथे आंघोळ करणारी व्यक्ती तिथे थांबत नाही. ती घरी जाते आहे. ती घरी जाऊन आजारी पडेल."

कुंभमेळ्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे का?

कुंभमेळ्याची सुरुवात झाल्यापासून अनेकजणांना ताप, नाक वाहणं, शिंका, खोकला आणि सर्दीसह श्वसनसंस्थेशी संबंधित आजार झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

ग्रेटर नोयडाच्या सिमरन शाह यांनी 7 फेब्रुवारीला त्यांच्या कुटुंबासह संगमाच्या ठिकाणी स्नान केलं होतं. त्या म्हणाल्या, "कुंभमेळ्याची सुरुवात झाल्यापासून कुटुंबातील सर्वजणांची तब्येत बिघडली आहे. अजूनही तब्येत ठिक झालेली नाही."

सिमरन शाह म्हणाल्या की, कुटुंबातील सर्वांना घशात संसर्ग झाला आहे. सर्वजण औषधं घेत आहेत.

उत्तर प्रदेशातील अयोध्येचे रहिवासी असलेले अंकित पांडेय म्हणाले की, 17 फेब्रुवारीला त्यांनीदेखील त्यांच्या कुटुंबातील 19 सदस्यांसह कुंभमेळ्यात स्नान केलं होतं.

ते म्हणाले, "प्रयागराजहून आल्यापासून जवळपास सर्वांनाच सर्दी, खोकला आणि थोडा ताप येतो आहे. डॉक्टरांकडे जाऊन सर्वांना औषधं घ्यावी लागली. त्यानंतर सर्वांची तब्येत बरी झाली आहे."

कुंभमेळ्यातून परतल्यानंतर अनेकांना आजारपणाला तोंड द्यावं लागतं आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कुंभमेळ्यातून परतल्यानंतर अनेकांना आजारपणाला तोंड द्यावं लागतं आहे.

नवी दिल्लीत मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी संचालक डॉ. पन्नालाल म्हणाले, "हे तर होणारच आहे. इतक्या मोठ्या संख्येनं लोक कुंभमेळ्याला गेले आहेत. त्यामुळे हे टाळता येणं कठीण आहे.

जितके लोक तिथे गेले आहेत, त्यापैकी किमान 20 टक्के लोकांवर या बॅक्टेरियाचा परिणाम दिसतो आहे. कोणावर कमी तर कोणावर जास्त."

डॉ. पन्नालाल म्हणाले की "फीकल कॉलीफॉर्म जीवाणूमुळे शौचातून रक्त जाणं, उलटी होणं, यासह पोटाचे इतर आजार होतात.

त्याचबरोबर थोडासा ताप येणं, सर्दी, खोकला यासह इतर संसर्गाला तोंड द्यावं लागू शकतं. इतक्या प्रचंड गर्दीत याप्रकारची समस्या होतेच."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.