चालकाच्या रागाने घेतला चार जणांचा बळी, पुण्यातल्या मिनीबस आगीच्या कटाचा पोलिसांनी 'असा' केला उलगडा

पुण्यातील हिंजवडी परिसरात बुधवारी एका चालत्या मिनीबसला (ट्रॅव्हल टेम्पो) अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत चार लोकांचा होरपळून मृत्यू झाला तर वाहन चालकासह 5 कामगार गंभीर जखमी झाले.
सुरुवातीला अपघात असल्याचं भासवण्यात आलं. मात्र, पोलीस तपासात हा नियोजित कट असल्याचं समोर आलं आहे.
पुण्यातल्या हिंजवडी फेज 1 परिसरातल्या व्होमा ग्राफिक्स नावाच्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसला बुधवारी (19 मार्च) सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी अचानक आग लागली होती.
त्यावेळी गाडीतून जवळपास 14 कामगार प्रवास करत होते.
पुणे पोलिसांनी गुरुवारी (20 मार्च) या कथित अपघाताचा उलगडा केला. पोलीस तपासात बसच्या चालकानेच रागातून मिनीबसला आग लावल्याचं स्पष्ट झालं. 54 वर्षीय आरोपीचं नाव जनार्दन हंबर्डीकर असं आहे.
घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पेट घेतलेला ट्रॅव्हल्स टेम्पो रस्त्यावरून चालताना दिसला. आग विझवण्याचा प्रयत्न करत आजुबाजुचे लोक मागे पळत असल्याचंही या व्हीडिओत दिसलं.
घटनेनंतर फोरम फॉर आयटी एम्प्लॉई या आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
बस जुनी होती का? आग कशामुळे लागली? आपतकालीन दरवाजा का उघडला गेला नाही आणि झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोणाची? असं संघटनेने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विचारलं होतं.


कसा झाला उलगडा?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनीबसचा चालक आणि बचावलेले कामगार यांची चौकशी केली असता त्यांच्या जबाबात तफावत आढळली.
त्यानंतर पुढे केलेल्या चौकशीत सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदार यावरून चालकानेच रागाच्या भरात ही आग लावल्याचे निष्पन्न झाले आहे, असं पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये सांगितलं आहे.

पगारात केलेली कपात, चालक असतानाही इतर कामे करायला लावणे याचा राग या चालकाच्या मनात होता.
आरोपी दररोज या कर्मचाऱ्यांना पुण्यातून हिंजवडीत नेत असे. या कर्मचाऱ्यांसोबतही त्याचे काही वाद होत असत.
त्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने आरोपी चालकाने धावत्या वाहनात एक रसायन ओतून वाहन पेटवलं, असंही पोलिसांनी पुढे म्हटलं.
कसा आहे घटनाक्रम?
"आरोपी ज्या कंपनीत चालक म्हणून कामाला होता त्या कंपनीतूनच त्याने एक लिटर रसायन आणलं आणि स्वतःच्या गाडीत चालकाच्या सीटखाली ठेवलं होतं. शिवाय, प्रिंटिंगसाठी वापरल्या जातात तशा कापडाच्या चिंध्याही ठेवल्या होत्या," अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली.
आरोपीने वारजे येथे त्याच्या घराशेजारच्या पानटपरीवरून काडेपेटी विकत घेतली होती.
गाडी हिंजवडीत आल्यानंतर हे रसायन ओतून आरोपीने काडेपेटीने आग लावली, असंही त्यांनी पुढे म्हटलं. आगीमुळे गाडीचा स्फोट झाला.
"आरोपी जखमी असल्याने सध्या हॉस्पिटलमध्येच अटकेत आहे. गुन्हा दाखल करून लवकरच त्याला ताब्यात घेतलं जाईल," असंही गायकवाड यांनी नमूद केलं.

तपासात पोलिसांना गाडीत काडेपेटी, आग लावण्यासाठी वापरण्यात आलेल्या गोष्टी सापडल्या.
आरटीओकडून करण्यात आलेल्या तपासणीत वाहनाच्या कोणत्याही भागात शॉर्ट सर्किट झाल्याचं समोर आलेलं नाही.
पुढील तपास करत असताना साक्षीदारांशी बोलल्यावर चालकाचे कंपनीतल्या काही लोकांसोबत वाद झाल्याचं समोर आलं.
दिवाळीत आरोपीचा पगार दिला गेला नव्हता. वाहन चालवण्यासोबतच इतर मजुरीची कामं दिली जातात याबद्दलही त्याचा रोष होता, असं तपासात समजल्याचं पोलिसांनी सांगितलं.
आरोपीनेही गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.
कंपनीच्या जवळच अपघाताचा बनाव
आरोपीचा तीन ते चार लोकांवर जास्तीचा राग होता. त्यांना लक्ष्य करण्याचा त्याचा उद्देश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, हे कर्मचारी बचावले आहेत आणि मागे बसलेल्या चार लोकांचा हकनाक बळी गेला.
गाडीचे आपतकालीन दरवाजे का उघडले गेले नाहीत याबद्दलचीही चौकशी सुरू असल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं.
कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ असतानाच हा अपघाताचा बनाव आरोपीनं तयार केला होता.

त्यामुळे पुण्यातून हिंजवडीकडे निघाल्यानंतर तमन्ना सर्कल ओलांडल्यावर कंपनीच्या अलिकडचा उतार पाहून आरोपीने घातपात रचला.
त्या भागात उतार असल्याने आपण उडी मारताच गाडी सरळ खाली जाईल याची आरोपीला कल्पना होती.
पोलिसांनी सांगितलं की, चालकाचा मालकावर राग होता असं काही समजलेलं नाही. तो या कर्मचाऱ्यांना रोज घेऊन जात होता. या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांसोबत त्याचे वाद होते. हे प्राथमिक तपासात समजलं आहे. पगाराबद्दल आणखी चौकशी कंपनीच्या अकाऊंट्स विभागाकडून करण्यात येत आहे.
आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती.
जखमींची परिस्थिती काय?
जखमींपैकी सहा जण हिंजवडीमधल्या रुबी रुग्णालयात भरती होते. एक अतिशय गंभीर अवस्थेतल्या रुग्णाला हिंजवडीमधल्या सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
सर्व कर्मचारी आता सुरक्षित आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
"रुबी रुग्णालयात दाखल केलेल्या 6 रुग्णांपैकी दोघांना 40 टक्के भाजलं आहे. त्यांची अवस्था नाजूक आहे," अशी माहिती रुबी हॉल क्लिनिक हिंजवडी शाखेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर राज यांनी दिली.

20 टक्के आणि 5 टक्के भाजलेले दोन रुग्ण अजूनही बेशुद्धावस्थेत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर किरकोळ जखमा झालेल्या एका रुग्णाची स्थिती आता स्थिर आहे.
"रुग्णांना चांगल्या सेवा देण्यासाठी रुग्णालय तत्परतेने काम करत आहे," असंही डॉ. सुधीर राज पुढे म्हणाले.
आगीच्या घटनांमध्ये पाळण्यात येणाऱ्या सुरक्षा उपायांबद्दल सर्वांनी जागरूक रहावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)